स्कायलॅबचे वजन ७८ टन व आकार तब्बल ९ मजली इमारती एवढा होता आणि प्रत्येक भारतीय आपला मृत्यू जवळ येताना बघत होता.
तुम्ही जर आज वयाची पन्नाशी गाठली असेल तर त्याकाळी तुम्ही १० वर्षाचे असाल. तुम्हाला तुमच्या लहानपणी असलेला तो भीतीदायक व आतंकीत करणारा माहोल आजही आठवत असेल. ९० किंवा २००० च्या दशकात जन्मलेल्या कुण्या भारतीयास त्या भयावह परिस्थितीची कल्पना सुद्धा करता येणार नाही. आज कधी जेव्हा तुमच्या घरातील जेष्ठ मंडळी तुम्हाला त्या १९७९ साली निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल सांगतील तेव्हाच तुम्हाला त्या परिस्थितीची कल्पना येऊ शकेल. तुम्हाला वाटेल अशी कोणती भयंकर परिस्थिती १९७९ साली निर्माण झाली होती ज्याची इतकी चर्चा आम्ही करतोय.
होय ! खरोखर अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तो दिवस होता ११ जुलै १९७९. अमेरिकेकडून पृथ्वीच्या कक्षेत पाठवले गेलेले अंतरिक्ष केंद्र अर्थात स्कायलॅब पृथ्वीवर कोसळणार होते. ते अंतरिक्ष केंद्र थोडेथोडके नव्हे तर तब्ब्ल ७८ टन वजनाचे होते आणि ते ज्या उंचीवरून खाली कोसळणार होते ते पाहता होणाऱ्या विनाशाची तीव्रता भयावह असणार होती.
त्यावेळी अबाल वृद्ध सर्वच भारतीय ह्या एकाच संकटाबद्दल चर्चा करत होते. ते भयंकर संकट अवकाशातून पृथ्वीकडे व खासकरून भारताकडे येत होते असा समज सर्व भारतीयांचा झाला होता आणि त्यात विशेष चिंतेची बाब हि कि ते संकट भारताच्या कुठल्या राज्यात कुठल्या शहरावर येऊन धडकेत ह्याची कुठलीच कल्पना कोणासही येत नव्हती. ह्या स्कायलॅबचे वजन ७८ टन तर होतेच पण त्याचा आकार तब्बल ९ मजली इमारती एवढा होता. तुम्ही फक्त कल्पना करा कि एक ८० टन वजनाची वस्तू जिचा आकार ९ मजली इमारतीएवढा आहे ती हजारो किलोमीटर उंचीवरून तुमच्या शहरावर येऊन आदळणार आहे.
का निर्माण झाली होती इतकी भयंकर परिस्थिती ?
हि स्कायलॅब अमेरिकेने १४ मे १९७३ साली अंतराळात पाठवली होती. जवळजवळ ५ वर्ष ह्या स्कायलॅबने आपले काम चोख बजावले होते. पण १९७७-७८ च्या सुमारास अंतराळात एक जोरदार सौरवादळ आले ज्यामुळे ह्या स्कायलॅबचे पॅनल्स जळून गेले आणि ह्यामुळे स्कायलॅबचे इंजिन्स बंद पडले. इंजिन बंद पडल्यामुळे हि स्कायलॅब अंतरिक्षातुन पृथ्वीकडे झेपावू लागली. एक भयंकर संकट पृथ्वीकडे येत होते आणि अजूनच चिंतेची बाब म्हणजे हि स्कायलॅब पृथ्वीच्या कुठल्या भागात कोसळणार ह्याची कुठलीही कल्पना कुणालाच नव्हती. पण, स्कायलॅब कोसळणार ह्याची चर्चा संपूर्ण भारतात आधीच सुरु झाली.
भारतातलेच लोक ह्यामुळे सर्वाधिक चिंतीत होते, असे का ?
कारण, नासाच्या वैज्ञानिकांनी अशी शक्यता वर्तवली कि हि स्कायलॅब हिंद महासागरामध्ये कोसळेल. पण, भारतातील रहिवाशांना असे वाटले कि कदाचित हि स्कायलॅब भारतात सुद्धा कोसळू शकेल व त्यामुळे भारतीय भयभीत झाले. रात्रीच्या वेळी आपल्या घराच्या अंगणात किंवा गच्चीवर निवांत झोपणारे लोक स्कायलॅब पडणार ह्या भीतीने आपापल्या घरात झोपू लागले.
ह्या स्कायलॅब संदर्भात अश्याही बातम्या पसरू लागल्या कि जेव्हा हि स्कायलॅब पृथ्वीवर कोसळेल तेव्हा भयंकर स्फोट होईल, ज्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. अश्या तऱ्हेच्या बातम्या येऊ लागताच लोक भयभीत झाले व भारतातील अनेक मंदिरं, मस्जिद व प्रार्थनास्थळांमध्ये लोक प्रार्थना करू लागले. ह्या संकटापासून वाचण्यासाठी देवाचा धावा करू लागले.
माहोल इतका बिघडला, लोक इतके घाबरले कि अमेरिकेला ह्या भीतीची अखेर दखल घ्यावी लागली. अमेरिकेने ह्या घटनेसंबंधीची माहिती भारत सरकारला देण्यासाठी विशेष राजदूत नियुक्त केला जेणेकरून स्कायलॅब संबंधीची क्षणाक्षणाची खबर भारताला देता येईल. अमेरिकेने थॉमस रिबोलवीच ह्यांची विशेष दूत म्हणून नियुक्ती केली व थॉमस रिबोलवीच भारतीय प्रसार माध्यमांना स्कायलॅबसंबंधीची क्षणाक्षणांची माहिती देऊ लागले ज्यामुळे भारतीय जनमाणसांची भीती थोडी कमी होऊ लागली. अमेरिकेने हे सर्व प्रयत्न केले पण भारतीयांच्या मनात स्कायलॅब कोसळणार असल्याची भीती कायम होती.
अखेर तो दिवस उजाडला
तो दिवस आज वयाची पन्नाशी पार केलेल्या मंडळींना आजही आठवत असेल. त्यादिवशी बातमी येऊन धडकली कि आजच्या दिवशी स्कायलॅब पृथ्वीवर येऊन धडकणार. भारतात सगळीकडे हायअलर्ट जारी केला गेला. सर्व भारतीय चिंताग्रस्त होते आणि एक आनंदाची बातमी कानावर आली कि स्कायलॅब हिंद महासागरात कोसळली व त्याचा काही भाग ऑस्ट्रेलियात सुद्धा कोसळला.
सर्वानी सुटकेचा निश्वास सोडला होता. सुदैवाने स्कायलॅब हिंद महासागरात व ऑस्ट्रेलियातील काही भागांत कोसळली होती व कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. ह्या घडलेल्या घटनेनंतर तत्कालीन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जिम कार्टर ह्यांनी ऑस्ट्रेलियन सरकारची माफी मागितली होती. अमेरिका व रशिया ह्यांच्यामध्ये अंतराळातील महाशक्ती बनण्यासाठी त्याकाळी स्पर्धा चालू होती ज्यातून अमेरिकेने हे महाकाय स्कायलॅब बनवले होते, केवळ नशीब चांगले म्हणून हे भयंकर संकट समुद्रात कोसळले अन्यथा काय घडले असते ह्याची कल्पनाच न केलेली बरी.