“सचिन ” “सचिन” असा जयघोष पूर्वी सुद्धा स्टेडियममध्ये गुंजायचा आणि आजही मैदानावर कुठलाही खेळाडू असला तरी सचिन जर स्टेडियममध्ये असेल तर हाच जयघोष दुमदुमतो. हा सचिन म्हणजे भारतातील क्रिकेट रसिकांचं आराध्यदैवत ‘सचिन रमेश तेंडुलकर’. ह्याचा जन्म २४ एप्रिल १९७३ चा, त्याचे वडील रमेश तेंडुलकर हे गाजलेले साहित्यिक. त्यांची लेखणी उचलण्याऐवजी सचिनने बॅट उचलली आणि भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले.
कसोटी आणि एक दिवसीय सामन्यात मिळून शंभर शतकं, एक दिवसीय सामन्यात २०० धावा करणारा पहिला क्रिकेटपटू, २०० सामने खेळणारा एकमेव खेळाडू आणि ३४३५७ धावा असे असंख्य विक्रम त्याच्या नावावर आहेत. समोरच्या संघाला आपण फोडू शकतो आणि जिंकू शकतो हा आत्मविश्वास सचिनने भारतीय क्रिकेटपटूंना दिला.
सचिनच्या घरातलं वातावरण खरंतर सरस्वती पूजकाचं. घरात खेळाचं वातावरण फारसं नव्हतं पण सचिनमधले गुण हेरले त्याच्या भावाने म्हणजेच अजितने. घरच्यांनीही सचिनला क्रिकेट खेळायला आडकाठी केली नाही, उलट त्याची आवड जोपासली, त्याला प्रोत्साहन दिले. क्रिकेट खेळण्यासाठी त्याने शारदाश्रम शाळेत प्रवेश घेतला. मग तो रमाकांत आचरेकरांच्या मार्गदर्शनाखाली खेळू लागला.
त्याचं फलंदाजीतील कौशल्य जाणकारांच्या नजरेत भरलं आणि अवघ्या सोळाव्या वर्षी त्याला भारताचं प्रतिनिधित्व करण्याची नामी संधी मिळाली, तीही पाकिस्तानविरुध्द. वसिम अक्रम, इम्रान खान, वकार युनुस असा जबरदस्त तोफखाना पाकिस्तानकडे होता. पहिल्या टेस्टमध्ये त्याच्या धावा होत्या अवघ्या १५. अब्दुल कादिरने तर त्याला बच्चा समजून त्याच्या गोलंदाजीवर षटकार मारण्याचं आव्हान दिलं आणि सचिनने त्याचा चेंडू स्टेडियममध्ये भिरकावून दिला. त्यानंतर मात्र सचिनने मागे वळून पाहिले नाही.
जेव्हा जेव्हा भारतीय संघ संकटात सापडला तेव्हा सचिन पाय रोवून उभा राहिला. एक हाती सामने त्याने जिंकून दिले. शारजातली त्याची ऑस्ट्रेलियाविरुद्धची १३४ धावांची वादळी खेळी कोण विसरेल ? शेन वॉर्नने तर कबूल केले की झोपेत देखील सचिन त्याला झोडपतोय अशी स्वप्न त्याला पडायची. म्हणूनच असं म्हंटल जायचं की सामना वाचवायचा असेल तर सुनिल गावस्कर आणि सामना जिंकुन दयायचा असेल तर सचिन तेंडूलकरशिवाय पर्याय नाही.
तो काळ असा होता की सचिन बॅटिंगसाठी मैदानात उतरला की टिव्ही लावला जायचा आणि तो बाद झाला की टिव्हि बंद केला जायचा. सचिनने कधीही मैदानावर अपशब्द वापरले नाहीत. ग्लेन मॅकग्रा, वसिम अक्रम, शेन वॉर्न त्याला डिवचायचे तेव्हाही तो अविचल असायचा. त्याने त्यांना आपल्या बॅटीनेच चोख उत्तर दिले. क्रिक्रेट हा सभ्य गृहस्थाचा खेळ आहे हे सचिनकडे पाहिल्यावर पुरेपुर पटतं. सचिनला खरंतर वेगवान गोलंदाज व्हायचं होतं पण तो झाला फलंदाज. तरीही जेव्हा जेव्हा कर्णधाराने गोलंदाजासाठी त्याच्या हातात चेंडू सोपवला तेव्हा तेव्हा त्याने कर्णधारचा विश्वास सार्थ ठरवला. संघाला जेव्हा जेव्हा गरज भासली तेव्हा त्याने हुकमी विकेटस काढल्या.
सचिन तेंडुलकर हा सर्वोत्तम फलंदाज आहे हे केवळ त्याचं वैशिष्ठ्य नाही तर त्याने फक्त अंगभूत गुणांवर अवलंबून राहता, कठोर मेहनत आणि खेळासाठी स्वत:ला झोकून देण कधीही सोडलं नाही हा त्याचा मोठेपणा आहे. सचिन तेंडूलकर हा कायमच तरुण क्रिकेटर्सचा आदर्श राहिला आहे. अगदी राहुल द्रविड, एम.एस. धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली यांचं तो प्रेरणास्थान आहे. बंगळूरमध्ये T-20 सामन्यात विराट कोहलीने अर्धशतक काढल्यावर वाकून ह्या क्रिकेटच्या दैवताला अभिवादन केले आणि आदरांजली वाहिली.
आज सचिनमुळेच क्रिक्रेट हा जगात दुसऱ्या क्रमांकांचा खेळ बनला आहे. सचिन मैदानाबाहेरही कायम कार्यरत राहिला आहे. क्रिकेटला जागतिक मान्यता मिळावी ह्यासाठी त्याने अमेरिकेत क्रिकेट सामने घडवून आणले. सचिन हा खऱ्या अर्थाने क्रिकेटचा राजदूत आहे असं म्हणता येईल. “अरे ! हा तर हुबेहुब माझ्यासारखा खेळतो” हे उद्गार आहेत सर डॉन ब्रॅडमन ह्यांचे. सचिनसाठी याहुन अधिक अभिमानाची गोष्ट काय असेल ?
२०१३ साली वेस्टइंडिज विरुध्द ७४ धावा काढून सचिन जेव्हा निवृत्त झाला तेव्हा अवघे क्रिकेटविश्व हळहळलं. स्टेडियममधील भारतातील प्रत्येक व्यक्तिच्या डोळ्यात अश्रू होते. सगळ स्टेडीयम स्तब्ध झालं होतं. प्रत्येकाला असं वाटत असेल हा क्षण गोठून जावा आणि सचिन कायम खेळतच रहावा. अशा ह्या आपल्या लाडक्या सचिनला भारतरत्न हा सर्वोच्च सन्मानाने गौरवले गेले. सचिन तेंडुलकरने केवळ आपल्या खेळाचंच योगदान दिलं असं नाही तर सामाजिक कार्यक्रमातही तो नेहमीच आघाडीवर राहिला आहे. पूरग्रस्तांना मदत असो, गरीब मुलांच्या शिक्षणाचा खर्च असो, सचिनने नेहमीच मदत करुन समाजऋण फेडले आहे आणि ते ही कुठेही वाच्यता न करता. ह्या २५ एप्रिलला सचिन ४७ व्या वर्षात पदार्पण करेल. आपल्या लाडक्या सचिनला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा !