“त्याने दिल्लीचा लाल किल्ला 2 वेळा व एकदा चक्क राष्ट्रपती भवन सुद्धा विकले होते.”
अहो तुम्ही काय बोलताय मल्ल्या, नीरव मोदी, चौकसी ह्यांच्याविषयी. हा माणूस ह्या सर्वांचा उस्ताद आहे ज्याच्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्याचं नाव आहे “नटवरलाल”. तुम्हाला वाटेल आम्ही अमिताभच्या चित्रपटातील त्या व्यक्तिरेखेबद्दल बोलतोय, पण आम्ही बोलतोय खऱ्या नटवरलालविषयी. नटवरलाल हे काही केवळ काल्पनिक पात्र नव्हे किंवा ती काही केवळ चित्रपटातील एक व्यक्तिरेखा नव्हे. ही व्यक्ति आहे भारतातील मोस्ट वांटेड ठग. अट्टल घोटाळेबाज नटवरलाल. पण नटवरलाल (Natwarlal) हे काही त्या महठगाचं खरं नाव नाही. ते तर त्याच्या 12 नावांपैकी असलेलं एक नाव आहे. मग त्याचं खरं नाव काय आहे ?
मित्रांनो ! त्याचं खरं नाव आहे मिथिलेश कुमार श्रीवास्तव (Mithilesh Kumar Shrivastav). कित्येक लोक जे नटवरलाल ह्या व्यक्तीला फक्त नटवर ह्या नावानेच ओळखतात त्यांच्यासाठी हे नाव म्हणजे अगदीच नवं आणि अनोळखी असेल. तुमचं म्हणणं बरोबर आहे कारण, या मिथिलेश कुमार श्रीवास्तव उर्फ नटवरलाल या महाभागाने जरी 12 नावे व 12 अवतार धारण केले असले तरी तो नटवरलाल याच नावाने सर्वाधिक प्रसिद्ध आहे. त्याने असे काही अचाट पराक्रम केलेत की घोटाळेबाज किंवा महाठग या शब्दाचा समानार्थी शब्द बनलाय “नटवरलाल”. उपलब्ध माहितीनुसार नटवरलालचा जन्म 1912 साली बिहारच्या सिवान जिल्ह्यातील जिरादेई गावचा, पण त्याचा मृत्यू कधी झाला हे एक गुढच आहे.
अंबानी, टाटा, बिर्ला या लोकांना सुद्धा गंडवलं ?
नटवरलाल हा व्यवसायाने वकील होता पण त्याचा खरा व्यवसाय म्हणा किंवा त्याचं खरं कौशलय होतं वेष बदलणे. तो मूळ वेष बदलून हवा तो वेष परिधान करत असे आणि आपली नियोजित कामगिरी पार पाडत असे. शेकडो, हजारो लोकांना त्याने गंडा घालून करोडो रुपयांची अफरातफरी केल्याचे म्हटले जाते. तुम्ही ऐकून किंचित आश्चर्यचकीत व्हाल कारण, त्याने गंडा घातलेल्या लोकांचा यादीत धिरूभाई अंबानी, टाटा आणि बिर्ला यांचीही नावे होती असे म्हटले जाते.
या महाठगाची कामगिरी केवळ एवढ्यापुरतीच मर्यादित नाही बरं का तर यापुढे आम्ही जे तुम्हाला सांगणार आहोत ते वाचून तुम्ही त्याला दंडवतंच घालाल. कारण, नटवरलालणे चक्क ताजमहालच विकला होता म्हणे, आणि तोही एकदा नव्हे तर 3 वेळा. विचार करा जो माणूस ताजमहाल चक्क 3 वेळा विकू शकतो तो माणूस काय नाही करू शकणार. तो केवळ ताजमहाल विकूनच थांबला नाही तर त्याने दिल्लीचा लाल किल्ला 2 वेळा व एकदा चक्क राष्ट्रपती भवन सुद्धा विकले होते.
तुम्ही अनेक चित्रपटात हातसफाईने चोरी, घोटाळे, अफरातफरी करणारे लोक पाहिले असतील. तुम्ही अब्दुल करीम तेलगी सारखे नकली स्टॅम्प पेपर विकणारेही पाहिले असतील पण, तुम्ही नटवरलाल (Natwarlal) सारखा महाठग आजवर कधीच पाहिला नसेल. वेषांतर करणे, नकली सह्या करणे, स्वतःचे नाव बदलणे हे सर्व म्हणजे तर त्याच्या डाव्या हाताचा मळ.
नटवरलालला लोक देवमाणूस मानायचे
बरेच लोक त्याला ठग किंवा घोटाळेबाज न मानता देव माणूस मानत असत. नटवरलालला देव माणूस मानणाऱ्यांचं असं म्हणणं होतं की तो गरजवंतास मदत करतो आणि म्हणून तो ठग (घोटाळेबाज) असूच शकत नाही आणि तोही स्वतःबद्दल हेच म्हणायचा. त्याचं म्हणणं असं होतं की मी खोटं बोलून लोकांकडून पैसे घेतो व तेही देतात त्यात माझा काय दोष. असं नाही की तो कधीच पकडला गेला नाही. तो तब्बल 9 वेळा पकडला गेला पण दर वेळेस तो पोलिसांच्या हातावर तुरी देवून पळून जाण्यात यशस्वी ठरला. तो जेव्हा शेवटचा म्हणजे 9व्या वेळेस पकडला गेला तेव्हा त्याचं वय होतं 84 वर्ष. एके दिवशी त्याला कानपूर जेलमधून एम्स हॉस्पिटलमध्ये आणले जात होते. त्याच दिवशी म्हणजे जुलै 24, 1996 साली तो नवी दिल्ली रेल्वे स्थानकातून पळून गेला. तो त्यादिवशी जो पळून गेलो तो पुन्हा कधी पोलिसांना सापडलाच नाही.
या नटवरलाल नावाच्या महठगाच्या अनेक लीला प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक म्हणजे त्याने तत्कालीन राष्ट्रपति डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची बनावट सही करून एका जबर घोटाळा केलेला होता. नटवरलालचा जन्म जरी बिहारचा असला तरी त्याच्या कारनाम्यांमुळे भारतातील 8 राज्यांच्या पोलिस व प्रशासनाची झोप उडाली होती. 8 राज्यांमध्ये मिळून सुमारे 100 किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे त्याच्या नावावर नोंदवले गेले होते ज्यासाठी त्याला 113 वर्षांची शिक्षा सुनावली गेली. अर्थात त्याला शिक्षा देणे पोलिस व सरकारला कधी शक्य झाले नाही.
स्वतःच्या मृत्यूचा केला बनाव
त्याच्या घोटाळ्यांची आणि लोकांना गंडावण्याची मालिका इथेच संपली असं वाटू देवू नका कारण, त्याने स्वतःच्या मृत्युचा बनाव करून सुद्धा अनेक लोकांना गंडवले आहे. खरंच नटवरलाल हा उच्च कोटीचा ठग होता याविषयी माझ्या मनात तरी आता शंका उरली नाहीये. 2009 साली त्याच्या वकिलाने त्याच्यावरील 100 पेक्षा अधिक गुन्हे रद्द करावेत यासाठी याचिका दाखल केली, त्यात त्याने असे म्हटले की 25 जुलै 2009 रोजी नटवरलालचा मृत्यू झाला आणि मृत व्यक्तीवर खटला चालवला जाऊ शकत नाही त्यामुळे त्याचावरील सर्व गुन्हे मागे घेतले जावेत. पण नटवरलालच्या भावाच्या म्हणण्यानुसार त्याचा मृत्यू 2009 साली नव्हे तर त्याच्या कितीतरी आधी म्हणजे 1996 सालीच झाला. खरे काय ते देवच जाणे ! ह्या ठगांच्या उस्तादाला स्वतःवर इतका विश्वास होता की जर भारत सरकारने परवानगी दिली तर तो आपल्या घोटाळे, अफरातफरी करण्याच्या कौशल्याचा वापर करून भारतावर असलेले कर्ज सुद्धा फेडेल.
अशा या महाठगावर बॉलीवुडमध्ये अनेक चित्रपट सुद्धा निघाले ज्यात ‘मिस्टर नटवरलाल’ व नुकताच येवून गेलेला ‘राजा नटवरलाल’ या चित्रपटांचा सुद्धा समावेश आहे. मिस्टर नटवरलाल या चित्रपटातील नटवरची भूमिका अमिताभ बच्चन यांनी साकारली होती हे आपल्याला माहिती असेलच.
तर अशा या नटवरलालला त्याच्या जन्मगावातील गावकरी मात्र फार मानत असंत. त्यांच्यामते नटवरच्या जन्मगावात त्याचे एक स्मारक सुद्धा उभारले जावे. काय कमाल आहे ना, ज्याच्या नावावर 8 राज्यांत 100 पेक्षा जास्त गुन्यांची नोंद आहे त्याचे स्मारक व्हावे अशी त्याच्या गावातील गावकऱ्यांची मागणी आहे, यावरून नटवरलाल नेमका होता कसा ? चांगला की वाईट ? राक्षस की देवदूत ? नक्की कसा होता नटवरलाल. हा प्रश्न पडल्याशिवाय राहात नाही.