“चेतक इतका शक्तिशाली होता कि त्याने घेतलेली एक झेप देखील हत्तीवर बसलेल्या सरदारापर्यंत पोहोचत होती ”
आपल्या भारताचा इतिहास अतिशय धुमश्चक्रीचा राहिला आहे. अनेक सत्तांनी आपल्या भारतावर राज्य केले, अनेक सत्ता उदयास आल्या, अनेक धुळीला मिळाल्या आणि याचसोबत अनेक शूरवीर माणसे देखील इतिहासाने बघितली. अश्या शूरवीर माणसांसोबत अनेक कथा व दंतकथा जोडल्या जातात ज्या त्यांच्या पराक्रमात अजून चार चाँद लावतात. अशाच एका व्यक्तीच्या एका कथेबद्दल आपण जाणून घेणार आहोत. आज आपण पाहणार आहोत अनेक प्रताप केलेल्या महाराणा प्रताप यांच्याबद्दल, त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी आणि त्यांच्या चेतक या घोड्याबद्दल सुद्धा !
कोण होते महाराणा प्रताप ?
सध्याच्या राजस्थान मध्ये मेवाड हे ठिकाण आहे. या मेवाड वरती राज्य करणाऱ्या राजपूत घराण्यातील १३ वे राजपूत राजे म्हणजेच महाराणा प्रताप होय. महाराणा प्रताप जरी त्यांना म्हणत असले तरी त्यांचे खरे नाव प्रताप सिंग (१ले) असे होते. महाराणा उदय सिंग (दुसरे) आणि जयवंताबाई यांच्या पोटी जन्मलेले प्रताप सिंग यांना शक्ती सिंग, विक्रम सिंग आणि जगमल सिंग अशी भावंडे देखील होती. प्रताप सिंग यांचा जन्म ९ मे १५४० साली मेवार येथील कुंभालगढ किल्ल्यावर झाला. सुमारे १५७२ मध्ये उदय सिंग यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर प्रताप सिंग हे गादीवर आले आणि महाराणा प्रताप म्हणून ओळखू जाऊ लागले.
कोण होता चेतक ?
महाराणा प्रताप सिंग यांच्या पराक्रमांचे अनेक किस्से इतिहासात प्रसिद्ध आहेत परंतु, यासोबतच महाराणा प्रताप सिंग यांचा लाडका चेतक सुद्धा इतिहासात प्रसिद्ध आह बरं का ! हा चेतक म्हणजे महाराणा प्रताप सिंग यांचा आवडता घोडा होता. महाराणा प्रताप सिंग तर पराक्रमी आहेतच पण एका लढाईत या चेतक घोड्याने देखील असा पराक्रम दाखविला कि इतिहासाला याची नोंद घ्यावी लागली. हा चेतकचा पराक्रम हल्दीघाटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या युद्धात घडून आला होता.
हा चेतक महाराणा प्रताप यांच्या आयुष्यात कसा आला याच्या अनेक कथा प्रचलित आहेत. एका कथेनुसार एक मनुष्य एके दिवशी महाराणा उदय सिंग यांना भेट देण्यासाठी दोन घोडे दरबारी पेश करतो. या वेळी प्रताप सिंग बालवयात होते. उदय सिंघानी त्या इसमाला विचारणा केली कि या दोन घोड्यांमध्ये इतके काय बरं खास आहे ? त्यावर त्याने सांगितले कि, हे घोडे त्या इसमाच्या मालकीचे असून, या घोडयांना जन्म ज्या लढाऊ घोड्यांनी दिला ते लढाऊ घोडे अतिशय दणकट, न थकता मैलाचे अंतर कापणारे आणि शक्तिशाली तसेच बुद्धिमान होते. त्यांनी दोन जुळ्या घोडयांना जन्म दिला होता त्यांचे नाव केतक व चेतक असे होते. हे दोन्ही छोटे घोडे न थकता मैलांचे अंतर सहज कापू शकत होते आणि यांचा वेग इतर घोड्यांच्या तुलनेत अनेक पटींनी जास्त होता.
महाराणांच्या सांगण्यावरून केतक या घोड्याची परीक्षा घेण्यात आली आणि त्या घोड्याला चक्क आगीत उभे केले गेले आणि त्या आगीतून उडी मारून तो केतक भरधाव वेगात पळत सुटला व त्याचा पाठलाग करत इतर सैन्य घोडे घेऊन सुटले परंतु कोणालाही केतकच्या वेगाची बरोबरी करणे शक्य होत नव्हते इतक्या वेगात केतक धावत होता. परंतु आगीत पायांना जखमा झाल्याने केतक मृत्युमुखी पडला व या नंतर महाराणांनी चेतक नावाचा घोडा आपल्या मुलाला म्हणजेच महाराणा प्रताप सिंग यांना भेट दिला व तेव्हापासून चेतक हा प्रतापसिंहांचा अतिशय लाडका घोडा राहिला.
कहाणी चेतकच्या स्वामिनिष्ठेची
सुमारे १८/२१ जून १५७६ रोजी महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात युद्ध झाले आणि हे युद्ध हल्दीघाटीचे युद्ध म्हणून प्रसिद्ध आहे. या युद्धात अकबराचे सैन्य अफाट होते पण याउलट महाराणा प्रताप यांचे सैन्य तुलनेने कमी होते परंतु, महाराणा प्रताप यांच्याकडे चेतक हे अतिशय प्रभावी हत्यार होते. महाराणा स्वतः चेतक वर स्वार झाले आणि चेतकला हत्तीच्या तोंडाचा मुखवटा घालण्यात आला कारण त्यामुळे अकबराच्या सैन्यातील हत्तींना चकविणे सोप्पे जाणार होते.
एकटा चेतक इतका शक्तिशाली होता कि त्याने घेतलेली एक झेप देखील हत्तीवर बसलेल्या सरदारापर्यंत पोहोचत होती व महाराणा सहज त्यांस मारू शकत होते.
याशिवाय चेतक अतिशय चपळ व धूर्त होता त्यामुळे एका तुकडीत हल्ला करून तो महाराणा प्रताप यांना घेऊन वाऱ्याच्या वेगाने दुसऱ्या तुकडीत धुमाकूळ घालण्यास सज्ज असे. या घोड्याचा पाठलाग करणे देखील शत्रूच्या घोडयांना अवघड जात होते.
हीच युद्धाची चकमक चालू असताना मुघलांचा एक सरदार हत्तीवर होता आणि त्याच्यावर वार करण्यासाठी चेतक ने एक मोठी झेप घेतली आणि वेळ साधून महाराणा प्रताप यांनीदेखील लगेच सरदारावर हल्ला केला परंतु या चकमकीत तलवारीचा वार लागून चेतकचा एक पाय जखमी झाला आणि चेतक थोडा कमजोर झाला. परंतु त्याची स्वामीभक्ती इतकी कि तीन पायांवर त्यानं महाराणा प्रताप यांना आपल्या पाठीवर बसवून वाऱ्याच्या वेगाने आगेकूच केली.
भर युद्धात महाराणा प्रताप यांचे प्राण वाचविण्यासाठी चेतक जीव मुठीत घेऊन धावत सुटला आणि त्याच्या पाठोपाठ अकबराचे सैन्य देखील पाठलाग करू लागले. पावसाळ्याचे दिवस असल्याकारणाने अनेक ठिकाणी पाण्याचं साम्राज्य होतं आणि असाच एक पावसाळी नाला तुडुंब भरून वाहत होता आणि कसलीही पर्वा न करता चेतक सरळ आपले तीनच पाय शाबूत असतांना देखील शिरला आणि त्या पाण्यातून त्याने महाराणा प्रताप यांना पलीकडे देखील पोहोचविले परंतु चारही पाय धडधाकट असून अकबराच्या सैन्यातील घोडे तो नाला पार करू शकले नाहीत. हा सगळा प्रसंग झाल्यानंतर मात्र चेतकने आपले प्राण सोडले.
आज या मतलबी जगात माणसाला माणसाचा देखील भरोसा उरला नाहीये आणि त्या काळीही कपटी माणसांची काही कमतरता नव्हती परंतु एका घोड्याने त्या काळी माणसाला निष्ठा काय असते हे शिकविले आणि स्वामीसाठी एका निष्ठावान सेवकाने काय करायला हवे याचा आदर्श एका घोड्याने रचला आणि इतिहासात स्वतःला अजरामर केले. हा प्रसंग इतका प्रसिद्ध आहे कि आजही राजपूत समाजाच्या पारंपरिक कविता व लिखाणांमधून चेतक व त्याच्या बहादुरीचे उल्लेख समोर आलेले सापडतात.
अनेक लिखाणांमध्ये चेतकचा उल्लेख सापडतो, त्याची काही उदाहरणे अशी :
श्यामनारायण पांडे यांनी ‘चेतक कि वीरता’ हि कविता रचली आणि त्यात चेतकचे वर्णन करताना ते म्हणतात,
“रण बीच चौकड़ी भर-भर चेतक बन गया निराला था, राणा प्रताप के घोड़े से पड़ गया हवा को पाला था, जो बाग हवा से ज़रा हिली लेकर सवार उड़ जाता था, राणा की पुतली फिरी नहीं तब तक चेतक मुड़ जाता था.”
याचबरोबर अनेक कवी व लेखकांनी चेतकला आपल्या विचारांत, कथांमध्ये व कवितांमध्ये आदराचे स्थान दिले आणि त्याच्या शौर्याचे अनेक चर्चे प्रसिद्ध केले. चेतक आजही प्राण्यांची स्वामीनिष्ठा किती पराकोटीची असावी याचा आदर्श म्हणून उभा आहे. आजही आपल्याला कुठेही महाराणा प्रताप यांचा एकटा पुतळा दिसत नाही तर नेहमी त्यांचा पुतळा त्यांच्या लाडक्या चेतक सोबतच पाहावयास मिळतो.