चैत्रपालवी नेसून नटलेली ही धरती, वसंत ऋतूचे स्वागत करते. ह्या निमित्ताने हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. हिंदू पंचांगात येणारा पहिला महिना चैत्र आणि त्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. चैत्र शु. प्रतिपदेला हिंदू नवंवर्षाची सुरुवात होते. साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त, या दिवशी कोणतेही शुभकार्य, वाहन, घर, जमीन, सोने खरेदी, तसेच एखाद्या गोष्टीची सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस. आजपासूनच रामाची नवरात्र सुध्दा सुरू होते जी रामनवमीला संपते.
कसा तयार झाला गुढीपाडवा हा शब्द ?
पडवा शब्द, संस्कृत शब्द ‘पद्दवा’ या पासून तयार झाला आहे, ज्याचा अर्थ चंद्राच्या तेजस्वी स्तिथीचा पहिला दिवस, आणि गुडी म्हणजेच ध्वज.
कसा साजरा करावा नवीन वर्षाचा पहिला दिवस ?
गुढीपाडव्याला अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढी उभारावी. गुढीला ‘ब्रह्मध्वज’ असेही म्हणतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी, तिला हळद – कुंकू, चंदन लावून सुशोभित करावे, तिच्यावर कोरे कापड (खण) फुलांची माळ, साखरेच्या गाठी, कडूनिंब, आंब्याची पाने ठेवून त्यावर एक चांदीचा किंवा तांब्याचा, गडू किंवा तांब्या पालथा बांधावा, आणि अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत घरावर डौलाने उभी करावी, तिला नैवेद्य दाखवून प्रार्थना करावी,
ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ।
प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु।।
अर्थ : सर्व उत्तम फल देणाऱ्या हे ब्रह्मध्वज देवता, तुला मी नमस्कार करतो. या नवीन वर्षामध्ये माझ्या घरात नेहमी मंगल, म्हणजेच सर्व चांगले घडू दे.
गुढी पाडाव्या मागच्या काही कथा
- ब्राह्मपुरणानुसार ब्रह्मदेवाने प्रलयानंतर परत ह्या दिवशी सगळ्या विश्वाची नव्याने निर्मिती आणि समय (वेळ) निर्माण केला असे मानतात.
- याच दिवशी रावणाचा वध करून आपला चौदा वर्षांचा वनवास संपवून श्रीराम अयोध्येत परत आले, म्हणून त्यांचे स्वागत करण्यासाठी सगळी नगरी सजवण्यात आली, गुढ्या, तोरणे उभारली गेली.
- विक्रम संवत्सर ह्या कालगणनेची सुरुवात ह्याच दिवसापासून झाली.
- महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांचा विजय साजरा करायला गुढी उभारली होती.
- गुढी हे विजयाचे प्रतीक आहे, म्हणून आपण गुढी उभी करतो.
महाराष्ट्रात आपण गुढीपाडवा म्हणतो, पण भारतातील इतर भागांत नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसाला काय म्हणतात, ते आपण जाणून घेऊया.
संवत्सर पाडवो, युगादी, उगादी, चेतीचांद किंवा नावरेह अश्या वेगवेगळ्या नावांनी हा सण भारतातील इतर राज्यांत ओळखला जातो. मणिपूर सारख्या पूर्वोत्तर राज्यातही हा साजरा केला जातो व तिथे तो साजीबु नोंग्मा पनबा चेराओबा या नावाने ओळखला जातो.
ऋतुमानानुसार महत्व – आपल्या प्रत्येक सणामागे वैज्ञानिक आणि ऋतुमानानुसार विशेष काहीतरी असे दडलेलं असते. गुढीपाडवा येतो चैत्रामध्ये म्हणजेच उन्हाळ्यात, म्हणून कडुनिंबाची कोवळी पाने, हिंग, ओवा, चिंच, गुळ अशी चटणी करून या दिवशी खावे असा प्रघात आहे, कारण कडुनिंब औषधी आहे, तसेच रक्तशुद्धी करते, पण त्याबरोबर सर्व चवी (आंबट, तुरट, तिखट, गोड) याचे सेवन उन्हाळ्यात आयुर्वेदानुसार महत्त्वाचे आहे.
तसेच गुढीवर घातलेल्या साखरेचा हार नंतर सरबत इत्यादीमध्ये वापरल्याने शीतलता मिळते. संध्याकाळी गुढीला धणे – गुळाचा नेवैद्य दाखवतात. धणे सुद्धा उन्हाळ्यात अतिशय उपयुक्त असतात, उष्णतेमुळे लघवीला होणारे त्रास ह्यामुळे होत नाहीत. गुढीपाडव्याला मराठी घराघरातून श्रीखंड पुरीचा बेत, रामाचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची गोड सुरुवात केली जाते. ठिक-ठिकाणी सकाळी पाडवा शोभायात्रा काढली जाते ज्यातून मराठी संस्कृतीचे दर्शन घडते. चला तर मग निसर्गातले परिवर्तन, नव चैतन्य, नव सृष्टी, नवीन वर्ष या सगळ्यांचे स्वागत आपण दारी गुढी उभारून करूया!
Khup chan mahiti…!
आपल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार.
आपली “लई भारी” वेबसाईट तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत शेअर करायला विसरू नका.