आज आपण कारगिल युद्धातील अश्या एका नायकाबद्दल जाणून घेणार आहोत ज्याने ४८ पाकिस्तानी सैनिकांना यमसदनी धाडले होते. ५ गोळ्या लागूनसुद्धा हा शूरवीर डगमगला नाही. ह्या वीर भारतीय जवानाचे नाव आहे दिगेन्द्र सिंह. ४७ वर्षीय दिगेन्द्र सिंह सन २००५ मध्ये सेवानिवृत्त झाले आहेत. पण त्यांची वीरता, युद्धासाठी सदैव सज्ज असणारा त्यांच्यातील सैनिक अजूनही तसाच आहे.
भारतीय सैन्याच्या उरी येथील तळावर हल्ला झाला होता तेंव्हा त्यांनी याचा बदला घेण्याची इच्छा बोलून दाखवली होती. ते म्हणाले कि ह्यावेळी जर युद्ध झाले तर मी युद्धासाठी जरूर जाईल आणि १०० पाकिस्तान्यांना यमसदनी धाडून येईल. दिगेन्द्र सिंह भारतीय सैन्यातील सर्वोत्तम बटालियन्सपैकी एक असलेल्या २ राजपुताना रायफल्समध्ये कार्यरत होते. तसेच भारतीय सैन्यातील सर्वात घातक अशी ओळख असलेल्या कोब्रा कमांडोजच्या तुकडीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं आहे.
कारगिल युद्धादरम्यान दिगेन्द्र सिंह ह्यांनी पाकिस्तानी मेजर अन्वरचे शीर कलम केले व त्यावर तिरंगा फडकावला होता. तिरंग्याप्रती असा जबरदस्त अभिमान असलेल्या ह्या सैनिकाने असे म्हटले आहे कि ज्यादिवशी युद्धाची घोषणा होईल त्यादिवशी मी माझ्या बटालियनजवळ जाईल. मी प्रत्यक्ष युद्धात सहभागी होऊ शकलो नाही तरीही मी माझ्या बटालियनची जमेल तशी मदत करू इच्छितो.
२६ जुलै १९९९ ह्या दिवशी भारतीय सैन्याने ऑपरेशन विजय हि मोहीम फत्ते केली व कारगिल पुन्हा आपल्या ताब्यात घेतले. ह्या कारगिल युद्धात जवळजवळ ५०० भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. भारताच्या पाकिस्तानवरील ह्या विजयाची आठवण म्हणून कारगिल विजय दिवस साजरा केला जातो. दिगेन्द्र सिंह ह्यांना युद्धानंतर तत्कालीन राष्ट्रपती डॉक्टर के आर नारायणन ह्यांच्या हस्ते महावीर चक्र प्रदान करण्यात आले होते.