शंभूराजांच्या मृत्यूनंतर १६९२ साली शंकराजी नारायण यांनी सिंहगड स्वराज्यात आणण्यासाठी मोहीम आखली पण ती मोहीम फसली. परंतु एक प्रयत्न फसल्याने मराठे हार मानणारे नव्हते.
स्वकीयांनी केलेली गद्दारी व त्यामुळे शंभूराजेंचा झालेला मृत्यू ह्यामुळे स्वराज्याला फार मोठा धक्का बसला होता. मुघल बादशाहा औरंगजेब तर स्वराज्याचा घास घेण्यासाठी टपून बसलेलाच होता. शंभूराजेंच्या मृत्यूमुळे मराठ्यांचे बळ क्षीण झाले होते. ह्याचाच फायदा मुघलांनी घेतला. स्वराज्यातील अत्यंत महत्वाचे किल्ले त्यांनी आपल्या ताब्यात घेण्याचा सपाटा लावला होता. शंभूराजेंच्या मृत्यूनंतर छत्रपती राजारामराजे ह्यांनी स्वराज्याची धुरा आपल्या हाती घेतली. त्यावेळी राजाराम राजे जिंजीमध्ये होते.
मुघल आपल्या स्वराज्यातील एकेक महत्वाचा किल्ला घेत होते हि बाब राजाराम राजेंच्या मनाला वेदना देणारी होती, कारण मुघलांनी घेतलेल्या किल्यांमध्ये सिंहगड, राजगड लोहगड असे अनेक किल्ले होते. हे सर्व किल्ले मराठा साम्राज्यासाठी अत्यंत महत्वाचे होते. कारण ह्यामुळेच मराठ्यांना सबंध हिंदुस्थानावर लक्ष ठेवणे शक्य होत असे. मुघलांच्या ताब्यात असलेल्या अनेक किल्यांमध्ये अत्यंत महत्वाचा किल्ला होता सिहंगड.
तानाजी मालुसरे ह्यांचे बलिदान व मराठ्यांचे शर्थीचे प्रयत्न ह्यामुळे सिहंगडासारखा अत्यंत अभेद्य व बळकट किल्ला स्वराज्यात सामील झाला होता. ह्या कोंढाणा किल्ल्याचे नाव सिहंगड ठेवण्यात आले ज्यामुळे तानाजी मालुसरे ह्यांच्या बलिदानाचे समस्त महाराष्ट्राला सदैव स्मरण राहील. पण असा किल्ला मुघलांच्या हाती असणे स्वराज्याला परवडणारे नव्हते व म्हणूनच राजाराम महाराजांच्या आदेशावरून स्वराज्याच्या कारभारी मंडळींनी सिहंगड पुन्हा स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न चालवले.
१६९२ साली शंकराजी नारायण ह्या स्वराज्यातील एका अत्यंत मातब्बर शिलेदाराच्या नेतृत्वाखाली सिहंगड फत्ते करण्याची मोहीम आखण्यात आली. ठरल्याप्रमाणे रात्रीच्या अंधारात गडाच्या कड्यावरून चढाई करून किल्ल्याच्या आतील भागात घुसून किल्ला काबीज करण्याचा प्रयत्न मराठा मावळ्यांनी केला. पण जसा स्वराज्यासाठी सिहंगड महत्वाचा होता तसाच तो मुघलांसाठीही महत्वाचा होता व त्यामुळे ह्या किल्ल्यावर जादा मुघल सैनिक तैनात करण्यात आले होते. परिस्थितीचा अंदाज न आल्याने नाईलाजाने शंकराजी नारायण ह्यांना माघार घ्यावी लागली.
सिहंगड काबीज करण्याचा एक प्रयत्न जरूर फसला होता, परंतु एक प्रयत्न फसल्याने मराठे हार मानणारे नव्हते. शंकराजी पंतांनी पुढच्याच वर्षी म्हणजे १६९३ साली पुन्हा एकदा सिहंगड काबीज करण्यासाठी मोहीम आखली. ह्यावेळी त्यांनी सरदार नावजी बलकवडे आणि विठोजी करके ह्यांची नियुक्ती केली. नावजी बलकवडे हे स्वराज्याच्या पायदळाचे पाच हजारी मनसबदार होते. ते अतिशय शूर व पराक्रमी होते पण सिहंगड फत्ते करण्याची मोहीमसुद्धा तेवढीच अवघड होती हे शंकराजी पंतांना माहित होते.
सिहंगड जिंकण्यास अवघड असण्याचे कारण म्हणजे गडाच्या आसपास असणारी अवघड अशी भौगोलिक परिस्थिती. त्यामुळेच त्यांनी नावजी बालकवडेंच्या साथीला सरदार विठोजी कारके ह्यांना पाठवले. मागील वर्षी म्हणजेच १६९२ साली मराठ्यांनी सिहंगड काबीज करण्याचा प्रयत्न केला होता व त्यामुळे गडावरील मुघल सैन्य जास्तच सावध झालेले होते. किल्यावर धावा बोलण्यापूर्वी किल्याची भौगोलिक माहिती घेणे आवश्यक होते. त्यामुळे नावजी व विठोजी ह्यांनी अतिशय गुप्ततेने किल्याची टेहळणी केली. किल्ला चढून किल्ल्याच्या आत कसे शिरायचे ह्याचे नियोजन केले.
३० जूनच्या रात्री मराठ्यांनी पुन्हा एकदा सिहंगड काबीज करण्यासाठी प्रस्थान केले. ३० जूनच्या त्या रात्री स्वराज्याचे सर्व मावळे नावजी बलकवडे व विठोजी करके ह्यांच्या नेतृत्वाखाली राजमाची इथे एकत्र आले. निवडक मावळ्यांना घेऊन नावजी आणि विठोजी सिहंगडाच्या पायथ्याशी असलेल्या गर्द झाडीत दबा धरून बसले. कडे चढण्यात निपुण असलेले काही मावळे वाऱ्याच्या वेगाने कडा चढून किल्यामध्ये घुसले. किल्याच्या आतील भागात प्रवेश करताच त्यांनी खाली जमलेल्या इतर मावळयांची किल्ल्यात येण्याची व्यवस्था केली. इतर मावळ्यांसोबत नावजी बलकवडेंनीसुद्धा किल्याच्या आतील भागात प्रवेश केला.
मुघल सैन्य संख्येने जास्त असणार ह्याचा अंदाज नावजींना आधीच आला होता. किल्यावरील मुघल सैन्यामध्ये गोंधळ उडावा व सैन्य सैरवैर व्हावे ह्यासाठी मराठ्यांनी मुद्दाम मोठमोठ्या आवाजात व हर हर महादेव घोषणा देत मुघलांवर हल्ला चढवला. मराठ्यांनी मुद्दाम निर्माण केलेला गोंधळ व मोठ्या आवाजात दिलेल्या घोषणा ह्यामुळे मुघलांच्या गोटात गोंधळ माजला. आधीच दाट काळोख व त्यात मराठयांनी केलेला गोंधळ ह्यामुळे मुघलांना मराठा सैन्याच्या संख्येचा अंदाजच येऊ शकला नाही. गोंधळलेल्या मुघल सैनिकांची कत्तल मराठा मावळ्यांनी चालू केली. मुघलांचे सैन्य संख्येने जास्त असूनसुद्धा मराठा मावळ्यांनी मुघलांचा धुव्वा उडवला. मोहीम फत्ते झाली.
१ जुलै १९९३ साली तानाजी मालुसरेंच्या बलिदानाने पावन झालेला सिहंगड पुन्हा एकदा स्वराज्यात सामील झाला. छत्रपती राजारामराजेंना हि विजयाची वार्ता समजताच त्यांना अतिशय आनंद झाला कारण सिहंगड पुन्हा स्वराज्यात सामील होणे हे फार मोठे यश होते. स्वराज्याच्या मावळ्यांनी मोठाच पराक्रम गाजवला होता. भर पावसाळ्याच्या दिवसांत सिहंगडाची अतिशय कठीण मोहीम फत्ते झाली होती. सरदार नावजी बलकवडेंनी अतिशय हुशारीने हि मोहीम फत्ते केली होती. कारण, सरदार बलकवडेंनी अशी योजना आखली होती ज्यामुळे सिहंगडाच्या मुघल किल्लेदाराला थांगपत्ताच लागला नाही कि मराठ्यांचे सैन्य किल्याच्या आत घुसले आहे. सरदार नावजी बालकवडे व सर्व मावळ्यांच्या पराक्रमामुळे सिहंगड पुन्हा स्वराज्याचा भाग बनला व १ जुलै हा दिवस सिहंगड विजय दिवस म्हणून इतिहासात कोरला गेला.
नावजो बलकवडे व विठोबा कारके खुपच अप्रतिम इतिहास वाचायला मिळाला याचे वंशज चे पत्ता व मोबाईल नंबर मिळेल का
Correction- १९९३ नाही तर , १६९३ आहे ते
१ जुलै १६९३ साली तानाजी मालुसरेंच्या बलिदानाने पावन झालेला सिहंगड पुन्हा एकदा स्वराज्यात सामील झाला.