“२०० पेक्षाही जास्त वेगवेगळे शोध आणि 40 हून अधिक संशोधनाचे त्यांच्याकडे पेटंट आहे. म्हणूनच ‘भारताचे एडिसन’ म्हणून त्यांना सन्मानित केले जाते.”
भारताला गौरवशाली इतिहास असतानाही आपसातील भांडणामुळे भारत परकीय दमनाखली आला. त्यानंतर भारतातील सर्व तेज व सामर्थ्य, ब्रिटिशांनी भारतातून हिरावून घेतलं. असं नाही की भारतात शास्त्रज्ञ नव्हते, पण त्यांनी त्यांचे ज्ञान कुठल्या संस्थेकडून अधिकृतपणे मान्य करून घेतलेले नव्हते, म्हणून त्यांना नेहमीच अपमानकारक वागणूक मिळत असे. एक काळ असा होता की अमेरिकेतील शास्त्रज्ञ भारतीय शास्त्रज्ञांबद्दल अपमानकारक शब्द उच्चारायला मागेपुढे बघत नसत.
काही वर्षांपूर्वी याच पाश्चिमात्य देशातील काही शास्त्रज्ञांचे म्हणणे होते की, “भारत स्वतःचे तंत्रज्ञान विकसित करू शकत नाही. भारतातील शास्त्रज्ञ फार फार तर एखाद्या तंत्रज्ञानाची नक्कल करू शकतात, पण स्वतःचं तंत्रज्ञान विकसित करणं त्यांना अशक्य आहे”. अशाच काही गोष्टी शंकर आबाजी भिसे या बालकाच्या वाचनात आल्या आणि त्याने ठरवलं कि ज्याने हे वाक्य म्हटले आहे, त्याला हे वाक्य नक्कीच मागे घ्यायला लावायचे.
शंकर आबाजी भिसे यांचा जन्म 29 एप्रिल 1886 रोजी झाला होता. त्यांचा जन्म मुंबईतील एका मॅजिस्ट्रेटच्या घरामध्ये झाला होता. लहानपणापासून त्यांनी एवढेच पहिले होते की सुखवस्तू आयुष्य हवं असेल तर सरकारी नोकरी गरजेची असते आणि त्यामुळेच पोटाची भ्रांतही राहत नाही. शंकर शाळेत असताना एक हुशार विद्यार्थी होते. पुढे जाऊन त्यांनी अद्वितीय कार्य केले. दोनशेच्यावर वेगवेगळे शोध या शास्त्रज्ञाने भारतासाठी लावले.
40 हून अधिक संशोधनाचे त्यांच्याकडे पेटंट आहे. त्यांना “भारताचे एडिसन” म्हणून सन्मानित केले जाते. लहान असताना ते एकदा एका वाण्याकडे साखर आणायला गेले होते पण, त्या वाण्याने त्यांना कमी वजनाची साखर दिली, हे शंकर यांच्या लक्षात आलं, त्यांनी वाण्याला याबाबत जाब विचारला असता, वाणी बोलला की माझ्याकडच्या वजनानुसार ही साखर बरोबर आहे, एवढाच हुशार असशील तर स्वतः यंत्र बनवून आण, आणि त्याला तेवढ्याच त्वेषाने शंकर यांनी उत्तर दिलं की, “होय एक दिवस मी वजन मापनाचे यंत्र बनवेल” आणि तिथून ते तावातावाने निघून आले.
यंत्राची ही आवड बघून शंकर यांच्या वडिलांनाही आनंद होत असे, पण सरकारी नोकरी बाबत त्यांच्या असणाऱ्या दृष्टिकोनामुळे त्यांनी शंकरला तीस रुपये महिना पगाराची एक कारकुनी सरकारी नोकरी लावून दिली. याच काळात 1897 मध्ये “इन्व्हेंटरी अँड सायंटिफिक रेकॉर्ड” या मासिकाने स्वयम् मापन यंत्र तयार करण्याची एक प्रतियोगिता आयोजित केली होती. शंकररावांनी या प्रतियोगीतेमध्ये सहभाग नोंदवत एका यंत्राचा आकार तयार करून पाठवला.
पुढे त्यांना या प्रतियोगीतेमध्ये पहिल्या क्रमांकाचे बक्षीस मिळाले. त्यांनी तयार केलेले त्यांचे हे यंत्र त्या वाण्याला मुद्दाम दाखवले. त्यानंतर 1904 मध्ये त्यांचे लक्ष मुद्रण व्यवसायातील यंत्रसामुग्रीकडे लागले. त्याकाळी प्रचलित असणाऱ्या मुद्रण यंत्राच्या रचना आणि कार्यमर्यादा यांचा अभ्यास करून, त्यामध्ये काही सकारात्मक बदल घडवत त्यांनी एका यंत्राचा शोध लावला. त्या यंत्राला त्यांनी “भिसेटाईप” असे नाव दिले. हे यंत्र त्यांनी अमेरिका, जर्मनी, फ्रान्स आणि इंग्लंड अशा देशांकडून पेटंट करून घेतलं होतं. या यंत्राच्या उत्पादनासाठी त्यांनी तत्कालीन उद्योग जगतातील श्री रतन टाटा यांचे सहकार्य मिळवले.
त्यांच्या सहकार्याने त्यांनी “भिसे टाटा इन्व्हेन्शन सिंडिकेट” या कंपनीची स्थापनाही केली. लंडनमध्ये या कंपनीचे मुख्य कार्यालय उघडण्यात आले. 1910 मध्ये ही कंपनी बंद करण्यात आली. त्याच सुमारास दर मिनिटाला 12 अक्षरे छापणारे यंत्र तयार करण्यात आले. 1916 मध्ये भिसे यांनी ते यंत्र विक्रीला आणले. तिथे त्यांनी “युनिव्हर्सल टाइप मशीन” या कंपनीच्या विनंतीनुसार “आयडियल टाइप कास्टर” हे यंत्र बनवले. अमेरिकेत त्यांनी त्याचे पेटंट घेतले.
या यंत्राच्या उत्पादनासाठी त्यांनी भिसे आयडियल टाइप कास्ट कॉर्पोरेशन या कंपनीेची 1921 मध्ये स्थापना केली, आणि त्याच वर्षी या कंपनीमधून पहिलं यंत्र बाहेर पडलं. याशिवाय, 1921 नंतरच्या कालावधीत या कंपनीने अनेक अशी यंत्रे बाहेर काढली, ज्याने मुद्रण व्यवसायाचा चेहरा बदलून टाकला. 1910 मध्ये भिसे यांना एक आजार जडला होता, त्यासाठी त्यांनी भारतीय पद्धतीने उपचार घेणं पसंत केलं. या उपचार पद्धतीने ते आजारातून पूर्णपणे बरे झाले.
मग त्यांनी या उपचार पद्धतीत वापरले जाणाऱ्या औषधाबद्दल संशोधन करण्यास सुरुवात केली, आणि त्यांनी काही दिवसांनी एक औषध शोधून काढलं, त्याचं नाव होतं “बेसीलेवन”. त्यांच्या असं लक्षात आलं की या औषधामध्ये असणाऱ्या आयोडीनच्या मात्रेमुळे हे औषध गुणकारी ठरत आहे. पहिला महायुद्धामध्ये त्यांनी अमेरिका आणि इंग्लंडमधील सैन्याची ह्यामुळे मने जिंकली होती.
या औषधावरती आणखी संशोधन करून त्यांनी आयोडीन घटक असलेलं पण पोटात घेता येईल असं औषध तयार केलं. त्याच्या उत्पादनासाठी त्यांनी 1923 मध्ये न्यूयॉर्क येथे एका कंपनीची स्थापना केली. 1927 मध्ये त्यांनी या औषधांचे उत्पादन आणि वितरण यांचे हक्क एका ईंग्लीश कंपनीला बहाल केले. या औषधास त्यांनी ऑटोमिडीन असे नाव दिले. 1970 च्या दरम्यान त्यांनी कपडे धुण्यासाठी एका संयुगाची निर्मिती केली, त्याचे नाव त्यांनी शेला असे ठेवले. या उत्पादनाच्या निर्मितीचे हक्क त्यांनी परत इंग्लिश कंपनीला विकले होते. त्यांनी विद्युत शास्त्रातही बरेच प्रयोगात्मक संशोधन केले होते.
त्यांनी तयार केलेले स्वयंचलित आगामी स्थानदर्शक यंत्र, ज्यामुळे प्रवाशांना पुढच्या स्टेशनचे नाव कळणार होते, पण, एका भारतीयाने शोध लावल्यामुळे ब्रिटिश रेल्वे कंपनीने अशा प्रकारचे यंत्र वापरण्यास नकार दिला. सध्या सगळीकडे चर्चेत असणारा मुद्दा म्हणजे सौरऊर्जेवर चालतील अशा प्रकारच्या वाहनांची निर्मिती, पण सांगण्यास हरकत नाही की ही मूळ कल्पना डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांची होती.
समुद्राच्या तळाशी भरपूर प्रकाश देणारा दिवा, वातावरणातील विविध वायूंनी मिश्रित असणारी हवा वेगळे करण्याचे यंत्र, जाहिरात दाखविणारे यंत्र, स्वयंचलित मालवाहक, स्वयंचलित वजन वितरण व नोंदणी करणारे यंत्र अशा प्रकारच्या अनेक संशोधनांचे शंकर आबाजी भिसे हे प्रमुख होते. 1927 मध्ये त्यांना डी एस ही पदवी बहाल केली गेली. 29 एप्रील 1927 रोजी भिसे यांना त्यांच्या 60 व्या वाढदिवशी अमेरिकन वैज्ञानिकांच्या उपस्थितीत “अमेरिकेचे पहिले शास्त्रज्ञ” म्हणून गौरवण्यात आले. खरंतर 1908 सालीच युरोपीय – अमेरिकन नियतकालिकांनी डॉ. शंकर आबाजी भिसे ह्यांना “इंडियन एडिसन” ही पदवी बहाल केली होती.
विद्यापीठाने त्यांना सायकॉन मधील डॉक्टरेट दिली होती, तर माउंट यांच्या चेंबर ऑफ कॉमर्सने भिसे यांना मानद सदस्यत्व देऊ केले होते. त्यांच्या मुद्रण शास्त्रातील विषयांच्या संशोधनाचा अंतर्भाव अमेरिकेतील पाठ्यपुस्तकांमध्येही करण्यात आला होता. अशा या विद्वान व्यक्तिमत्त्वाचा भारताला मागच्या काही काळामध्ये विसर पडल्याचे जाणवत आहे. भारतातल्या या एडिसनचा भारतीय समाज व्यवस्थेला विसर पडू नये एवढीच अपेक्षा.