भारताच्या सुरक्षेसाठी काम करणारे अनेक असे अपरिचित हिरो आहेत जे भारताच्या भल्यासाठी कुठल्याही पातळीपर्यंत जाऊन भारताची सेवा करू शकतात.
आजकाल गुप्तहेरांवरती अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहेत. गुप्तहेरांचे आयुष्य कसे असते याची किंचित प्रचीती सर्वसामान्यांना येत आहे. बॉलीवूडने मागच्या दोन तीन वर्षांमध्ये गुप्तहेरांच्या आयुष्यांवरती अनेक चित्रपट काढून त्यांना प्रसिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न केले आहेत. “राझी” चित्रपट बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आले असेल की भारताचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी आणि आपल्या देशाला स्वराज्याकडे नेण्यासाठी अनेक असे अपरिचित हिरो आहेत जे भारताच्या भल्यासाठी कुठल्याही पातळीपर्यंत जाऊन भारताची सेवा करू शकतात.
विचार करा भारताच्या या खात्याकडे अशी किती माहिती असेल आणि त्याच्या वरती किती थरारक चित्रपट तयार होऊ शकतात. स्वतः राँ संस्थापकांची कथा अशी आहे की जर त्याच्यावरती चित्रपट तयार झाला तर अरबो रुपये चित्रपट लीलया कमावुन दाखवेल. पण कोणी केली होती या संस्थेची स्थापना ? जाणून घेऊयात या लेखामध्ये.
आर. एन. काव (R N KAO) हे गुप्तहेर कलेचे एक फार मोठे कलाकार होते. एक रहस्यमयी व्यक्तिमत्व ज्याने जगभरात भारतासाठी गुप्तहेर जाळे तयार करण्यासाठी खूप कष्ट घेतले. त्यांचे स्वतःचे फार कमी फोटो उपलब्ध आहेत. त्यांचा जन्म 1918 मध्ये बनारस येथील काश्मिरी पंडितांच्या घरी झाला होता. अलाहाबाद विद्यापीठामधून इंग्रजी साहित्याचे त्यांनी शिक्षण घेतले. 1939 मध्ये त्यांनी भारतीय पोलीस सेवेमध्ये आपले कर्तव्य बजावण्यास सुरुवात केली. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी इंग्रजांनी त्यांच्याकडे इंटेलिजन्स ब्युरोचे डायरेक्टर हे पद दिले होते.
1957 ची गोष्ट आहे, घाना येथे स्वातंत्र्य संग्राम सुरू होता. त्यावेळच्या घाणा येथील राष्ट्रपतींनी पंडित नेहरू यांच्याकडे इंटेलिजन्स ब्युरो स्थापन करण्यासाठी मदत मागितली होती. भारताच्या तत्कालीन पंतप्रधानांनी काव यांना त्या कामासाठी निवडले होते. तिथे काही काळ काम केल्यानंतर त्यांनी फॉरेन सर्विस रिसर्च ब्युरोची स्थापना केली.
1965 च्या युद्धानंतर देशामध्ये अशा संस्थेची गरज भासू लागली जी मुख्यतः इतर देशांवर भारतासाठी लक्ष ठेवेल. त्याच्याआधी भारताला पूर्णपणे इंटेलिजन्स ब्युरो वरती अवलंबून रहावे लागत असे. 1968 रोजी इंदिरा गांधी यांनी अशा प्रकारची एक संस्था तयार करण्यात यावी असा निर्णय घेतला. जगातल्या प्रत्येक इंटेलिजन्स संस्थेचे अनॅलिसिस केल्यानंतर काव यांनी एक नवीन संस्था आणि त्याचा आराखडा तयार केला. त्या संस्थेचे नाव “रिसर्च अँड ऍनालीसीस विंग” (Research and Analysis Wing) असे मुद्दाम ठेवण्यात आले. हे नाव ठेवण्यात आले कारण या नावावरून ही संस्था गुप्तहेर संघटना वाटणार नाही आणि कोणाला या संस्थेच्या नावावरून शंकाही येणार नाही.
काव यांनी स्वतः 250 जणांची निवड या कामासाठी केली होती. वर्षभरामध्ये R&AW चे हे जाळे अमेरिका, इंग्लंड, युरोप आणि दक्षिण पूर्व आशिया मध्ये पसरले गेले. 1971 मध्ये जेव्हा पाकिस्तानी सैन्य पश्चिम पाकिस्तानमधील जनतेवरती अन्याय करत होते, तेव्हा लोक त्यांचा जीव वाचवण्यासाठी भारतामध्ये शरण घ्यायला आली. दुसरीकडे पाकिस्तान मात्र त्यांचे क्रौर्य कमी करत नव्हता. इंदिरा गांधी यांनी यावेळी काव यांच्या मदतीने अनेक निर्णय घेतले आणि प्रत्येक निर्णय यशस्वी करून दाखवला.
पूर्व पाकिस्तान मधील सर्व विमानांना भारताने भारतीय हद्दीतुन उड्डानास मनाई केली. असे म्हटले जाते की यासाठी काव यांनी R&AW च्या एका एजंटच्या मदतीने एक विमान हायजॅक केले होते आणि त्यांना काश्मीर मधील फुटीरतावादी नेत्यांची आेळख दिली होती. विमानातील प्रत्येक प्रवाशाला सुखरूप भारतामध्ये पोहोचवण्यात आले, पण ते विमान मात्र पाकिस्तानच्या विमानतळावरतीच उडवण्यात आले. यामुळे पाकिस्तानला भारताच्या क्षेत्रातून आपले लढाऊ विमान नेण्यास मज्जाव करण्यात आला.
काव यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्व पाकिस्तान म्हणजेच आजचा बांगलादेश मधील स्थानिक लोकांना गोरिला युद्ध पद्धतीसाठी प्रशिक्षित करण्यात आले आणि त्यांच्या या सैन्याला मुक्ति वाहिनी असे नावही देण्यात आले. या मुक्ती वाहिनीने आठ महिने पाकिस्तानी सैन्याला सळो की पळो करून सोडले होते. 1971 मध्ये बांगलादेशचे तत्कालीन पंतप्रधान शेख मुजीबुर रहमान यांच्या वरती प्राणघातक हल्ल्याचा कट तयार केला जात होता. त्यांना याबाबतीत सूचना दिल्या पण ते त्यांच्या सुरक्षेबाबत अगदी बेफिकीर असत आणि काहीच दिवसांमध्ये त्यांची हत्या करण्यात आली.
आर. एन. काव हे पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. जेव्हा मोरारजी देसाई यांचे सरकार अस्तित्वात आले तेव्हा काव यांनी राजीनामा दिला. 1980 मध्ये जेव्हा इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे स्वीकारली तेव्हा काव यांनी परत काम करण्यास सुरुवात केली. त्यांचे आयुष्य फारच थरारक गोष्टींनी भरलेले होते. त्यांच्या मित्रांनी त्यांना अनेक वेळेस आत्मचरित्र लिहिण्याचा आग्रह केला पण त्यांना त्यांचे आयुष्य गुप्त ठेवण्यातच आनंद मिळत असे. ते सार्वजनिक ठिकाणी ही खूप कमी जात असत. 2002 मध्ये 84 वर्षांचे असताना त्यांनी या जगाचा निरोप घेतला.