सुरेश कलमाडी यांचा जन्म 1 मे 1944 रोजी पुण्यातील एका सधन कुटुंबामध्ये झाला होता. त्यांचे वडील डॉक्टर के शामराव कलमाडी यांचे पुण्यामध्ये मोठे प्रस्थ होते. त्यांच्या आईचे नाव शांताबाई कलमाडी असे आहे.
सुरेश कलमाडी यांचे शालेय शिक्षण सेंट हायस्कूल येथे झालेले असून त्यांचे कॉलेजमधील शिक्षण फर्ग्युसन काँलेज या पुण्यातील एका नामवंत कॉलेजमधून पूर्ण झालेले आहे. त्यानंतर कॉलेजमध्ये असताना कलमाडी यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमीची परीक्षा पूर्ण करत तिथे प्रवेश मिळवला. तेथील शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1960 रोजी त्यांना भारतीय वायू दलात पायलट म्हणून काम करण्याची संधी प्राप्त झाली. 1964 ते 1972 पर्यंत त्यांनी पायलट म्हणून भारताची सेवा केली. त्यानंतर मात्र त्यांनी एनडीए म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकादमी येथे विद्यार्थ्यांना पायलट होण्यासाठी ट्रेनिंग देणे पसंत केले. 1974 रोजी त्यांनी भारतीय वायुसेनेतुन निवृत्ती घेतली. निवृत्त होताना त्यांच्याकडे स्क्वॉड्रन लीडर अशी जबाबदारी होती.
सुरेश कलमाडी यांनी मीरा कलमाडी यांच्याशी विवाह केलेला आहे. या दांपत्याला एकूण तीन अपत्य आहेत, त्यातील दोन मुली असून एक मुलगा आहे. सुरेश कलमाडी यांनी पायलट म्हणून जबाबदारी पार पाडत असताना आपल्या कर्तव्यात कसलीही कसूर होऊ दिली नाही. म्हणूनच देशाची सेवा केल्यानंतरही जनतेने त्यांना समाजसेवा करण्याची आणखी संधी दिली होती.
सुरेश कलमाडी जेव्हा कॉलेज जीवन जगत होते तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये समाजसेवेची प्रचंड आवड होती. त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये समाजसेवेसाठी कष्ट झेलले होते. 1977 मध्ये म्हणजे त्यांच्या रिटायरमेंट नंतर त्यांना इंडियन युथ काँग्रेस पुणे या संघटनेचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले. कलमाडी यांच्या समाजसेवेला त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. त्यांची समाजसेवेची आवड बघता पुढच्याच वर्षी त्यांना युथ काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली. 1980 पर्यंत ही जबाबदारी सुरेश कलमाडी यांच्याकडे होती.
त्यानंतर मात्र त्यांनी महाराष्ट्र अथलेटीक असोसिएशन प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. सुरेश कलमाडी स्वतः उपस्थित राहून उमेदवारांची चाचणी घेत असत. मॉस्कोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक्समध्ये त्यांनी निवडलेल्या उमेदवारांनी चांगली कामगिरी बजावली होती. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांना लवकरच पुणे इंटरनॅशनल मॅरेथॉन या संघटनेचे अध्यक्षपद बहाल करण्यात आले.
सुरेश कलमाडी यांनी राज्यसभेत पुण्याची बाजू अनेक वेळेस मांडलेली आहे. 1982 ते 1996 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते त्यानंतर 1998 रोजी सुरेश कलमाडी यांची फेरनिवड राज्यसभेवरती करण्यात आली होती. पुणे फेस्टिव्हलची सुरुवातही सुरेश कलमाडी यांनीच केलेली आहे. 1989 मध्ये जेव्हा ते महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे सदस्य होते त्यावेळी त्यांनी ही कल्पना अस्तित्वात आणली होती.
1996 रोजी त्यांनी पुण्यामधून लोकसभा लढवत विजय प्राप्त केला होता. नंतर, 2004 मध्ये ही त्यांना लोकसभा निवडणूक लढण्याची संधी प्राप्त झाली होती. त्यांनी त्या संधीचे सोने करून दाखवले. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या सरकारमध्ये सुरेश कलमाडी यांच्याकडे रेल्वे खात्याचे राज्यमंत्री पद देण्यात आले होते.
क्रीडा क्षेत्रामध्ये हे कलमाडी यांचे योगदान अमुलाग्र राहिलेले आहे. पुढे त्यांच्यावर अनेक आरोप झाले पण तरीही त्यांचे योगदान लक्षात येण्याजोगे नक्कीच आहे. 1996 पासून ते 2012 पर्यंत सुरेश कलमाडी यांच्याकडे इंडियन ओलंपिक असोसिएशनचे अध्यक्षपद देण्यात आले होते. तर 2000 ते 2013 पर्यंत एशियन ॲथलेटिक असोसिएशनचे अध्यक्ष होते. 2015 मध्ये त्यांना या संघटनेचे आजीवन सदस्यत्व देण्यात आले होते.
प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये चांगल्या काळाबरोबरच वाईट काळही असतोच सुरेश कलमाडी यांच्यावरही अनेक आरोप करण्यात आले. 2011च्या एका स्पर्धेच्या आयोजनामध्ये भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी यांच्यावरती करण्यात आला होता, कारण ज्या कंपनीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली त्या कंपनीचे डायरेक्टर सुरेश कलमाडी यांचा मुलगा होता. यासोबतच 2010 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्स मध्येही भ्रष्टाचार केल्याचा आरोप सुरेश कलमाडी यांच्यावरती केला जात आहे.
हे प्रकरण प्रचंड गाजले, या प्रकरणाची चौकशी बसवण्यात आली. चौकशीअंती 25 एप्रिल 2011 ला सीबीआयने कलमाडी यांना अटक केली. त्यांच्यावरती त्यानंतर अनेक आरोप करण्यात आले. त्यांना अटक झाल्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले. त्यानंतर 26 एप्रिल 2011 ला त्यांना ईतरही अनेक संघटनांच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले. सुरेश कलमाडी त्यानंतर जवळपास दहा महिने कारावासात होते. त्यानंतर त्यांना जामीन देण्यात आला.
त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी नकार दिला. सुप्रीम कोर्टाचे म्हणणे होते की जर कलमाडी यांच्यावर आरोप झाले असतील तर त्यांनी तिथे जाणे देशाच्या प्रतिमेसाठी चांगली गोष्ट नाही.