एके काळी सैन्यात वाहन चालकाचे काम करत असणारे अण्णा हजारेंनी आपले आयुष्य समाजसेवेसाठी का समर्पित केले. त्यांच्या आयुष्याची दिशा बदलणारा तो प्रसंग कोणता ?
2 सप्टेंबर 2011, भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाने जोर धरला होता. लोकपाल विधेयकासाठी भारत देशातील सामान्य जनता रस्त्यावर उतरली होती. एका समाजसेवकाच्या पाठी या देशातील जनता एकजूट पणे उभी होती. शाळेतील विद्यार्थीही त्यांच्या पाठिंब्यासाठी रस्त्यावर येऊन आंदोलन करताना दिसून येत होता.
प्रत्येक शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला मदत करण्यासाठी लहान-लहान आंदोलन होत होती. या आंदोलनाची एकच मागणी होती, लोकपाल विधेयक मंजूर करण्यात यावे. हे विधेयक विद्यमान सरकारने काही प्रमाणात लागूही केलेले आहे, पण त्यावेळी मात्र सरकार अशा प्रकारचे विधेयक आणण्यासाठी अनुकूल नव्हते आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाला भ्रष्टाचार विरोधी मोहिमेसाठी संघर्ष करावा लागत होता.
मैं अण्णा हूँ
मग तुम्हाला प्रश्न पडला असेल कोणाच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण देश परत एकद एकवटला होता. अण्णा हजारे, त्यावेळी अण्णांनी सत्तरी पार केली होती व या वयात त्यांनी लोकपाल विधेयकासाठी जवळपास पंधरा दिवस उपोषण केल. त्यांच्या या आंदोलनाने भारतीय राजकारणाचा चेहरा बदलून टाकला. भारतीय राजकारण मुळापासून बदलण्याचे काम हजारे यांनी हातामध्ये घेतले होते. सरकार त्यांना घाबरू लागले होते आणि सामान्य माणसांमध्ये अण्णा यांची प्रतिमा तयार होत होती. काही काळाने ती प्रतिमा एवढी दृढ झाली की प्रत्येक सामान्य व्यक्ती म्हणू लागला, “मैं अण्णा हूँ”
त्यांच्या या आंदोलनाचा काही लोकांनी राजकीय फायदा घेतला. केजरीवाल यांनी चालू केलेला आम आदमी पक्ष अण्णा यांच्याच आंदोलनातून चालू झाल्याचे सांगण्यात येते. एका छोट्याशा खेड्यात जन्म घेतलेल्या व्यक्तीने या देशाचे संपूर्ण राजकारणच बदलून टाकले. जाणून घेऊयात अण्णांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल.
अण्णांचे वयक्तिक आयुष्य
अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव किसन बाबूराव हजारे असे आहे. त्यांचा जन्म 15 जून 1937 साली भिंगार येथे झाला. हे गाव अहमदनगर जिल्ह्यातील आहे. सुरवातीला अण्णा सैन्यामध्ये वाहनचालक म्हणून आपले कर्तव्य बजावत होते. अण्णा यांचे वडील बाबुराव हजारे हे एका आयुर्वेदिक आश्रम औषध शाळेमध्ये काम करत असत. घरामध्ये दारिद्र्य असल्यामुळे अण्णा यांना त्यांच्या आत्यांनी शिकवण्यासाठी मुंबईला आणले. पुढे सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर अण्णांनी सैन्यात वाहन चालक म्हणून नोकरी पत्करली. अण्णा यांनी औरंगाबाद येथे त्यांचे ट्रेनिंग पूर्ण केले.
अण्णांनी नोकरी पत्करल्यानंतर वर्षभरातच पाकिस्तानने भारतावर आक्रमण केले. या युद्धाच्या काळामध्ये अण्णा यांच्या बटालियन मधील फक्त तेच जिवंत परत येऊ शकले. अशा अवस्थेमध्ये घरी परतत असताना अण्णा यांनी दिल्ली रेल्वे स्थानकावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे एक पुस्तक विकत घेतले. ते पुस्तक वाचल्यानंतर स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी अण्णा भारावून गेले. “राष्ट्रनिर्मितीसाठी तरुणांमध्ये देशाभिमान जागवला पाहिजे”, असे विचार त्यांच्या डोक्यात येऊ लागले. अण्णांनी असा विचार केला कि देवाने मला राष्ट्राच्या भल्यासाठीच वाचवले आहे आणि वयाच्या अडतिसाव्या वर्षी त्यांनी आपले जीवन सेवाकार्यासाठी समर्पित करण्याचा संकल्प सोडला. 1978 मध्ये त्यांनी भारतीय लष्कराचा राजीनामा दिला, लष्कर सोडल्यानंतर ते आपल्या मूळ गावी परतले.
हे गाव सध्या अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात येते. या गावांमध्ये कायमच दुष्काळाचे वातावरण असे. या गावांमध्ये अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या. अण्णा यांनी या गावासाठी सेवा करण्याचे व्रत हाती घेतले. अनेक वर्ष अथक मेहनत केल्यानंतर, गावकऱ्यांनी त्यांना या मेहनती मध्ये अपार सहकार्य केले त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून अण्णांनी आर्थिक आणि सामाजिक अशा दोन्ही आघाड्यांवरती गावाला सुस्थिती प्रदान करण्यात यश मिळवले. तंत्रज्ञान आणि औद्योगिकीकरणाचा आधार न घेता केवळ अतोनात कष्ट आणि सहकार यावर त्यांनी गावातील गरिबी दूर करण्यात यश प्राप्त केले.
आज आपण माहितीचा अधिकार सर्रासपणे वापरत आहोत. त्या माहितीच्या अधिकारासाठीही अण्णा हजारे यांनी एक प्रचंड मोठे आंदोलन उभे केले होते. यासाठीही अण्णांनी अनेक दिवस उपोषण करुन सरकारला वेठीस धरले होते. माहितीचा अधिकार या विषयावर अण्णा हजारे यांनी एक पुस्तक लिहिले आहे. अण्णांच्या आंदोलनामुळे सरकारला माहितीचा अधिकार सर्वसामान्यांना देण्याचा कायदा संमत करावा लागला.
अण्णा यांचे कार्य बघावे आणि वाचावे तेवढे कमीच आहे. राळेगणसिद्धीतील कामासाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री हा बहुमान देऊन सन्मानित केलेले आहे. अण्णा यांना 1992 रोजी पद्मभूषण हा पुरस्कारही प्रदान करण्यात आला. अण्णा यांनी स्वच्छता, पाणी व्यवस्थापन, सामाजिक सलोखा या विषयांवरती राळेगणसिद्धीमध्ये प्रचंड काम केलेले आहे. त्यांच्या या कामाबद्दल गावाला अनेक पारितोषिके मिळाली आहेत. अण्णा यांचे सेवाकार्य असेच दिवसेंदिवस वाढत राहो हीच अपेक्षा.