अमेरिकेपासून फ्रांस पर्यंत अनेक महत्वाचे देश आहेत पण मोदी पहिला दौरा मालदीवला का करत आहेत ?
गेल्या काही दिवसांपासून मालदीव मधील राजधानी शहर माले मध्ये मोठ्या हालचाली पाहायला मिळत आहेत. अगदी भारतात दिवाळी जवळ आली कि लोक आपले घर, व्यवसाय आणि परिसर स्वच्छ करून दिवाळीच्या स्वागताला लागतात अगदी हुबेहूब तसाच प्रकार दिसत आहे. राजधानी शहर माले मधील प्रशासन जोरदार कामाला लागले असून काही दिवसांपासून शहरातील रस्ते, मोठ्या इमारती आणि प्रेक्षणीय स्थळे स्वच्छ करण्याची मोहीमच चालू आहे, निमित्त आहे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मालदीव दौरा.
आपल्याला माहीतच आहे कि भारत आणि मालदीव मध्ये मैत्रीचे संबंध आहेत, अगदी मालदीवला कोणत्याही क्षणी सर्वात आधी मदत करणारा देश भारत असतो. पण गेल्या काही वर्षांपासून विशेषतः अब्दुल्ला यामिन राष्ट्रपती झाल्यापासून भारत आणि मालदीवच्या मैत्री मध्ये मीठाचा खडा पडला होता. अब्दुल्ला यामिन यांच्या नेतृत्वाखाली मालदीव भारतापासून दुरावत चीनचा मित्र बनत चालला होता, चीन ने सुध्या मोठ्या प्रमाणात मालदीव मध्ये गुंतवणूक केली आहे.
पण मागील वर्षी म्हणजेच २०१८ ला झालेल्या निवडणुकीत अब्दुल्ला यामिन यांचा पराभव करत इब्राहिम मोहम्मद मालदीवचे नवे राष्ट्रपती झाले. इब्राहिम मोहम्मद यांची राष्ट्रपती पदी निवड झाल्यानंतर मात्र भारत आणि मालदीव यांच्यातील मैत्रीचे संबंध पुन्हा पूर्वपदावर आले आहेत. त्यावेळी भारतीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी इब्राहिम यांच्या शपथविधी सोहळयाला उपस्थित राहून मोठा राजकीय संदेश सुद्धा दिला होता.
आंतराष्ट्रीय पातळीवर दक्षिण आशियामध्ये कूटनीती करण्यास भारतासाठी मालदीव महत्वाचा साथीदार आहे, आणि यामुळेच भारताने मालदिवसोबत आपले संबंध पुन्हा एकदा दृढ करून चीनला चकवा दिला आहे. सध्या भारत आणि मालदीव मधील संबंध पुन्हा दृढ झाले असून विविध विषयांवर दोन्ही देशात करार झाले आहेत.
नरेंद्र मोदींचा पहिला विदेश दौरा मालदीवला का ?
१७ व्या लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचा करिष्मा चालला आणि विरोधकांना पुन्हा एकदा गारद करत मोदी पंप्रधान झाले. यानंतर सरकारच्या कूटनीतीच्या भाग म्हणून शपथविधी सोहळ्याला BIMSTEC देशांना आमंत्रित करण्यात आले होते. पण यामध्ये मालदीवच्या संदेश नव्हता त्यामुळे अनेकांचे दिले उंचावले होते.
पण शपथविधी सोहळ्याला आमंत्रण न दिल्याचे मालदीवला खटकायला नको याची पुरेपूर काळजी नरेंद्र मोदी सरकारने घेत आपला पहिला विदेश दौरा करण्याचा मान मालदीवच्या देऊन त्यांचे मन जिंकले आहे. यातून आपल्यासाठी मालदीव किती महत्वाचा आहे याचा अप्रत्क्षरीत्या संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
मालदीव दौऱयात संसदेला भेट देण्यासोबतच, अनेक ठिकाणांना भेट देऊन संबोधित करणार आहेत. यावेळी मालदीव आणि भारताच्या मैत्रीचा नवीन अध्याय सुरु होण्याच्या शक्यता सुद्धा आहेत. मोदींच्या या भेटीमुळे मालदीवमधील भारतीय लोक कमालीचे उत्साही असून त्यांनी भारतीय पंतप्रधानांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे.