“उत्तराखंडच्या एका गावातल्या लोकांनी आजपर्यंत हनुमंताला केले नाही माफ, इतकेच नव्हे तर मंदिरामध्ये सुद्धा दिले नाही हनुमंताला स्थान”
हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान भक्तांमध्ये उत्साह ओसंडून वाहत असतो. पण भारतातील एका गावात असे लोक आहेत, की ते हनुमानाने संजीवनी वनस्पती शोधासाठी द्रोणागिरीचा पर्वत तोडून नेला हे काही ठीक केलं नाही असेच म्हणतात. द्रोणागिरी पर्वत हे ह्या गावकर्यांचे श्रद्धास्थान आहे. ही कथा एक अतिशय मनोरंजक कथा आहे. परंतु हे समजून घेण्यासाठी त्या संदर्भातील एक प्रसंग या गावात घडला होता, तो काय होता ते जाणून घेणे आवश्यक आहे.
उत्तराखंड सरकारने काही दिवसांपूर्वी एका मोहिमेची घोषणा केली होती. या मोहीमेसाठी २५ कोटींचा अर्थसंकल्प मंजूर केला होता. ह्यामध्ये राज्याच्या तिबेटशी लागून असलेल्या परिसरात संजीवनी वनस्पतींचे संशोधन करण्यासाठी तरतुदी केल्या गेल्या. संजीवनी वनस्पती अस्तित्वात असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही, परंतु पुराणातील कथेप्रमाणे ही वनस्पती मरणासन्न असलेल्या व्यक्तीला जीवन देऊ शकते असे सरकारचे मत होते, ह्यामुळे हे गाव प्रकाशझोतात आले.
द्रोणागिरी असे स्थान आहे जिथे हनुमानाला कोणत्याही मंदिरामध्ये किंवा घरात प्रवेश नाही, कारण….
या गावातील लोक रामायणाच्या काळापासूनच हनुमानावर नाराज आहेत. नाराजी इतकी जास्त आहे की, जेव्हा गावच्या जत्रा असतात आणि जत्रेत सादर केल्या जाणाऱ्या नाटकात पुरुष द्रोणागिरी पर्वताचे सोंग घेतात तेव्हा त्यांची पूजा लोक करतात. त्या सोंग घेतलेल्या माणसाची उजवी बाजू लूळी होते, जशी द्रोणागिरीची उजवी बाजू हनुमानामुळे लूळी पडली होती असे इथले लोक म्हणतात, आपल्या द्रोणागिरीला झालेल्या नुकसानाची भरपाई आजपर्यंत झालेली नाही असे ह्या गावातील लोक मानतात. ह्या सगळ्याला ते रामभक्त हनुमंताला जबाबदार मानतात.
या गावात तीन दिवस चालणारे रामलीला कार्यक्रम असतात, ज्यामध्ये हनुमानाचा साधा उल्लेख सुद्धा केला जात नाही. ह्या रामलीलेत रामाचा जन्म, यानंतर सीता स्वयंवर आणि त्यानंतर थेट रामाचा राज्याभिषेक दाखवला जातो. येथील लोक आणखी एक मनोरंजक किस्सा सांगतात, जो आपण कधीही ऐकला नसेल. जेव्हा द्रोणागिरी येथील (गावातील) लोकांना कळले की हनुमान संजीवनी घेण्यासाठी येत आहे, तेव्हा त्यांनी आपला द्रोणागिरी पूर्णपणे झाकून ठेवला. स्थानिक लोकांनी हनुमानाचे मार्ग आडवुन ठेवण्याची पण पूर्ण तयारी केली होती. रात्रीच्या अंधारात हनुमान तिथे पोहोचले तेव्हा त्यांना याची कल्पना आली.
अतिशय घनदाट अरण्य आणि अंधार, तसेच हातात असलेला कमी वेळ ह्यामुळे हनुमानाच्या समोर आव्हान उभे राहिले, पण त्यांनी एक युक्ती केली आणि साधूचा वेष घेऊन गावात गेले. एका वृद्ध स्त्रीला मदतीसाठी विनंती केली. त्या स्त्रीला दया आल्याने तिने हनुमानाला मदत केली आणि पर्वतापर्यंत पोहोचवलं, पण संजीवनी वनस्पती कशी दिसते हे माहीत नसल्याने त्यांनी द्रोणागिरीचा पूर्ण उजवा भाग तोडून आपल्या बरोबर लंकेत नेला.
वैद्य सुषेण यांनी त्यातून संजीवनी निवडून घेतली आणि लक्ष्मणावर उपचार केला, त्यामुळे मूर्च्छित असलेले लक्ष्मण शुद्धीवर आले. इकडे द्रोणागिरी गावातील लोक इतके चिडले की त्यांनी त्यांच्या आयुष्यातील हनुमानाचे अस्तित्वच नाकारले, इतकेच नाही तर एका स्त्रीने हनुमानाला मदत केल्याने संपूर्ण स्रीजातीला द्रोणागिरीची पूजा करण्यास मनाई केली.
द्रोणागिरी गावाची माहिती
समुद्र किनार्यापासून सुमारे ११,८०० फूट उंचीवर द्रोणगिरी गाव आहे. जर पर्यटकांना येथे जायचे असेल तर त्यांना जोशीमठ येथून जुंमह येथे ४४ कि मी अंतर बसने यावे लागते. त्यानंतर, सुमारे आठ किलोमीटर वर पर्वत शिखरावर चढले की आपण द्रोणागिरीला पोहचतो, पण ते सुद्धा फक्त उन्हाळ्यातच शक्य आहे, कारण हिवाळ्यामध्ये असे वातावरण असते की थंडीपासून संरक्षण करण्यासाठी सुमारे ४०० कुटुंब घेऊन भुटीया समाजाचे लोक हे गाव सोडून कमी उंचीच्या जागेवर जाऊन राहतात आणि हे गाव पूर्णपणे ओसाड बनते.
बगिनी, चांगबान, नीती, ह्या हिमशिखर आणि हिमनद्यांभोवती वसलेल्या लोकांचे जीवन व राहणीमान पुर्णतः हवामानावर अवलंबून असते. इतक्या उंचीवर कोणीही शेती करू शकत नाही, त्यामुळे गावातील लोक अवैधपणे इथे उगवणाऱ्या मौल्यवान वनस्पती निवडून, मैदानी प्रदेशात नेऊन जास्त किंमतीत विकतात आणि तस्करीद्वारे चीन आणि साउथ ईस्ट आशियाच्या इतर देशांमध्ये पोहोचवतात. लोक रोजगारासाठी मेंढरं पाळतात, डोंगरावर सापडणारे कस्तुरी मृग आणि अस्वल ह्यांची शिकार करून त्यांची कातडी आणि इतर अवयव विकतात. मात्र कितीही युगे उलटली तरी त्यांचा हनुमानावरचा राग कमी होईल असे वाटत नाही.