भारतात हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, जैन, बौद्ध आणि अशी अनेक जातीय व धर्मीय विविधता असणारी लोकं राहतात. प्रत्येक जाती-धर्माच्या रूढी, परंपरा आणि संस्कृती एकमेकांपेक्षा कितीही भिन्न असल्या तरीही वर्षातून असे दोन दिवस येतात जेव्हा सर्वधर्मीय एकाच जल्लोषात, आदराने आपली जात आपला धर्म विसरून एकत्र येतात. एक दिवस आहे २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिन आणि दुसरा आहे १५ ऑगस्ट, स्वातंत्र्य दिवस.
या दोनही दिवशी लहान मोठ्यांच्या छातीवर भारताच्या तिरंग्याचे छोटे प्रतीक झळकत असते. झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला आपल्या तिरंग्याखाली आपण ‘भारतीय’ म्हणून गर्वाने उभे राहतो. बाकी दिवशी आपण भारतीय आहोत याचा विसर आपल्याला पडत असला तरी आपला तिरंगा मात्र आपल्याला याची जाणीव करून देतो.
हा तिरंगा म्हणजे भारताचा राष्ट्रध्वज, हा ध्वज हवेत स्वतंत्रपणे फडकत रहावा यासाठी अनेकांनी आपले प्राण हसत-हसत गमावले. याच सर्वांच्या बलिदानावर आज हा तिरंगा स्वतंत्रपणे भारताचे प्रतिनिधित्व करतो. या स्वातंत्र्यवीरांची आठवण काढतांना आपण जरा वेगळ्या वाटेवर जाऊया. पिंगाली वेंकय्या…. नाव फारसं परिचित नसावं बहुदा पण, या नावाने केलेले काम न विसरण्यासारखे आहे. आज आपण जो तिरंगा फडकावतो त्याच तिरंग्याचे आद्य रचनाकार म्हणजेच पिंगाली वेंकय्या होय.
थोडं वैयक्तिक
२ ऑगस्ट १८७६ रोजी भाटलापेनुवर्रू, मछलीपट्टणम, आंध्र-प्रदेश येथे पिंगाली वेंकय्या यांच्या जन्म झाला. वेंकय्या हे भूशास्त्र, शेती या विषयात उच्चशिक्षित तसेच ते शिक्षणतज्ञ देखील होते. मछलीपट्टणम येथे त्यांनी स्वतःची शैक्षणिक संस्था स्थापन केली होती. गावातूनच प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुढील उच्चशिक्षणासाठी कोलंबो गाठले. त्यांनी जर्मनी आणि उर्दू भाषांचा देखील खूप अभ्यास केला. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांनी ब्रिटिश भारतीय सेनेत प्रवेश केला आणि आफ्रिकेत युद्धात सुद्धा सामील झाले. भारतात त्यांनी काही काळ रेल्वे मध्ये सुद्धा काम केले होते.
आफ्रिकेत असतानाच त्यांची भेट झाली ‘मोहनदास करमचंद गांधी’ यांच्याशी. गांधींजींसोबत ते भारतात आले आणि स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले.
राष्ट्रध्वजाची संकल्पना
आज आपण जो तिरंगा पहातो तो काही एका प्रयत्नात तयार झाला नाही. आपल्या तिरंग्यालाही रंजक इतिहास आहे. ब्रिटिशांनी १८५७ मध्ये एक राष्ट्र एक ध्वज असावा म्हणून भारतामध्ये त्यांनी रचना केलेला ध्वज फडकविला. या लाल ध्वजावर ब्रिटिशांच्या ‘युनियन जॅक’ चे सुद्धा छोटे स्वरूप होते. यानंतर अनेक वेळा, अनेक ठिकाणी, वेगवेगळ्या व्यक्ती व संघटनांनी विविध प्रकारचे ध्वज फडकावले. यात स्वामी विवेकानंद यांच्या अनुयायाने तयार केलेला ध्वज, मादाम कामा यांनी तयार केलेला ध्वज असे अनेक प्रकार समाविष्ट आहेत.
कधी ध्वजावर चंद्र आणि तारे, सूर्य, कधी बंगाली भाषेत वंदे मातरम, कधी पिवळा रंग तर कधी भगवा तर कधी लाल असे अगणीत बदल झाले. अजूनही भारत देशाचा स्वतःचा अधिकृत असा ध्वज नव्हताच. गांधीजी आणि काँग्रेस सोबत काम करताना वेंकय्या यांना सारखे वाटत होते कि आपल्या राष्ट्राचा एक स्वतंत्र ध्वज असायला हवा. त्यांना गांधीजी आणि अनेकांनी प्रोत्साहित केले आणि वेंकय्या यांनी सलग काही काळ अनेक देशांच्या ध्वजांचा अभ्यास केला आणि स्वतः एका ध्वजाची रचना केली.
त्यांनी रचना केल्यानुसार ध्वजावर दोन रंग होते, एक होता हिरवा (मुस्लिम धर्माचे प्रतीक) आणि दुसरा होता लाल (हिंदू धर्माचे प्रतीक) आणि यासोबत मध्यभागी एक चरखा होता. ध्वजामध्ये हिंदू-मुस्लिम प्रतिनिधित्व तर झाले पण इतर धर्मांचा उल्लेख त्यात येत नसल्यामुळे गांधीजींनी त्यामध्ये पांढऱ्या रंगाची पट्टी असावी असे सुचविले. त्यानुसार वरती पांढऱ्या रंगाची जोड मिळाली आणि ध्वज तयार झाला. हा ध्वज १९२१ च्या काँग्रेस सभेमध्ये फडकविला गेला.
यानंतर, १९३१ मध्ये ‘स्वराज्य ध्वज’ म्हणून वेंकय्या यांनी ध्वजामध्ये अजून बदल केले, यामध्ये भगवा रंग सर्वात वरती ठेवण्यात आला, त्यानंतर पांढरा आणि मग हिरवा रंग दिला गेला आणि मध्यभागी चरख्याला स्थान दिले. या ध्वजाला ‘स्वराज्य ध्वज’ असे नाव दिले आणि हा ध्वज ‘इंडियन नॅशनल काँग्रेस’ ने अधिकृतपणे स्वीकारला.
तिरंगा
भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही दिवस आधी म्हणजे, २३ जून १९४७ रोजी एक समिती स्थापन झाली. या समितीमार्फत भारतही राष्ट्रीय ध्वज कसा असेल हे ठरविले गेले. बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, मौलाना अब्दुल कलाम आझाद, सरोजिनी नायडू आणि अशी अनेक मंडळी या समितीमध्ये होती. या सर्वानी एकमताने असे ठरविले कि, १९३१ मध्ये पिंगाली वेंकय्या यांनी रचना केलेला ध्वज हाच योग्य असून यामध्ये थोडे बदल केले जावेत. त्यानुसार राष्ट्रध्वजाचा आकार, लांबी, रुंदी, कापड इत्यादी बाबी ठरविल्या गेल्या. १९३१ मध्ये असलेल्या रचनेप्रमाणेच रंग ठेऊन फक्त चरखा काढून त्याजागी अशोकचक्र असावे असे ठरले.
यानुसार, ध्वजामध्ये सर्वात वरील पट्टी भगव्या रंगाची: हिंदू धर्म आणि क्रांतिकारकांच्या बलिदानाचे प्रतीक, मधली पट्टी पांढऱ्या रंगाची: भारतातील शांततेचे आणि इतर सर्व धर्मांचे प्रतीक, तिसरी पट्टी हिरव्या रंगाची : इस्लाम धर्माचे आणि भारतातील समृद्धतेचे प्रतीक आणि यासगळ्यांमध्ये २४ आरे असलेले अशोकचक्र : २४ तास प्रगतीकडे वाटचाल आणि धर्म आणि कायदा याचे प्रतीक… अशा अर्थाने आपला तिरंगा तयार झाला.
१५ ऑगस्ट १९४७ मध्ये जेव्हा स्वतंत्र भारतात पहिल्यांदा हा तिरंगा फडकविला गेला, तेव्हा प्रत्येक माणसाला जात, धर्म, पंथ विसरून आपण भारतीय आहोत हि जाणीव प्रकर्षाने झाली. याच स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या क्रांतीकारकांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली लाभली, भारतभूमी धन्य झाली. आजही रक्त सांडून मिळालेल्या स्वातंत्र्याचा विसर पडल्यामुळे सामान्य नागरिक गाफील असला तरी या तिरंग्यासाठी आजही भारताचे सैनिक आपल्या प्राणांचीही बाजी लावतात. या ध्वजाखाली आपण सगळे भारतीय म्हणून गर्वाने वावरू शकू यासाठी सैनिक या ध्वजाच्या रक्षणासाठी आपले सर्वस्व पणाला लावतात.
आपला ध्वज अतिशय अर्थपूर्ण आहे. असा ध्वज निर्माण करणाऱ्या पिंगाली वेंकय्या यांना मात्र देशाने स्मृतिआड केले आहे. ज्याने आपल्याला आज हा तिरंगा दिला त्याचा विसर आपल्याला का पडावा ? आजही प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन या दिवशी वेंकय्या यांच्याबद्दल एक उद्गार देखील काढले जात नाही. आजही पिढी सर्रास प्लास्टिकचा ध्वज घेतात, मिरवून झाला कि फेकून देतात… बघणारे सुद्धा ढिम्म बघत राहतात. आपण विसरतो… आज आपण जो ध्वज रस्त्यावर सहज फेकून देतो ना त्याच ध्वजाला सन्मानाने फडकविता यावे म्हणून पिंगाली वेंकय्या यांच्यासारखे हजारो जण रस्त्यावर उतरले होते. अशा माणसांची तरी जाण आणि त्यांच्या कार्याची आठवण आपण नक्कीच ठेवली पाहिजे.
आम्हा भारतीयांना आमचा प्राणप्रिय तिरंगा देणाऱ्या पिंगाली वेंकय्या यांना त्यांच्या जन्मदिनी शतशः नमन. आमचा ध्वज:आमचा आभिमान.