“हाजी मस्तान हा खऱ्या अर्थाने मुंबईचा पहिला डॉन, तो सुरुवातीला कुली म्हणून डॉकमध्ये कामाला होता”
मुंबईत रोज नवीन नवीन गुन्हे घडतच असतात. चोरी, खून, अपहरण असे अनेक गुन्हे. पण १९८०-९० च्या दशकात थरकाप उडेल अशा संघटीत गुन्हेगारी टोळ्या मुंबईत कार्यरत झाल्या होत्या. ह्याची सुरुवात साधारण १९५० मध्ये जेव्हा मुंबईत दारुबंदी होती तेव्हा झाली. तेव्हा अनेक गुन्हेगारांनी अवैध दारुच्या भट्ट्या लावायला सुरुवात केली. मग त्यात सगळ्यांनीच संघटीतपणे दारुची ने-आण, विक्री करायला सुरुवात केली. १९७० मध्ये मुंबईत लायसन्स राज होतं. आज आपल्याला आंतरराट्रीय बनावटीची घड्याळं, इलेक्ट्रॉनिक आयटम, सोने, चांदी सगळं विनासायास मिळू शकतं, पण तेव्हा तशी परिस्थिती नव्हती. त्यातूनच स्मगलिंगचा उदय झाला.
या स्मगलिंगमध्ये बेताज बादशहा होते करीम लाला, हाजी मस्तान, वरदराजन मुदलीयार, युसुफ पटेल. संघटीत गुन्हेगारीतील ही पहिली फळी. करीम लाला हा मूळचा पठाण कुटुंबातला. त्याने सुरुवात जुगाराचे अड्डे चालवण्यापासून केली. मग जमिनी खाली करुन देण्याची कामं तो करायला लागला. नंतर त्याने हाजी मस्तान बरोबर हातमिळवणी केली. हाजी मस्तान हा खऱ्या अर्थाने मुंबईचा पहिला डॉन. तो सुरुवातीला कुली म्हणून डॉकमध्ये कामाला होता. नंतर त्याने सुकुर नारायण बाखिया या कुप्रसिद्ध गुन्हेगाराबरोबर हातमिळवणी करून स्मगलिंगला सुरुवात केली.
स्मगलिंगपासून ते चित्रपटनिर्मिती अगदी राजकारणापर्यन्त त्याने मुशाफिरी केली. त्याने आयुष्यात एकही गोळी झाडली नाही पण मुंबईत त्याचा दबदबा होता. पांढरे कपडे घालणे आणि मर्सिडीज मधून फिरणं आणि उंची सिगारेट्स पिणे ही त्याची आवड होती. ज्यावेळेस हाजी मस्तान डॉकमध्ये कुली होता, त्याचवेळेस व्हिक्टोरिया टर्मिनसवर आणखी एक कुली मोठं व्हायची स्वप्न पहात होता. वरदराजन मुदलियार वरदाभाई. याने धारावी चेम्बुरमध्ये आपल साम्राज्य निर्माण केलं. तामिळ लोकांसाठी तो मसिहा होता. नंतर पोलिसांनी त्याच्याभोवती पाश आवळल्यावर तो तामिळनाडूत पळून गेला व तिथे त्याचा मृत्यू झाला.
युसूफ पटेल सुरुवातीला हाजी मस्तान बरोबर काम करत होता. नंतर तस्करी सोडून त्याने कंस्ट्रक्शन कंपनी काढली, जमिनीच्या रेकार्डमध्ये फेरफार करुन जमिनी हडपायला सुरुवात केली. बहुचर्चित फ्लोर स्पेस इंडेक्स घोटाळ्यात त्याचाच हात होता. ही होती अंडरवलर्ड मधील पहिली फळी. ह्यानंतर मन्या सुर्वे, पोत्या, सावत्या, माया डोळस अशा अनेक खतरनाक गॅगस्टरांचा उदय झाला पण खऱ्या अर्थाने ज्यांनी दहशत निर्माण केली अशा गुन्हेगारांच्या दुसऱ्या फळीत समावेश होता तो बडा राजन, दाऊद इब्राहिम, छोटा राजन, छोटा शकील, इक्बाल मिर्ची, अरुण गवळी, रमा नाईक ह्यांचा.
बडा राजनची गुन्हेगारी कारकीर्द सुरु झाली ती प्रेयसीसाठी टाईपरायटर चोरण्यापासून. मग त्याने गुन्हेगारी जगतात हातपाय पसरायला सुरुवात केली. १९८३ मध्ये त्याची हत्या झाली. दुसरा उल्लेखनीय डॉन म्हणजे दाऊद इब्राहिम, पोलिस काँन्सेटबलचा मुलगा ते गुन्हेगारी जगतातला अनभिषिक्त सम्राट, हा प्रवास त्याने सहज पार केला. अत्यंत क्रूर, कपटी असा दाऊद आपल्या शत्रुलाच काय पण नजरेतून उतरलेल्या आपल्या जवळच्या माणसांना पण जीवंत सोडत नसे. क्रिकेटचे बेटिंग, अपहरण, ड्रग्ज, रिअल इस्टेट अशा सगळ्या धंदयात त्याने हातपाय पसरले. मुंबई पोलिस त्याला अटक करायच्या बेतात आहेत, ही खबर लागताच तो आधी दुबईला पळून गेला आणि आता तो पाकिस्तानात आहे.
१९९३ साली झालेल्या बाँबस्फोटांनी मुंबई हादरली होती, ते स्फोटही दाऊदने घडवून आणले होते. अरुण गवळी, छोटा राजन, दाऊद हे एकेकाळी एकत्र काम करायचे, पण दाऊदने ड्रग्ज मुंबईत आणायला सुरुवात केल्यावर अरुण गवळीने त्याची साथ सोडली, तर बाँम्बस्फोटानंतर छोटा राजनने. छोटा राजन नंतर मलेशियात राहून सूत्र हलवू लागला. त्याने आणि दाऊदने एकमेकांना मारण्याचे खूप प्रयत्न केले, त्यातून गॅंगवॉर वाढलं. छोटा राजन, अरुण गवळी, दाउद इब्राहिम, रमा नाईक, अमर नाईक अशा अनेक टोळ्या मुंबईत निर्माण झाल्या आणि त्यांच्यात एकमेकांना संपवायची चढाओढ सुरु झाली.
ह्यातूनच गॅगवार सुरु झाले. दिवसाढवळ्या मुंबईत मुडदे पडू लागले. रक्ताची होळी खेळली गेली. मुंबईतील सामान्य लोक भयभीत झाले. पोलिसांवर टीका व्हायला लागली, तेव्हा पोलिसांनी एक स्वतंत्र पथक स्थापन केले ज्याला एन्कांऊटर पथक म्हटलं जाऊ लागलं. त्यांनी अशा गॅंगस्टरला टिपायला सुरुवात केली. प्रदीप शर्मा, विजय साळस्कर, सचिन वझे अशा अधिकाऱ्यांना ग्लॅमर मिळालं. त्यांनी ह्या गुन्हेगारी टोळ्यांचं कंबरडच मोडल. आज अरुण गवळी, छोटा राजन जेलमध्ये आहेत. नाईक गॅंग तर अश्विन नाईक नंतर संपल्यातच जमा आहे. इक्बाल मिर्चीचा लंडनमध्ये मृत्यू झाला, छोटा शकिल आणि दाऊदची डी गॅग मात्र अजूनही मुंबईत कार्यरत आहे. हा आहे मुंबईतील गुन्हेगारी जगताचा थरारक इतिहास !