“जिनमे अकेले चलने के हौसले होते है,
एक दिन उन्ही के पीछे सारे काफिले होते है”
आज उत्तर प्रदेश आणि देशाच्या राजकारणामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा हा प्रचंड गाजत आहे. हिंदूत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व असा विचार करणाऱ्या अनेक पक्षांनी त्यांचा अजेंडा देशामध्ये राबवण्यात यश प्राप्त केले आहे. आज उत्तर प्रदेशमध्ये तसेच संपूर्ण देशामध्ये हिंदुत्वाचा आवाज बुलंद करणारा एकमेव नेता आहे, ज्याच्याकडे हिंदुत्वाचा कैवारी म्हणून बघितले जाते आणि तो नेता म्हणजे योगी आदित्यनाथ. उत्तर प्रदेशचे वर्तमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश मध्ये आपली छाप ही स्वकर्तुत्वावर आणि सामर्थ्यावर प्राप्त केलेली आहे.
“स्वयमेव मृगेंद्रता” हे योगी आदित्यनाथ यांच्या कार्याचे चपखल वर्णन आहे. योगी यांनी उत्तर प्रदेशमध्ये हिंदुत्वाची अशी काही एकजूट तयार केलेली आहे कि योगी आदित्यनाथ आज उत्तर प्रदेशच्या प्रत्येक तरुणाच्या गळ्यातील ताईत बनलेले आहेत. या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाआघाडीचे गठबंधन झाल्यानंतरही भाजपला उत्तर प्रदेशमध्ये फटका बसला नाही याचं कारण म्हणजे फक्त योगी आदित्यनाथ यांनी केलेलं एकीकरण. योगी आदित्यनाथ यांनी वयाच्या 26 व्या वर्षीच राजकारणात सहभाग घेतला. त्यांनी 26 व्या वर्षी गोरखपुर मधून खासदारकीची निवडणूक जिंकून येत सर्व उत्तर प्रदेशमध्ये खळबळ माजवली होती.
योगी ज्यावेळी खासदार म्हणून पहिल्यांदा नियुक्त करण्यात आले त्यावेळी ते संसदेमधील सर्वात तरुण खासदार होते. योगी यांचा जन्म उत्तराखंड येथील गडवाली परिवारात झाला आहे. त्यांचे जन्म नाव अजयसिंह नेगी असे आहे. त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण याच भागात पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना ते “अखिल भारतीय विद्यार्थी परिषद” या विद्यार्थी संघटनेचे सक्रिय सदस्य होते. त्यांनी अनेक आंदोलनही गाजवलेली आहेत. योगी आदित्यनाथ हे नाथ संप्रदायातुन येतात आणि या संप्रदायातील लोकांचा असा समज आहे की, “देश, देव आणि धर्माच्या रक्षणासाठी साधू-संतांनी राजकारणाच्या मैदानात उतरले पाहिजे.”
कॉलेज जीवन पूर्ण केल्यानंतर अवघ्या बाविसाव्या वर्षी योगींनी सांसारिक जीवनाचा त्याग केला आणि ते गोरखपूर येथील मठाधिपती यांच्या आश्रयाखाली गेले. तेथे त्यांनी अध्यात्मिक शांती प्राप्त केली. पुढे जेव्हा मठाधिपती यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली त्यावेळी योगी यांना आपले उत्तराधिकारी म्हणून नियुक्त केले. योगींनी 1998 मध्ये पहिल्यांदा “भारतीय जनता पार्टी” कडून खासदारकीची निवडणूक लढवली आणि नुसती लढवलीच नाही तर प्रचंड मताधिक्याने त्यांनी ती निवडणूक जिंकलीही. पुढे योगी ही निवडणूक अधिक मतांच्या फरकाने जिंकू लागले आणि राजकारणात त्यांनी स्वतःला सिद्ध केले.
दरम्यानच्या काळामध्ये योगींनी हिन्दू युवा वाहिनी नावाच्या एका हिंदू संघटनेचे गठन केले, या संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पूर्ण देशांमध्ये आपल्याला आढळून येतील. योगी यांचे कार्य हे हिंदू रक्षणासाठी अत्यंत मोलाचे मानले जाते. उत्तर प्रदेशमध्ये जनता आता योगी यांना एक महानायक या भूमिकेतून बघायला लागलेली आहे. तसे पाहायला गेले तर प्रत्येकच राजकीय नेत्यावर कुठले ना कुठले तरी आरोप असतात. योगींवरही असे अनेक आरोप आहेत.
7 सप्टेंबर 2008 रोजी योगींवर आजमगड मध्ये एक प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामधून योगीजी बचावले. हा हल्ला एवढा भयानक होता की हल्लेखोरांनी शंभर गाड्यांचं अतोनात नुकसान केले. यासोबतच योगी अनेक वेळी त्यांच्याकडून दिल्या गेलेल्या भडकाऊ विधानांमुळेही चर्चेत राहिलेले आहेत. योगी आदित्यनाथ यांच्यावरती असे अनेक आरोप करण्यात आलेले आहेत. पुढे योगी यांना गोरखपुर दंगलीच्या काळामध्ये अटक करण्यात आली. यावेळी मोहरमच्या काळामध्ये एका हिंदु युवकाला गोळी लागल्याच्या कारणावरून ही दंगल घडली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी योगींना सांगितले की, “तो मुलगा जखमी आहे आणि तुम्हाला त्याला भेटता येणार नाही.”
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतरही योगी त्याला भेटण्यासाठी गेले आणि तिथे त्यांनी माईक वरून कर्फ्यू हटवण्याची मागणी केली. या सर्व गोष्टींमुळे योगी यांना त्यांच्या हजारो समर्थकांसह अटक करण्यात आली. योगी यांना अटक झाल्यानंतर मात्र या भागामध्ये प्रचंड हिंसाचार घडला होता. 2017 मध्ये उत्तर प्रदेश मध्ये परत विधानसभेच्या निवडणुका घेण्यात आल्या. या निवडणुकीमध्ये भाजपने योगी यांना नेतृत्व दिले आणि योगी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने प्रचंड यश प्राप्त केले. कुणी स्वप्नातही विचार केला नसेल की उत्तर प्रदेशमध्ये भाजप एवढ्या मताधिक्क्याने विजयी होईल.
18 मार्च 2017 ला योगी यांनी उत्तर प्रदेशचा नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. योगींनी पहिल्या दिवसापासून राज्यात होणाऱ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पावले उचलली. राज्यामध्ये होणारा प्रत्येक गैरप्रकार टाळण्यासाठी त्यांनी सशक्त पावले उचलण्याकडे लक्ष केंद्रित केलेले आहे. राज्यात होणारे अत्याचार, धर्मांतरण, नक्षलवाद अशा विषयांकडे योगी यांनी विशेष लक्ष दिले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा दिसते. आता सर्वांना अपेक्षा आहे की योगींच्या नेतृत्वामध्ये उत्तर प्रदेश यशाची शिखरे पादाक्रांत करेल. योगी यांच्यासमोर प्रचंड मोठे आव्हान आहे पण निश्चितपणे याची सगळ्यांना कल्पना आहे. योगी नेहमीप्रमाने याहीवेळी जनतेच्या सर्व अपेक्षा पुर्ण करतील हीच अपेक्षा.