माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ह्यांचे अकाली निधन सर्वांसाठीच धक्कादायक व दुःखद आहे. आजवर पक्षाने त्यांना दिलेली प्रत्येक जबाबदारी त्यांनी मोठ्या हिमतीने पार पाडली होती. नुकतीच झालेली लोकसभा निवडणूक मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी लढवली नव्हती. मोदी सरकाराच्या मागील कार्यकाळात परराष्ट्र खात्याचा कारभार त्यांनी अतिशय उत्तमरीत्या सांभाळला. परदेशात राहणाऱ्या कोणत्याही भारतीय व्यक्तीस मदत हवी असेल तर ती व्यक्ती सुषमा स्वराज ह्यांच्याकडे फक्त एका ट्विटद्वारे मदत मागत असे आणि सुषमाजी लगेच त्या गरजू व्यक्तीची मदत करत असत.
राजकीय जीवनात अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पडणाऱ्या सुषमा स्वराज ह्यांचे खासगी आयुष्य, त्यांचा परिवार, त्यांचे लग्न ह्याविषयी त्यांचे चाहते आज आठवण काढतांना दिसत आहेत. त्यांचे निकटवर्तीय सुद्धा त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देत आहेत. त्यांच्या राजकीय कारकिर्दीविषयी चर्चा करतांनाच त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक आठवणी आज ताज्या होत आहेत.
कसे झाले सुषमा स्वराज आणि कौशल स्वराज ह्यांचे लग्न
सुषमा स्वराज ह्यांचा विवाह १३ जुलै १९७५ साली कौशल स्वराज ह्यांच्याशी झाला होता. सुषमा स्वराज आणि कौशल स्वराज ह्यांनी प्रेमविवाह केला होता हे फार कमी लोकांना माहित आहे. चंदीगढ इथे कॉलेजमध्ये सुषमाजी व कौशल स्वराज एकत्र शिक्षण घेत होते तेव्हा ह्या दोघांची प्रथम ओळख झाली, मग मैत्री व ह्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात झाले. जेव्हा सुषमाजींनी आपल्या वडिलांना आपल्या व कौशल ह्यांच्या प्रेमसंबंधाबद्दल सांगितले तेंव्हा ते खूप नाराज झाले होते. पण मुलीच्या प्रेमाखातर त्यांनी कौशल स्वराज व सुषमाजींच्या विवाहास मान्यता दिली.
कोण आहेत कौशल स्वराज
स्वराज हे त्याकाळी एक प्रसिद्ध वकील म्हणून नावारूपाला आले होते. वयाच्या केवळ ३४ व्या वर्षी कौशल स्वराज ऍडव्होकेट जनरल बनले होते. १९९९ ते २००४ ह्या काळात ते खासदार म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. ह्याशिवाय १९९० ते १९९३ ह्या काळात त्यांनी मिझोरमचे राज्यपाल म्हणूनही काम पाहिले होते.
आपण लेखक आहात, लिहिण्याचा छंद आहे किंवा इतर कोणतीही माहिती आमच्या सोबत शेअर करण्यासाठी info@uniksone.com वर ई-मेल करा.