इंग्रजांनी भारतावर राज्य करावे येवढी इंग्रजांची संख्याही नव्हती व इंग्रजांकडे तेवढं संख्याबळ आणण्याची कुवतही नव्हती. पण प्लासीच्या युद्धाने मात्र सगळं चित्रच बदलून टाकलं
म्हणतात ना, “घर का भेदी, लंका ढाए” तशीच काहीशी स्थीती आपल्या इतिहासातील प्रत्येक राजा राजवाड्याची झालेली आहे. खरे बघितले तर इंग्रजांनी भारतावर राज्य करावे येवढी इंग्रजांची संख्याही नव्हती व इंग्रजांकडे तेवढं संख्याबळ आणण्याची कुवतही नव्हती. पण आपल्यातीलच काही फितुरांमुळे इंग्रजांना आपल्यावर दीडशे वर्षे राज्य करण्यात यश आले.
नुसते राज्यच नाही केले तर त्यांनी येथील संस्कृतीवरही घाला घातला. येथील सर्व संस्कृती संपवण्याचं कटकारस्थान ब्रिटिशांनी त्यांच्या कार्य काळामध्ये केलेले आहे. पण यासाठी ब्रिटिशांना दोष देण्यात काहीच अर्थ नाही आपल्यातील फितूर हेरून जर आपण वेळीच ठेचून काढले असते तर आज हिंदुस्थानला पारतंत्र्याचा इतिहास नसता आणि स्वातंत्र्यासाठी लाखो नवतरुणांना रक्ताने या मातीला अभिषेक घालायची वेळ आली नसती.
२३ जून १७५७ मधील प्लासी युद्ध प्रत्येक भारतीयाला लक्षातच असायला हवे कारण अशाच प्रकारे घरातल्या कोणीतरी फितुरी केली म्हणून नवाब सिराज उद्दौला याला पराभवाला सामोरे जायला लागले होते. हा पराभव भारतीय इतिहासावर लागलेला सर्वात मोठा कलंक आहे. असे अनेक कलंक भारतीय इतिहासात फितुरांमुळे लागलेले आहेत. मुर्शिदाबाद जवळील प्लासी इथे हे युद्ध झाले होते.
या युद्धामध्ये ईस्ट इंडिया कंपनीची सेना होती तर दुसरीकडे बंगालचा नवाब होता. कंपनीच्या सेनेचे नेतृत्व रॉबर्ट क्लाइव्ह हे करत होते आणि त्यांनी या युद्धामध्ये नवाब सिराज उद्दौला यांना हार पत्करायला लावली होती. याच युद्धामुळे भारताला पारतंत्र्याचे ग्रहण लागण्यास सुरुवात झाली असे म्हटले जाते. रॉबर्ट क्लाइव्ह यांनी भारतामध्ये ब्रिटिश साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवण्यास सुरुवात केली. या व्यक्तीला अभ्यासात अजिबात रुची नव्हती म्हणूनच वयाच्या अठराव्या वर्षीच रॉबर्ट क्लाइव्ह मद्रासमधील बंदरावरती क्लर्कचे काम करण्यासाठी इंग्लंडहून निघाले आणि इथेच त्यांचा आणि इस्ट इंडिया कंपनीचा पहिल्यांदा संबंध आला.
सिराज उद्दौला बंगाल, बिहार तसेच ओडिसा येथील संयुक्त संस्थानाचे शासक होते. त्यांना नवाब असे म्हणत. त्यांच्या पराभवानंतर ईस्ट इंडिया कंपनीने पाळेमुळे रोवायला सुरुवात केली. नवाब सिराज उद्दौला यांनी कंपनीला वखार तयार करण्यासाठी जागा दिली होती. पण कालांतराने कंपनीची नियत बदलली आणि त्यांनी वखारी वरील जागेवरती हक्क सांगण्यास सुरुवात केली. त्यामुळे, नवाब सिराज उद्दौला आणि कंपनीमध्ये तणाव निर्माण झाला होता. नवाब सिराज उद्दौला यांनी कंपनीला काही दिवसांचा अवधी देऊन ती जागा रिकामी करण्याचं आवाहन केले पण कंपनीने त्यांच्या विरोधात बंड करण्याचे ठरवले होते.
कंपनीच्या या पवित्र्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. रॉबर्ट क्लाइव्ह वखारी वरती प्रशासकीय अधिकारी म्हणून पार्लमेंट तर्फे नेमण्यात आला होता. त्याने ब्रिटिश पार्लमेंटला चिट्ठी तर्फे असे कळवले की येथे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीतून निभावण्यासाठी मला अजून काही सैनिकांची आवश्यकता भासू शकते, तेव्हा तुम्ही त्याची व्यवस्था करावी. पण नेमक त्याच वेळी इंग्लंडही इतर कुठल्यातरी युद्धात व्यस्त असल्यामुळे इंग्लंडने त्याला मदत करण्यास साफ नकार दिला आणि मग रॉबर्ट क्लाइव्हने युक्ती चालवली. त्याने नवाब यांचा सेनापती मीर जाफरला रॉबर्ट क्लाइव्हने विकत घेतले.
मिरजाफर बद्दल असे सांगितले जाते की पैशासाठी या व्यक्तीने बंगाल ही विकला असता. रॉबर्ट क्लाइव्हने मीर जाफरला बंगालचा नवाब करण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनामुळे मीरजाफर पुरता चेकाळला होता. त्याला दिवसा नवाब होण्याचे स्वप्न पडू लागले आणि तो रॉबर्ट क्लाइव्ह सोबत मिळून षड्यंत्राचा एक भाग झाला. जेव्हा युद्ध चालू झाले तेव्हा मीरजाफर पूर्णपणे निष्क्रिय राहिला आणि अशा पद्धतीने इंग्रजांनी धोक्याने ही लढाई जिंकली आणि इथूनच भारतावरती पारतंत्र्याची सत्ता येत गेली.