सायकलच्या दुकानापासून सुरवात करून तब्बल ७० देशात आपला बिझनेस पोहोचवणारा पहिला मराठी उद्योजक, लक्ष्मणराव किर्लोस्कर
असे म्हटले जाते की मराठी माणसाला व्यवसाय करता येत नाही आणि हे आपण आज नाही तर गेल्या अनेक पिढ्यांपासून आपण ऐकत आलेलो आहोत. पण आज या लेखामध्ये आपण पहिल्या मराठी उद्योजका बद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने मराठी माणसांवरती लागलेला हा कलंक साफ पुसून टाकला आहे. या व्यक्तीने तयार केलेले प्रत्येक यंत्र हे आज परदेशामध्ये विकले जाते आणि फक्त विकलं जात नाही तर परतदेशांमधून भारतीय बनावटीच्या या यंत्राला मोठ्या प्रमाणात मागणी सुद्धा आहे. होय, आपण आज पहिले मराठी उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्या बद्दल माहिती पाहणार आहोत.
लक्ष्मण काशिनाथराव किर्लोस्कर यांचा जन्म 20 जून 1869 रोजी बेळगाव जिल्ह्यातील गुर्लेहोसूर नावाच्या एका छोट्याशा खेड्यात झाला. लहानपणापासूनच त्यांना यांत्रिक वस्तूंचे प्रचंड आकर्षण होते, तसेच ते चित्रकलेतही पारंगत होते. 1885 साली वडिलांच्या इच्छेविरुद्ध आणि मोठ्या भावाच्या मदतीने लक्ष्मणराव आणि मुंबईचा जेजे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये ऍडमिशन घेतली. दोन वर्षातच त्यांना रंगअंधत्व आढळुन आले, त्यामुळे त्यांना शिक्षण मधेच थांबावावे लागले. चित्रकला सुटली पण रेखाचित्राचा केलेला अभ्यास त्यांच्या कमी आला आणि पुढे त्याच शिक्षणाच्या जोरावर विक्टोरिया टेक्नीकल इन्स्टिटयूटमध्ये कला शिक्षक आणि बाष्प अभियांत्रिकीचे अध्यापक म्हणून त्यांनी केवळ 45 रुपये महिन्यावर काम करण्यास सुरुवात केली.
पुढे 1888 मध्ये मुंबई सोडून ते बेळगावात आले आणि त्यांनी बेळगावात जाताच सायकल दुरुस्तीचे दुकान थाटले. या दुकानाच्या माध्यमातुन त्यांनी व्यावसायिक क्षेत्रात आपलं पहिलं पाऊल टाकले. त्यांनी आणि त्यांच्या भावांनी मिळुन किर्लोस्कर वाडीच्या वसाहतीचा प्रारंभ केला. 1910 मधे लक्ष्मणरावांनी कुंडलातील निर्जन आणि निर्जळ अशा माळरानावर “किर्लोस्कर ब्रदर्स” या नावानं कारखाना उभारला. या कारखान्यात शेतीव्यवसायासाठी लागणाऱ्या नांगर, मोटार, रहाट, चरक यांसारख्या वस्तूंचे उत्पादन सुरू केले.
1920 साली भांडवल वाढवण्याच्या हेतूने त्यांनी कारखान्याचा रूपांतर एका छोट्याशा कंपनीत केले. त्यामार्फत आणखी विविध उत्पादनं तयार होऊ लागली. लक्ष्मणराव हे काही वर्ष औंध संस्थानाचे दिवाण होते. औद्योगिक कारखाना चालविण्याचे कोणतेही शिक्षण न घेता किर्लोस्कर उद्योग समूह त्यांनी अतिशय परीश्रमाने उभा केला. अशा या आपल्या भारतातील पहिल्या मराठी उद्योजकावर 20 जुन 1989 मध्ये भारत सरकारने पोस्टाचे तिकीट सुद्धा काढले.
अशाच प्रकारे एकानंतर एक अशा आता किर्लोस्कर ग्रुपच्या नावाखाली जवळपास 26 कंपन्या आहेत. अशा या महान आदर्श उद्योजकाला डोळ्यासमोर ठेवून अनेक उद्योजक तयार झाले आणि यापुढे होतील अशी खात्री आहे.