हे मराठी साम्राज्य, हे स्वराज्य तर स्वप्न होते शहाजींचे, या स्वप्नाला जपले जिजाऊंनी, हे स्वप्न शिवरायांमध्ये पेरले जिजाऊंनी आणि हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत शिवरायांच्या आणि समस्त मावळ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या त्या जिजाऊ !
प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते असे आपल्याकडे म्हटले जाते. याच्यावरून आपल्या कर्तृत्वामागे ‘स्त्री’ची भूमिका किती महत्वाची असते हे लक्षात येते. इतिहासात स्त्रियांनी पराक्रम केल्याची अनेक उदाहरणे आहेत, याहून अधिक उदाहरणे आहेत पुरुषांच्या पराक्रमांची पण या सर्व पुरुषांच्या पाठीशी, सोबत होती ती म्हणजे स्त्री ! मग ती पत्नी, आई, बहीण अशा अनेक रूपांत होती, पण सोबत होती.
साने गुरुजींची आई म्हणजेच श्यामची आई.. अगदी घराघरात पोहोचलेली आणि आपलीच वाटावी अशी हि आई. या आईने श्यामचा साने गुरुजी करून जगापुढे आदर्श ठेवला. अशीच एक अजून आई आपल्या महाराष्ट्रात झाली, ती आपलीसुद्धा आई म्हणून तिचा प्रेमाने आदरपूर्वक एकेरी उल्लेख करावा वाटतो. ती आई आहे जिजाऊ ! हे मराठी साम्राज्य, हे स्वराज्य तर स्वप्न होते शहाजींचे, या स्वप्नाला जपले जिजाऊंनी, हे स्वप्न शिवरायांमध्ये पेरले जिजाऊंनी आणि हे स्वप्न पूर्ण होईपर्यंत शिवरायांच्या आणि समस्त मावळ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभ्या राहिल्या त्या जिजाऊ ! जिजाऊंनी घडविला आपुला राजा शिवाजी, जिजाऊंनी दिली पोरक्या शंभुराजांना आईची आभाळमाया आणि शिवरायांचे स्वराज्यस्वप्न पुढे अखंडत्वाला घेऊन जाण्याचे धडे. प्रसंगी कठोर, तश्याच सौम्य आणि हळव्या मनाच्या जिजाऊंच्या जीवनात अशा अनेक छटा आहेत. आज आठवूया आपल्या मासाहेब जिजाऊंना !
पूर्वकहाणी
सिंदखेड नजीक देऊळगाव येथील लखुजीराव जाधव व गिरिजाबाई उर्फ म्हाळसाबाई यांच्या पोटी १२ जानेवारी १५९८ रोजी जिजाबाईंचा जन्म झाला. त्यांचे वडील हे सिंदखेडचे राजे आणि त्यांच्याकडे जवळपास २७ महालांची जहांगिरी होती. निजामशाहीत असतांना एके दिवशी लखुजींची नजर निजामशाहीतील एका उमद्या सरदाराकडे नजर गेली, त्या सरदाराने अनेकदा निजामशाही नेस्तनाभुत होण्यापासून वाचविली होती आणि ज्याच्या युद्धकौशल्याने आणि राजकीय चातुर्याने साऱ्यांचीच मने जिंकली होती. तो सरदार होता शहाजीराजे भोसले. लखुजी जाधवांनी आपल्या मुलीचे लग्न शहाजी राजांशी करण्याचा प्रस्ताव ठेवला आणि तो मान्य देखील झाला आणि अखेर इ.स १६१३ मध्ये जिजाबाई आणि शहाजी यांचा विवाह झाला.
जिजाबाईं व शहाजीराजे यांना एकूण ६ अपत्ये झाली परंतु त्यातील ४ अपत्ये नवजात असतांनाच वारली आणि २ अपत्ये मात्र सुखरूप जन्माला आली. इ.स १६२३ मध्ये संभाजी यांचा जन्म झाला आणि १६३० मध्ये शिवाजी यांचा जन्म झाला. शिवरायांच्या जन्माआधीच शहाजीराजानीं कर्नाटक गाठले परंतु काही राजकीय कारणांमुळे जिजाऊंना पुणे या आपल्या जहांगिरीवर शिवनेरी येथे मुक्कामाला ठेवले.
योगदान
शहाजीराजे कर्नाटकला गेले आणि सोबत संभाजीराजांना घेऊन गेले आणि पुण्यात जिजाबाईंना आपल्या विश्वासू माणसांच्या सानिध्यात शिवनेरीवर ठेवले. १६३० मध्ये शिवनेरीवर शिवरायांचा जन्म झाला. जिजाऊ आणि शिवराय गडावर आणि पती व दुसरा मुलगा अनेक मैल दूर असे असतांना खचून न जात जिजाऊंनी शहाजीराजांचे स्वराज्यस्वप्न उराशी बाळगले आणि शिवरायांमध्ये या स्वप्नाचे बीज अगदी लहानपणापासून पेरले. शिवाजी हा शहाजी राजांचा मुलगा, जसे शहाजींनी केले तसेच शिवाजी निजामशाही किंवा इतर घराण्यांत चाकरी करतील अशी सर्वांची समजूत, परंतु जिजाऊंच्या मनात काही औरच होते…
जिजाऊंना शिवबा हवा होता एक राजा म्हणून, स्वतःच्या आणि रयतेच्या स्वराज्याचा राजा. जिजाऊंचे हेच सर्वात मोठे योगदान आहे कि त्यांनी शिवाजी घडविला. लहानपणापासून रामायण आणि महाभारत यांतील गोष्टी सांगून जिजाऊंनी शिवरायांवर उत्तम संस्कार केले, राजकारण, शास्त्र, शस्त्र आणि अशा अनेक कौशल्यांत शिवरायांना हट्टाने कुशल केले. जिजाबाई व शिवराय यांच्या अशाच एका गोष्टीवर आपण नजर टाकू.
कहाणी
शहाजीराजे आपल्या दुसऱ्या पत्नी तुकाईसाहेब आणि संभाजी यांच्यासोबत कर्नाटकात होते. अनेक वर्षे त्यांनी जिजाबाईंना आणि शिवरायांना पाहिले देखील नव्हते. शिवराय साधारण १० वर्षाचे असतांना शहाजीराजांनी जिजाऊंना आणि शिवरायांना कर्नाटकात बोलाविणे पाठविले आणि शिवराय आपल्या आईसोबत वडिलांना भेटायला निघाले. तेथील किस्सा असा कि, शिवाजी, संभाजी या भावंडांची चांगलीच गट्टी जमली. दादा महाराज छोट्या शिवरायांना घेऊन आपले राज्य आणि आजूबाजूचा प्रदेश दाखवीत आणि खूप मज्जा करीत. एके दिवशी रात्र झाली तरी शिवरायांचा थांगपत्ता लागत नव्हता, जिजाऊ काळजीने बेजार झाल्या होत्या त्यांनी शेवटी आपली काही माणसे पाठवून शिवरायांना शोधून आणा असा हुकूम दिला.
काही वेळाने त्यांना खबर लागली कि शिवाजीराजे चक्क संभाजीराजांसोबत नृत्यांगनांचा नाच पाहण्यात व्यस्त आहेत, हे ऐकून रागाने लालबुंद होऊन जिजाऊंनी शिवरायांना आपल्या समोर हजार करण्याचा हुकूम सोडला आणि ताबडतोब शिवराय हजार झाले. आपण केलेलं कृत्य हे एका राजाच्या मुलाला शोभेल असेच आहे या अविर्भावात शिवराय आईसमोर उभे होते परंतु आईसाहेबांनी मात्र तिखट शब्दांत शिवरायांची कानउघाडणी केली आणि या पुढे ‘नाचगाणी’ वगैरे प्रकार टाळावे अशी सक्त ताकीद त्यांनी दिली.
तुकाईसाहेब यावर जिजाऊंना म्हणाल्या ताईसाहेब अहो शहाजीराजे येथील राजे आहेत, अफाट श्रीमंती आणि दरारा आहे त्यांचा आणि राजाने व राजघराण्यातील मुलांनी असे प्रकार केल्याने काहीही फरक पडत नाही, अहो राजाची मुलं ती.. हे प्रकार चालायचेच. यावर संतापून जिजाऊंनी सांगितले, हे प्रकार तुम्हाला मान्य असतील परंतु एक राजा असला तरीही राजाच्या मुलाने हे असे प्रकार करणे एकंदरीतच त्यांच्या प्रतिमेला शोभत नाही आणि मलाही ते आवडत नाही. (मूळ प्रसंग: श्रीमान योगी, रणजीत देसाई)
अशी तिखट कानउघाडणी झाल्यापासून शिवरायांनी जो धडा घेतला तो मरेपर्यंत लक्षात ठेवला आणि इथूनच कदाचित ‘स्त्री’चा आदर करणे हा गुण शिवरायांमध्ये पेरला गेला असावा. म्हणूनच कल्याणच्या नवाबाची बेगम कैद करून शिवरायांपुढे पेश केल्यावर “अशीच आमुची आई असती असेच सुंदर आम्हीही निपजलो असतो” असे उद्गार शिवरायांच्या मुखी आले. हा सारा त्या लहानपणी मिलेल्या शिकवणीचा परिणाम ! शिवरायांच्या अनुपस्थितीत अनेकवेळा स्वराज्याचा कारभार स्वतः जिजाबाईंनी पहिला, अनेकवेळा न्यायनिवाडे केले आणि लहानपणापासूनच शिवरायांना योग्य न्याय करण्याचे धडे देखील दिले. यामुळेच कदाचित स्वराज्यात कोणाही माणसावर कधी अन्याय झाला नाही. हि सारी माँसाहेबांची कृपा !
अस्त
६ जुन १६७४ रोजी शिवरायांचा स्वराज्याचे छत्रपती म्हणून राज्याभिषेक झाला आणि जिजाऊंच्या स्वप्नातील स्वराज्य खऱ्या अर्थाने उभे राहिले आणि त्याला अधिकृत मान्यता प्राप्त झाली. जिजाऊंचा पुत्र, आपले शिवाजीराजे छत्रपती झाले… आपल्या वडिलांनी पाहिलेले आणि आईने उराशी बाळगलेले स्वप्न प्रत्यक्षात उतरविणे यापेक्षा मोठी भेट एका मुलाने आपल्या जन्मदात्यांना काय द्यावी ? सारे स्वराज्य, राज्यातील नद्या, डोंगर आणि सारा आसमंत आनंदात असतांना या आनंदाला मात्र गालबोट लागले. हा राज्याभिषेकाचा आनंद ताजातवाना असतांनाच अचानक रायगडाच्या पायथ्याशी पाचाड या गावात वयाच्या ८० व्या वर्षी जिजाऊंनी शिवरायांना, शंभुराजांना, साऱ्या मावळ्यांना आणि समस्त हिंदवी स्वराज्याला पोरकं करून १७ जून १६७४ रोजी अखेरचा श्वास घेतला.
राज्याभिषेकानंतर राजे छत्रपती झाले, राजांच्या डोक्यावर कापडी छत्र धरले गेले परंतु त्यांच्या जन्माआधीपासून त्यांच्या डोक्यावर असलेले मायेचे आणि हक्काचे छत्र मात्र निरोप घेऊन गेले आणि महाराज पोरके झाले. समस्त स्वराज्यावरील एक मायेचे छत्र हरपले, एक आदर्श आई, पत्नी, राजमाता आणि प्रसंगी सर्वोत्तम सल्लागार काळाने पडद्याआड केली.
हि एक आणि अशा अनेक कथा आपल्याला जिजाबाईंचे योगदान सांगून जातात. ‘शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात’, अशी एक गलिच्छ म्हण आपल्याकडे आहे. मी म्हणेन कि शिवाजी प्रत्येकाच्या घरात जन्माला यायला हवा, पण शिवाजी जन्माला येण्याआधी प्रत्येक माउलीने जिजाऊदेखील व्हायला हवे… कारण जिजाऊंमुळे शिवाजी घडले आणि जिजाऊंच्याच शिकवणीने शिवरायांनी अनेक अशक्य कामे शक्य करून दाखविली आणि इतिहासात स्वतःला अजरामर केले. शिवाजी घडले नाही… आपण असे म्हणूया कि शिवाजी घडविले गेले आणि ते सारे श्रेय जाते आपल्या आईला म्हणजेच राजमाता जिजाऊ यांना. अशा माझ्या, तुमच्या आणि महाराष्ट्राच्या या लाडक्या आईच्या आठवणींना उजाळा देत मनापासून आईसाहेबांना मनाचा मुजरा!!!