म्हणायला ठीक वाटतं कि नावात काय आहे. पण आजच्या जमान्यात मात्र नावातच सर्वकाही आहे असेच म्हणावे लागेल. शेक्सपियर म्हणून गेला कि नावात काय आहे पण नावामुळे कायकाय होऊ शकतं ह्याची चांगलीच कल्पना राहुल गांधी ह्या तरुणाला आली आहे. तुम्हाला वाटत असेल कि आम्ही काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी ह्यांच्याबद्दल बोलत आहोत पण आम्ही त्या राहुल गांधींबद्दल बोलत नसून मध्यप्रदेशातील इंदोर इथे राहणाऱ्या राहुल गांधी ह्या तरुणाबद्दल बोलत आहोत.
इंदोरच्या अखंडनगर परिसरात राहणाऱ्या राहुल गांधी ह्या तरुणासाठी त्याचे नावच अडचणीचे बनले आहे. दैनंदिन आयुष्यातील छोटीमोठी कामे करतांना सुद्धा त्याला ह्या नावाचा त्रास होत आहे. त्यामुळे वैतागून त्याने आपले आडनाव कायदेशीररित्या बदलण्याचे ठरवले आहे. मोबाईलचे साधे सिमकार्ड खरेदी करतानासुद्धा संबंधित व्यक्ती त्याच्याकडे संशयाने पाहत आहे.
एखाद्या अनोळखी व्यक्तीशी फोनवरून पहिल्यांदा बोलतांना जेव्हा तो आपले नाव राहुल गांधी असे सांगतो तेव्हा लोक त्याची थट्टा करतात आणि राहुल गांधी कधीपासून इंदोरचे रहिवाशी झाले आहेत असा टोमणा त्याला मारतात. त्याच्याकडे स्वतःचे ओळखपत्र म्हणून फक्त आधारकार्ड आहे पण जेव्हा ते आधारकार्ड तो कुणाला दाखवतो तेव्हा त्यांना ते खोटे वाटते असे तो म्हणाला. त्यांना वाटते कि मी दाखवलेले आधारकार्ड बनावट आहे.
लोक माझ्याकडे संशयाने पाहतात त्यामुळे मी आपले गांधी हे आडनाव बदलून ते मालवीय करण्याचा विचार करत आहे असे तो म्हणाला. कोणत्याही राजकीय पक्षाशी कोणताही संबंध नसताना केवळ नावातील साधर्म्यामुळे असा त्रास सहन करावा लागत असेल तर कुणीही आपले नाव बदलण्याचा विचार निश्चितच करेल. आज शेक्सपियर जिवंत असता तर ह्या तरुणाची हि कहाणी ऐकून त्याने आपले हे शब्द मागे घेतले असते कि “नावात काय आहे”