“एक असा विलास जो महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही”
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात असे काही मोजकेच नेते आहेत ज्यांनी आपली सुरवात शून्यातून केली. मात्र आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर स्वतःचे विश्व निर्माण करत त्यांनी साऱ्यांनाच अवाक करून सोडले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण असोत किंवा शंकरराव चव्हाण किंवा मग वसंतराव नाईक. या व्यक्ती आज जरी आपल्यात नसल्यता तरी त्यांची कारकीर्द व राजकीय प्रवास महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आजही घर करून आहे. पण या राजकीय धुरंधरांची नावं घेत असताना अजून एका व्यक्तीचं नाव आपल्याला जाणीवपूर्वक व अदबीने घ्यावं लागेल, ज्याने आपल्या राजकीय प्रवासाची सुरवात गाव पातळीपासून करत थेट दिल्लीपर्यंत आपले वलय निर्माण केले. ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आहेत.
विलासराव देशमुख म्हंटलं की डोळ्यासमोर उभा राहतो हसऱ्या चेहऱ्याचा दिलखुलास व्यक्तिमत्व असलेला, प्रत्येकाला आवडणारा आणि हवाहवासा वाटणार माणूस. याच विलासरावांनी राजकीय जीवनाची सुरवात आपल्या बाभळ गावच्या सरपंच पदापासून करत थेट केंद्रीय मंत्रीपदापर्यंत मजल मारली. दरम्यानच्या काळात त्यांनी महाराष्ट्राचे २ वेळा मुख्यमंत्री पद सुद्धा भूषवले. वसंतराव नाईकांनंतर महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुखमंत्री राहिलेले हुरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे विलासराव होते.
१९९९ साली काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापन होताच आघाडीचे पहिले मुख्यमंत्री विलासराव (Vilasrao Deshmukh)बनले. त्यानंतर २००९ च्या निवडणुकांमध्ये पुन्हा आघाडीची सत्ता येताच मुख्यमंत्रीपदाची माळ विलासरावांच्या गळ्यात दुसऱ्यांदा पडली. पण २६/११ हल्ल्यानंतरची ताज हॉटेल वारी त्यांना चांगलीच महागात पडली, आपले मुख्यमंत्री पद देखील सोडावे लागले. मात्र थांबतील ते विलासराव कुठले. यानंतर विलासरावांनी थेट राज्यसभा गाठून केंद्रीय मंत्री मंडळात आपले स्थान पक्के करत आपल्या राजकीय मुसद्देगिरीची चुणूक सर्वांनाच दाखवून दिली.
विलासराव (Vilasrao Deshmukh) प्रत्येकाशीच अगदी दिलखुलासपणे वागत, मग तो सत्ताधारी असो वा विरोधक. गोड बोलत हळूच चिमटे काढण्यात, कोणाचेही मन न दुखावता टिका-विनोद करण्यात विलासरावांचा हातखंडा होता. एकदा असाच एक विनोदी किस्सा विलासरावांमुळे सभागृहात घडला होता. त्यावेळी बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री होते तर नानाभाऊ एबंडवर वनमंत्री म्हणून जबाबदारी पाहत होते. सभागृहात पर्यावरणाच्या अनुषंगाने सुरु असलेल्या चर्चेत नगरचे कम्युनिस्ट पक्षाचे आमदार ठुबे म्हणाले
“राज्यात प्रचंड जंगल तोड झाली आहे. कुठेही जंगल दिसत नाही. परंतु वनमंत्र्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं की जंगलाची वाढ तिथेच झालेली दिसते”. आमदार ठूबेंच्या या खोपारखळीला प्रतिउत्तर देताना विलासराव म्हणाले
“माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की सन्माननीय सदस्य श्री ठुबे यांच्या डोक्यावर प्रचंड जागा आहे, वृक्षरोपणाची सुरवात तिथूनच केली तर जंगलाची वाढ होण्यास वेळ लागणार नाही.”
विलासरावांच्या या वाक्यानंतर सभागृहात एकाच एक हशा पिकली आणि दोन्ही सदस्यांनी त्यांना जागेवरूनच हात जोडले. आपल्या विनोदी स्वभावने विरोधकांची सुद्धा मने जिंकण्याची विलासरावांकडे एक वेगळीच कला होती. विलासराव जेवढे विनोदी होते तेवढेच संवेदनशील देखील होते. त्यांच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाशी ते आपुलकीने बोलत. विलासराव मुख्यमंत्री असताना जेव्हा त्यांची गाडी मंत्रालयात शिरायची तेव्हा त्यांना एक महिला नेहमी दरवाजा जवळ ताटकळत उभी दिसायची. एकदा विलासरावांनी गार्डला सांगून तिला बोलवून घेतले व विचारले “बाई तुम्ही रोज का उभ्या असता, तुमचे काय काम आहे”. तेव्हा थरथरत्या हाताने फाईल पुढे करत त्यांनी आपली सर्व कथा विलासरावांना ऐकवली.
पतीच्या निधनानंतर वरळी सी फेस जवळच्या कर्मचारी वसाहतीमध्ये कंपाउंड जवळ त्या महिलेने इस्त्री करण्याचा व्यवसाय सुरु केला होता. त्यावर आलेल्या पैशातून तिच्या कुटुंबाची गुजराण व्हायची. पण त्यावर एका अधिकाऱ्याची नजर गेली आणि त्याने “हप्ता” मागण्यास सुरुवात केली. ती महिला मुकाट्याने हप्ता देतही होती पण पुढे पुढे ही रक्कम इतकी वाढत गेली की तिला ते देणे परवडेनासे झाले. तिने वाढीव हप्त्याला नाही म्हणताच तिची टपरी “अनधिकृत बांधकाम” म्हणून पाडून टाकण्यात आली आणि इस्त्रीही जप्त करण्यात आली. तिचे उत्पनाचे साधनच गेल्याने फी भरायला पैसे नसल्याने मुलांचे शिक्षण थांबले. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत झाली.
हि सर्व हकीकत ऐकताच विलासरावांचे डोळे पाणावले त्यांनी लागलीच सार्वजनिक बांधकाम सचिवांना निरोप धाडला “असाल तसे निघून या, तुमच्या खात्याची कर्तबगारी आणि कार्यक्षमता दाखवायची आहे”.
सचिव हजर होताच विलासरावांनी सचिवाची चांगलीच कानउघाडणी केली. “या महिलेची टपरी जिथे होती, तिथे उभारून द्या, तिची इस्त्री परत करा” असा तातडीचा आदेश देत “हे सारे आज संध्याकाळी मी घरी जायच्या आत व्हायला हवे” अशी सक्त ताकीद देखील दिली.
विलासरावांनी एवढ्यावरच न थांबता “त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला माझ्या समोर उभे करा, माझी कर्तव्यदक्षता त्यांना दाखवून द्यायची आहे. येताना त्यांना घराचे सामान आवरूनच यायला सांगा. त्यांना कुठे पाठवायचे ते मी ठरवले आहे” असा निरोप देखील सचिवांना दिला.
सर्वसामान्यांसाठी, अडल्यानडल्यांसाठी विलासरावांचा जीव तीळ तीळ तुटायचा म्हणूनच जनतेच्या हृदयात त्यांना मानाचे स्थान होते.
विलासराव विनोदी आणि संवेदनशील तर होतेच पण एखाद्याने केलेल्या कामाची जाण ठेवणारे होते. कृतज्ञता त्यांच्या ठायीच होती. २००७ साली विलासराव मुख्यमंत्री असताना त्यांनी लातूर जिल्ह्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले यांना आमंत्रित केले. त्यावेळी बॅरिस्टर अंतुले फारसे राजकारण्याच्या मुख्य प्रवाहात देखील नव्हते. असे असताना देखील त्यांच्या आदरातिथ्यासाठी विलासरावांनी खास विमानाची सोय देखील केली. तेव्हा त्यांच्या या कृतीने भारावून जाऊन बॅरिस्टर अंतुले आपल्या भाषणात म्हणाले
“विलासराव मी मुख्यमंत्री असताना तुम्ही लातूर जिल्हा मागितला आणि मी दिला, इतकचं काय ते. राजकारणात २५ दिवसांची आठवण ठेवली जात नाही पण तुम्ही २५ वर्षांनी देखील उपकार विसरला नाहीत”.
हे बोलत असताना अंतुलेंना एवढं भरून आला होतं की तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू आल्याचे कार्यक्रमाला उपस्थित असणारे सांगतात.
विलासराव (Vilasrao Deshmukh) एक वेगळंच रसायन होते. त्यांच्याकडे माणसं जिंकण्याची त्यांना एकत्रित करून पुढे घेऊन जाण्याची कला होती. आपल्या अपार कष्टाने आणि मेहनतीने त्यांचा गावापासून सुरु झालेला राजकीय प्रवास दिल्लीपर्यंत जाऊन पोहचला. विलासरावांची राजकीय कारकीर्द जेवढी वादग्रस्त ठरली तेवढीच गाजली देखील. महाराष्ट्राचा हा मराठी आवाज जेवढा राज्यात गाजला तेवढाच दिल्लीत देखील गाजला, आणि म्हणूनच त्यांचे सर्वाना अचानकपणे सोडून जाणे महाराष्ट्रासाठी मोठा धक्का होता. त्यांच्या जाण्याने लातूरकरांना तेवढेच दुःख झाले जेवढे एका मुलाला त्याचा बाप सोडून गेल्यावर होते.
Nice article,Thanks for sharing this kind of information.
धन्यवाद..!
तुमच्या मित्रांसोबत हि माहिती शेअर करायला विसरू नका.
फार सुंदर लेख आहे. मुखमंत्री ह्या पदाला न्याय देणार एकमेव व्यक्तिमत्व. स्व.विलासरावजी देशमुख साहेब.
धन्यवाद..!
तुमच्या मित्रांसोबत हि माहिती शेअर करायला विसरू नका.