मराठीमध्ये कवितेच्या चार खूप छान ओळी आहेत.”जेंव्हा सगळंच संपून गेलंय अस आपल्याला वाटतं,तीच वेळ असते नवीन काहीतरी सुरु होण्याची.”
या आयुष्यामध्ये दुःखाचा डोंगर जरी कोसळला तरी जिद्दीनं उभी राहणारी माणसे आहेत.हि कहाणी आहे अश्याच एका जगावेगळ्या स्त्रीची जी फक्त जिद्दीने उभी राहिली नाही तर आयुष्यात कठीण प्रसंगाला कस तोंड द्यायचं याच सर्वोत्तम उदाहरणचं तिने जगासमोर ठेवलं.शांताबाई यादव कोल्हापूर जिल्ह्यामधील एका खेडेगावामधील हि स्त्री.
वयाच्या अवघ्या १२व्या वर्षी त्यांच लग्न झालं.नवऱ्याचा दाढी व कटिंग चा व्यवसाय.चार लहान मुली व नवरा इतकाच काय तो शांताबाईचा संसार.अश्यातच एक दुःखाचा डोंगर त्यांच्या समोर उभा झाला सर्वात लहान मुलगी पाच ते सहा महिन्याची असताना त्यांच्या नवऱ्याचं निधन झालं.कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शांताबाई वर आली,जमिनीचा तुकडा पण नाही,जवळचे नातेवाईक मदतीला तयार नाहीत अश्या अनेक समस्या शांताबाई वर एकाच वेळी आल्या. मजुरी करून भागणार नाही याचा अंदाज शांताबाईंना होता. घरात रडणाऱ्या चार मुली आणि रडावं वाटत असूनही रडण्याची सवलत नसणारी शांताबाई.
घरात नवऱ्याचा फोटो नाही, होता फक्त दाढी व कटिंग चा आरसा.त्यातुनच त्यांना जाणवल कि जे काम आपला नवरा करत होता तेच आपण समोर करावं.खर तर २१व्या शतकात हे सोपं नाही तरीसुद्धा या माउलीने हे करायची तयारी दर्शवली आणि करून सुद्धा दाखवलं.गावातील एक मोठे गृहस्थ सर्वप्रथम त्यांच्याकडे आले.ब्लेड लागेल किंवा कुठे जखम होईल याची तमा न बाळगता त्यांनी याची सुरुवात केली.हरिभाऊ कडुकर अस या गृहस्थाचं नाव.हरिभाऊंना याची जाणीव होती जर आपण याची सुरुवात केली तर बरेच लोक शांताबाईकडे येऊ लागतील व ज्या गरिबीच्या वेदना त्या सहन करत आहेत त्या काही प्रमाणात का होईना दूर होण्यास मदत होईल.
१९८५ सालापासून कधी पायी तर बैलगाडीने प्रवास करत शांताबाई आजूबाजूच्या खेड्यामध्ये जाऊन दाढी व कटिंग चा व्यवसाय करत आपला उदरनिर्वाह करत आहेत.एका माणसाची दाढी केली तर २० रुपये मिळतात आणि एका म्हशीचे केस काढायचे १०० रुपये मिळतात म्हणूनच शांताबाई म्हशींची जास्त वाट बघतात.आज हे आपल्याला ऐकायला जरी आश्चर्य वाटत असेल तरी पण इथल्या लोकांना त्यामध्ये काहीपण वेगळं वाटत नाही.दाढी व कटिंग चा व्यवसाय करूनच शांताबाईनी चारही मुलींची लग्न केली व त्या चारही मुली आज आपल्या संसारात सुखी आहेत.आजरोजी सुद्धा शांताबाई कोणाकडे पण हातपाय पसरत नाहीत व आपला काम नित्यनियमाने सुरु ठेवतात.
आज शांताबाई गाण्यावर आपण सगळेजण बेधुंद होऊन नाचतो परंतु हि शांताबाई यादव संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावर घेऊन नाचावी अशी आहे.