गेले चार दिवसापासून पुराने सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याना वेठीस धरत थैमान घातले आहे. आपत्ती व्यवस्थापनाला दोन लाखांहून जास्त नागरिक व २२ हजारवर जनावरांना सुरक्षित स्थळी हलवण्यास यश मिळाले आहे. तरी पुष्कळ गावातील नागरिक आणखीही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. सांगली जिल्ह्यासह ११७ गावांना पुराने वेढा घातला असून ग्रामीण भागांत मदत पोहोचत नसल्यामुळे या पुराने शासकीय यंत्रणेतील कामाचा दुष्काळ उघड झाला आहे. त्यावेळी पतंगराव कदमांनी त्यावेळी दाखवलेल्या हजरजबाबीपनाचा जुना व्हिडीओ व्हायरल होत असून युती सरकार ह्या आपत्तीला तोंड देण्यास अपयशी ठरत असल्याचे निष्पन्न होत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, २००५ साली असाच महापूर आला होता त्यावेळी आघाडी सरकार सत्तेत होते. पूरस्थिती उत्पन्न झाल्याबरोबर त्यावेळचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कर्नाटक सरकारला आलमपटी धरण्याचे दरवाजे तातडीने उघडा नाहीतर धरणं फोडण्यात येईल असा धमकी वजा आदेश देत, अलमपटी धरण्याचे दरवाजे उघडण्यास भाग पडले होते.
यावेळी पतंगराव कदम, मदन पाटील, आर. आर. पाटील स्वतः नागरिकांच्या सोबत उतरून आपत्तीग्रस्त भागात मदत केली होती. कोल्हापूर, सांगली या दोन्ही जिल्ह्यांचा पूर्ण परिसर माहित असल्याने कुठल्या भागात लवकर पाणी शिरेल हेही ते जाणून होते, त्यामुळे त्या भागातील नागरिकांची आगोदर सुटका करून नंतर बाकीच्या परिसरातील नागरिकांना सुटका केली. माणसाबरोबरच जनावरांचीही काळजी घेत एकही जनावर त्यांनी पुरात मरू दिले नव्हते.