छत्रपती शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत एक अत्यंत महत्वाचे कार्य केले ते म्हणजे एक बलाढ्य आरमार उभे करून भारताचा समुद्र किनारा सुरक्षित केला. या आरमाराचे प्रमुख होते कान्होजी आंग्रे
‘ज्याचे आरमार बलवान, त्याची सागरावर सत्ता’, हे समीकरण स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय ह्यांनी फार पूर्वी हेरले होते. आज भारताचे नौदल जगातील सर्वात बलाढ्य नौदलांपैकी एक आहे, त्याचे कारण शिवरायांचा नौदल व आरमाराविषयीचा दृष्टिकोन आधुनिक भारताने स्वीकारला. छत्रपती शिवरायांनी आपल्या कारकिर्दीत एक अत्यंत महत्वाचे कार्य केले ते म्हणजे एक बलाढ्य आरमार उभे करून भारताचा समुद्र किनारा सुरक्षित केला.
१७ व्या शतकाच्या उत्तरार्धात तसेच १८ व्या शतकाच्या सुरुवातीला भारतामध्ये इंग्रज, पोर्तुगीज समुद्रामार्गे घूसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. घुसखोरी करण्यासाठी त्यांनी भारताच्या विस्तीर्ण अश्या समुद्र किनाऱ्याचा व सिद्दीच्या नाविक तळाचा उपयोग करण्याची योजना आखली. समुद्र व समुद्र किनारे हे उद्योग व व्यापारासाठीचे महत्वपूर्ण माध्यम होते व भारतातील राज्यकर्तेसुद्धा समुद्र व समुद्र किनाऱ्यांचा केवळ ह्याच कारणांपुरता उपयोग करत असत. पण इंग्रज, पोर्तुगीज व अन्य परकीय आक्रमणांमुळे भारताचे समुद्र किनारे सुरक्षित करण्याची गरज भारतातील राज्यकर्त्यांना भासू लागली. त्यासाठी सक्षम असे आरमार व नाविक दल उभे करणे गरजचे होते.
पण जोवर छत्रपती शिवरायांचे बलाढ्य आरमार व त्या आरमाराचे प्रमुख कान्होजी आंग्रे हयात होते तोवर पोर्तुगीज, इंग्रजांनी कधी भारतीय समुद्र किनाऱ्याकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत केली नव्हती. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर सुद्धा कान्होजी आंग्रे ह्यांनी मराठा साम्राज्यातील विस्तीर्ण अशी कोकण किनारपट्टी सुरक्षित राखली. आपल्या पराक्रमाच्या व युद्धनीतीचा जोरावर मुघल, पोर्तुगीज, इंग्रज ह्यांना नामोहरम केले. अश्या ह्या पराक्रमी आरमार प्रमुख ज्यांना ‘सरखेल कान्होजी आंग्रे’ ह्या नावाने सुद्धा ओळखले जाते त्यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकूया.
‘सेना सरखेल कान्होजी आंग्रे’
रत्नागिरीच्या हरणे ह्या गावी कान्होजी आंग्रे ह्यांचा जन्म झाला होता. त्यांचे वडील तुकोजी आंग्रे सन १६५९ पासून स्वराज्यसेवेसाठी शिवरायांबरोबर काम करू लागले. त्याआधी ते शहाजी राजेंबरोबर काम करत असत. सन १६८० साली तुकोजी आंग्रे ह्यांचा मृत्यू झाला व त्यांचे कार्य कान्होजी आंग्रे ह्यांनी पुढे चालू ठेवले. कान्होजींनी आपले संपूर्ण आयुष्य स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी खर्ची घातले. इंग्रज, पोर्तुगीज, डच अश्या बलाढ्य शत्रुंना कान्होजी आंग्रे हयात असे पर्यंत किंचितही यश मिळू शकले नाही.
त्यावेळी भारताच्या पश्चिमी समुद्र किनाऱ्यावर स्वतःचा ताबा मिळवण्यासाठी अनेक परकीय शक्ती जोरदार प्रयत्न करत होत्या. समुद्रामार्गे व्यापार व त्यानिमित्ताने भारतात शिरकाव करण्याचा डाव ह्या परकीय शक्तींचा होता. हे छत्रपती शिवराय कदाचित जाणून होते आणि म्हणूनच त्यांनी बळकट आरमाराची निर्मिती केली असावी. पोर्तुगीज व इंग्रजांनी मराठा आरमार कमकुवत करण्याचे अनेक प्रयत्न केले, परंतु सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांनी त्यांचे हे प्रयत्न वेळोवेळी हाणून पाडले.
इसवी सन १६८८ साली कान्होजी सुवर्णदुर्ग किल्यावर तैनात होते. त्यावेळी सुवर्णदुर्गाचे किल्लेदार अश्लोजी मोहिते ह्यांनी स्वराज्याशी गद्दारी केली. त्यांनी पैशाच्या मोबदल्यात सिद्दी कासिमला सुवर्णदुर्ग देण्याचा प्रयत्न केला. कान्होजींचा जन्म ह्याच सुवर्णदुर्गावर झाला होता त्यामुळे हा किल्ला मुघलांच्या ताब्यात जाणार हि कल्पनाच त्यांना सहन झाली नाही. त्यांनी सिद्दी कासिम विरुद्ध जोरदार युद्ध पुकारले. ह्या युद्धात कान्होजींनी अतुलनीय पराक्रम गाजवला व औरंगजेबचा सेनापती सिद्दी कासीम ह्याचा पराभव केला.
सिद्दी कासीमचा पराभव करून सुवर्णदुर्ग सुरक्षित केल्यानंतर कान्होजींनी आपला मोर्चा अन्य किल्ल्यांकडे वळवला. मुघलांच्या ताब्यात असलेले किल्ले एक एक करत परत मिळवण्याचा कान्होजींनी चंग बांधला. दगाफटका करून मुघलांनी स्वराज्याचे छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली होती. स्वराज्य संकटात सापडले होते. शंभूराजेंच्या मृत्यूनंतर स्वराज्याची आण, बाण आणि शान असलेला रायगड मुघलांच्या ताब्यात गेला व त्यामुळे छत्रपती राजारामराजे ह्यांना जिंजी येथे जावे लागले. त्याच दरम्यान इकडे कोकणात मात्र कान्होजींनी आपल्या पराक्रमाने मुघलांची दाणादाण उडविली होती.
इसवी सन १६९४ ते इसवी सन १७०४ ह्या काळात कान्होजींनी मुघलांनी ताब्यात घेतलेले पश्चिम समुद्र तटावरील सर्व किल्ले पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतले. वयाच्या फक्त १६ व्या वर्षी कान्होजींची दर्यासारंग अर्थात सरखेल म्हणून नियुक्ती झाली होती. जबाबदारी मोठी होती, कारण आता कान्होजींना १५० मैल लांबीच्या विस्तीर्ण अश्या समुद्र किनाऱ्याची संपूर्ण सुरक्षाव्यवस्था करायची होती. मोठ्या विश्वासाने छत्रपती शिवाजी महाराजांनी कान्होजींना स्वतंत्र प्रभार देऊ केला होता.
कान्होजींनी असे बळकट केले मराठ्यांचे आरमार
इसवी सन १६९८, स्वराज्याचे नेतृत्व महाराणी ताराबाई करत होत्या, त्याकाळीसुद्धा मराठा आरमार कान्होजींच्या नेतृत्वाखाली अजिंक्य होते. पण तेवढे पुरेसे नव्हते हे कान्होजींनी ओळखले व आपल्या आरमाराचा विस्तार करावा, आरमार अजून बळकट करावे असे त्यांनी ठरवले. त्यावेळी आरमाराच्या ताफ्यात केवळ १० जहाजं होती. कान्होजींनी कोकणच्या धर्तीवर अनेक नवीन जहाजांचे निर्माण करवून घेतले व कोळी समाजातील तरुणांना सैन्य प्रशिक्षण देऊन आपल्या आरमारात सामील करून आरमाराचे मनुष्यबळ वाढवले.
त्याच काळात अरबी समुद्रमार्गे होणाऱ्या व्यापारात बरीच वाढ झालेली होती पण मराठा आरमार व स्वराज्यास त्याचा धोका नव्हता. त्यामुळे तसे चिंतेचे कारण नव्हते. पण, काही काळानंतर पोर्तुगीजांनी मराठा आरमारास आव्हान देण्यास सुरुवात केली. अनेक काळानंतर प्रथमच एखाद्या युरोपियन परकीय सत्तेने मराठा आरमारास आव्हान दिले होते व त्यांना धडा शिकवणे आवश्यक होते, जेणेकरून त्यांनी पुन्हा मराठा आरमारास आव्हान देण्याची हिंमत करू नये.
पोर्तुगीज व इंग्रजी सैन्यबळाच्या तुलनेने मराठा आरमाराची ताकद मर्यादित होती हे कान्होजी जाणून होते. पण कान्होजींच्या युद्धनीतीवर छत्रपती शिवरायांच्या युद्धनीतीचा प्रभाव होता. त्यांनी महाराजांच्या गनिमी काव्याचा वापर करून पोर्तुगीज व इंग्रजांना हैराण करण्याचे ठरवले. गनिमी काव्याचा वापर करतांना त्यांनी एक खबरदारी घेतली कि समुद्रकिनाऱ्यापासून फार लांबवर न जाता ब्रिटिश जहाजांवर हल्ला करायचा, तसे करण्याचे कोणकोणते विशेष फायदे आहेत ते कान्होजी जाणून होते.
ब्रिटिश जहाजांवर अचानक हल्ला करायचा व ब्रिटिश सावध होण्याच्या आतच वाऱ्याच्या वेगाने तिथून पळ काढायचा. हे युद्धतंत्र अवलंबुन कान्होजींनी इंग्रजांना हैराण करून सोडले होते. अश्या पद्धतीने कान्होजी आंग्रे ह्यांनी मराठा आरमार अजिंक्य बनवले. सन १७२९ साली त्यांचा मृत्यू झाला. कान्होजी हयात असेपर्यंत ब्रिटिश व पोर्तुगीजांचा एकही प्रयत्न त्यांनी सफल होऊ दिला नाही. उलट अनेक ब्रिटिश, पोर्तुगीज व डच जहाजे कान्होजींनी आपल्या ताब्यात घेऊन मराठा साम्राज्याला आव्हान देऊ पाहणाऱ्या परकीय शक्तींना वेसण घातले होते. मराठा आरमाराचा उल्लेख हा कान्होजी आंग्रे ह्या नावाशिवाय अपूर्ण ठरतो तो ह्यामुळेच.
ये भावड्या हे बी वाच –
शिवराज्याभिषेकाची गरज का होती ? त्याचे काय परिणाम झाले ?
महाराणा प्रताप यांच्या ‘चेतक’ या निष्ठावंत घोड्याच्या बलिदानाचा किस्सा
शत्रूची तलवार ज्यांना स्पर्श करू शकली नाही, अश्या बाजीराव पेशवेंचा मृत्यू कसा झाला ?
शंभूराजेंच्या मृत्यूनंतर रायगडाला झुल्फिकारखानाचा वेढा आणि राजाराम राजेंचा गनिमी कावा