रामविलास पासवान यांना अगदी बिहारचे शरद पवार म्हणाल तरी अयोग्य ठरणार नाही, कारण सरकार कुठल्याही पक्षाचा असो पासवान मंत्री होणारच ही काळ्या दगडावरची रेघ.
राजकारण भविष्यकाळात कुठल्या दिशेला वळू शकते याचा अचूक अंदाज घेऊ शकतात ते म्हणजे रामविलास पासवान. बिहार विधानसभेचे राजकारण करता करता ते केव्हा केंद्रीय राजकारणामध्ये गेले याचा कोणाला मागमूसही लागला नाही. 1969 पासून ते 2019 पर्यंत रामविलास पासवान केंद्रात कुठल्या ना कुठल्या तरी पदावर आहेतच.
गेल्या पन्नास वर्षांपासून रामविलास पासवान कुठल्या तरी पदावर विराजमान असल्याचे आपणाला दिसून येते. 1969 ला रामविलासजी पहिल्यांदा बिहार मधून आमदार म्हणून निवडून आले, त्यानंतर 1977 ला त्यांनी हाजीपुर मधून खासदारकीची निवडणूक जिंकली, तेव्हा ते मोरारजी देसाई यांच्या केंद्रीय सरकारमध्ये मंत्री राहिले. तेव्हापासून ते आजपर्यंत रामविलासजी कुठलेही सरकार असो पण सरकारचा अभिन्न भाग राहिलेले आहेत.
रामविलास पासवान यांनी 2019 च्या मोदी सरकार मध्येही मंत्रिपदाची शपथ घेतली. पासवान यांनी मोदींसहित एकूण सहा पंतप्रधानांसोबत काम केलेले आहे. पासवान यांनी व्ही पी सिंग, एच डी देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग, नरेंद्र मोदी या दिग्गज पंतप्रधानांसोबत त्यांनी काम केलेले आहे.
1975 मध्ये काँग्रेसने देशावरती आणीबाणी लादली. या आणीबाणीच्या काळामध्ये अनेक नेत्यांना अटक झाली. रामविलास पासवान यांनाही आणीबाणीचा पूर्ण काळ कारागृहात काढावा लागला होता. 1977 मध्ये त्यांना कारागृहातून सोडण्यात आले. 1977 साली रामविलास पासवान यांनी जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
1977 मध्ये त्यांनी हाजीपुर मधून प्रचंड मतांनी विजय प्राप्त केला. त्या विजयाबद्दल त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले. त्यानंतर मात्र रामविलास पासवान यांनी राजकारणात कधीच मागे वळून बघितले नाही. अनेक पक्षांचा अनुभव घेतल्यानंतर आणि त्या पक्षांमध्ये राहून निष्ठेने काम केल्यानंतर 28 नोव्हेंबर 2000 ला त्यांनी दिल्लीमध्ये लोक जनशक्ती पार्टी या पक्षाची स्थापना केली.
व्ही पी सिंग यांच्या कॅबिनेट मध्ये त्यांनी श्रममंत्री म्हणून कार्यभार पाहिला. इंद्रकुमार गुजराल आणि एचडी देवे गोवडा यांच्या सरकारमध्ये त्यांनी रेल्वे मंत्री आणि संचार मंत्री म्हणून कार्यभार पाहिला. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये त्यांना कोळसामंत्री ही जबाबदारी देण्यात आली. पुढे काही कारणास्तव त्यांनी भाजपप्रणित सरकार मधून राजीनामा दिला आणि परत काँग्रेस प्रणित सरकारमध्ये जबाबदारी स्वीकारली.
पासवान यांचे राजकीय आयुष्य फार गुंतागुंतीचे राहिलेले आहे, तरीही एक सामान्य कुटुंबातून आलेल्या या नेत्याने आपल्या राजकीय आयुष्यामध्ये अनन्यसाधारण यश प्राप्त केले आहे. रामविलासजी याहीपुढे आयुष्यामध्ये अनेक जबाबदाऱ्या पार पाडत राहोत हीच सदिच्छा.