“इंदोर शहराने सुमित्रा महाजन यांना आठ वेळेस खासदार म्हणून निवडून दिलेल आहे.”
भारतीय जनता पार्टीने अनेक तत्त्वनिष्ठ आणि जनसामान्य माणसांना अहोरात्र न्याय देण्यासाठी तत्पर असणारे कार्यकर्ते समाजाला दिले आहेत. पुढेही असे अनेक कार्यकर्ते भाजपा समाजाला देईल, याच कार्यकर्त्यांमध्ये एक नाव म्हणजे सुमित्रा महाजन. सोळाव्या लोकसभेच्या त्या विद्यमान अध्यक्षा म्हणून कामकाज बघत आहेत. असं म्हटलं जातं की सुमित्रा महाजन यांच्या कार्यकाळामध्ये लोकसभेचे कामकाज सर्वात जास्त प्रमाणात झालेलं आहे. याचे सर्व श्रेय अर्थातच अध्यक्षा म्हणून त्यांना जाते. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये एक स्त्री काय करू शकते याचं उत्तम उदाहरण म्हणजे सुमित्रा महाजन.
एका गृहिणीपासून ते लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत त्यांचा कार्यकाळ संघर्षमय आणि रोमांचक राहिलेला आहे. सुमित्रा महाजन यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या ठिकाणी 12 एप्रिल 1943 रोजी झाला होता. त्यांचा विवाह झाल्यानंतर त्या त्यांच्या सासरी म्हणजे इंदोर येथे स्थायिक झाल्या. सुमित्रा महाजन यांनी सुरुवातीपासूनच घर आणि समाजकार्य यामध्ये गल्लत न होऊ देता सगळं सांभाळल आहे. त्या सकाळी लवकर उठत असत, घरच्या सर्व व्यक्तींचे डबे तयार करून त्यांना देत असत आणि घरची सर्व कामं करून त्यानंतर त्या सायकलवर त्यांच्या समाजकार्यासाठी घराच्या बाहेर पडत असत.
त्यांच्या या मेहनतीचं फळ म्हणून इंदोर शहराने त्यांना आठ वेळेस खासदार म्हणून निवडून दिलेल आहे. त्यांचा हा संघर्ष साधा नक्कीच नव्हता, त्यांनी सत्ताशिखरावर बसून आपल्या समाज कार्याची सुरुवात केलेली नव्हती. आजच्या या जबाबदारी पर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी अनेक गोष्टींचा त्याग केलेला आहे. वयाच्या एकोणचाळिसाव्या वर्षी त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली. त्यांनी इंदोर मधील नागरिकांची नगरसेवक म्हणून अनेक वर्ष सेवा केली. त्यानंतर काही विधानसभा निवडणुका गमावल्यानंतर त्यांना भाजपतर्फे 1989 ला खासदारकीची संधी मिळाली, त्यांनी ती संधी कमावली होती. त्यावर्षी त्या खासदार म्हणून दणदणीत मतांनी निवडून आल्या.
तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी मागे वळून बघितले नाही. त्यानंतर त्यांनी एकही लोकसभा निवडणूक गमावलेली नाही. त्यांच्याबद्दल एक किस्सा सांगितला जातो तो असा की, जेव्हा त्या खासदार नव्हत्या आणि सुषमा स्वराज यांच्यासोबत पक्षकार्यासाठी प्रवास करत असत. एकदा त्या अशाच निवडणुकीच्या काळात पक्षकार्यासाठी प्रवासावर बाहेर निघाल्या होत्या. तेवढ्यात, त्यांच्या लहान मुलाने त्यांच्याकडे लाडू खाण्याचा हट्ट केला. सुमीत्रा महाजन यांनी त्यांच्या मुलाला समजावून सांगितलं की तुझी आजी तुझ्यासाठी लाडू करून देईल, पण त्यांच्या मुलाने हट्ट धरला की आई मला तुझ्या हातचाच लाडू खायचा आहे.
मग काय घरापुढे पक्षकार्य बाजूला ठेवत त्यांनी चक्क सुषमा स्वराज यांना वाट पाहायला सांगितलं. त्यांनी त्यांना असं सांगितलं की मुलासाठी लाडू झाले की मग आपण प्रवासासाठी बाहेर पडुयात. समाजकार्यासोबतच सुमित्रा महाजन यांनी घर कसं सांभाळलं याचं हे देखील एक उदाहरण आहे. सुमित्रा महाजन यांचा राजकारण हा पिंडच नव्हता, त्या घरची काम करत असत आणि महिलांना प्रबोधनही करत असत. या प्रबोधनामार्फत त्यांनी अनेक संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचवले आहेत. त्या महिलांना प्रबोधनातून कुटुंबाचे महत्त्व समजावून सांगत असत.
याच समाज कार्यामुळे त्या इंदोरमध्ये ताई म्हणून प्रसिद्ध होऊ लागल्या. सुमित्रा महाजन तेव्हापासूनच मध्यस्थाची भूमिका बजावत आहेत. अशा प्रकारच्या घटना हाताळण्यात त्यांचा हातखंडाच आहे. त्यामुळेच कदाचित त्यांना लोकसभेचे सर्वोच्च पद देण्यात आलेले असावे. सुमित्रा महाजन स्वतः नेहमी एक गोष्ट सांगत असतात, की जर आणीबाणीची परिस्थिती काँग्रेसने देशावरती लादली नसती तर त्या कधीच राजकारणामध्ये उतरल्या नसत्या. आणीबाणीच्या काळामध्ये जनसामान्यांवर जो अन्याय झाला तो अन्याय बघून त्यांना मनातून वाईट वाटले आणि या सगळ्या गोष्टींचा त्यांच्या मनामध्ये राग होता, म्हणूनच त्या राजकारणामध्ये उतरल्या.
त्यांनी तुरुंगामध्ये डांबण्यात आलेल्या अनेक राजकीय कार्यकर्त्यांच्या कुटुंबांचं सांत्वन केलं. त्यांनी या काळामध्ये इतरांना भरपुर मदत केली. अगदी त्यांच्या अपत्यांची शाळेची फीजही त्यांनी स्वतः या काळामध्ये भरली होती. या काळाबद्दल बोलताना त्या म्हणाल्या की, “मला त्यावेळी असे वाटले की जनसामान्यांसोबत काहीतरी भयानक घडत आहे आणि हे माझं कर्तव्य आहे की त्यांना माझ्याकडून जेवढी होईल तेवढी मदत मी करावी. कदाचित यामुळेच जेव्हा त्यांनी मध्यंतरी प्रदर्शित झालेला चित्रपट इंदू सरकार पाहिला त्यावेळी त्यांना असे जाणवले की त्यांच्या समोरून तो काळच जात आहे.
त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडून अनेक गोष्टी शिकल्या होत्या. त्यांनी त्यांच्या कुटुंबाकडून मैत्रीमध्ये झालेली भांडण विसरून प्रत्येकाला सोबत घेऊन पुढे जाण्याचा गुण स्वीकारला होता. जेव्हा त्यांना असा प्रश्न विचारला गेला की तुम्हाला कुठलेही शत्रू नाहीत असे कशामुळे ? त्यावर त्यांनी उत्तर दिले कि,”दुश्मन तो बहुत है, पण मी त्यांच्यावर वेळ वाया घालवणे योग्य समजत नाही. मी माझा रस्ता स्वतः तयार केला आहे, मी प्रत्येक सकारात्मक आणि नकारात्मक गोष्टींना तोंड देत मी इथपर्यंत पोहचले आहे, माझ्यासाठी माझी मातृभूमी नेहमीच सर्वकाही राहिलेली आहे. माझ्या कुटुंबाने मला नेहमी हेच संस्कार दिललेे आहेत.”
त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेशी संलग्न होते. त्यांचे वडील पुरुषोत्तम नीलकंठ साठे ज्यांना सर्व आप्पा म्हणून ओळखत असत, ते रत्नागिरीचे संघचालक होते. त्यांनी 1937 मध्ये एका विधवा स्त्री सोबत विवाह केला होता. या घटनेमुळे चिपळून शहरामध्ये गहजब माजला होता. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी त्यांच्या या परिवर्तनवादी विचारांना पाठिंबा दर्शविला होता. त्यांच्या वडिलांच्या परिवर्तनवादी विचारांनीच त्यांना स्वावलंबी बनवले आहे.
त्यांचे कुटुंब चिपळूणमध्ये एका किरायाच्या घरामध्ये वास्तव्य करत होते, जेव्हा त्यांनी त्यांच्या वडिलांना आपलं स्वतःचं घर पाहिजे असं म्हटलं, त्यावेळी त्यांच्या मोठ्या बंधूंनी त्यांना समजावून सांगितलं की “आपलं घर असं काही नसतं, एक गोष्ट लक्षात ठेव, ते प्रत्येक घर आपलं आहे जिथे घरी गेल्यावर तेथील लोक आपल्या स्वागतासाठी उभे राहतात.” लग्न करून सुमित्राजी इंदोर येथे वास्तव्यास आल्या, त्यावेळी त्यांच्या सासरचं घर तीन मजली उंच होतं. त्यांचे पती जयंत जे वकील होते, त्यांनी त्यांच्या प्रत्येक निर्णयाला पाठिंबा दर्शविला, त्यांना त्यांच्या विचाराने वागण्याची आणि जगण्याची मुभा दिली.
पण त्यांच्या पतीच्या निधनाने सुमित्रा महाजन खूपच खचल्या होत्या. त्यांना त्या सर्व आठवणी विसरण्यासाठी खूप वेळ द्यावा लागला. त्यांनी त्यांच्या पतीच्या निधनानंतर अनेक गोष्टींचा त्याग केला. त्या आता दागिन्यांच्या जागी चांगली घड्याळे घालू लागल्या आहेत. त्या आजही साधं आयुष्य जगत आहेत. त्या जेव्हा परदेशामध्ये प्रवासासाठी जातात त्यावेळी त्या कुठलीही गोष्ट खरेदी करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्यांना असे वाटते की त्या गोष्टी त्यांच्यासाठी अनावश्यक आहेत. त्यांचा सायकलपासून समाजकार्याचा चालू झालेला हा प्रवास आज खूप मोठ्या जबाबदारी पर्यंत येऊन पोहचलेला आहे. त्या अजूनही अनेक यशाच्या पायऱ्या चढत राहोत एवढीच अपेक्षा.