‘चूल आणि मूल’ म्हणजेच स्त्री जीवनाचे ध्येय असे मानणाऱ्या महिलांना आणि सर्व समाजाला त्या अवघड कर्मठ काळात आनंदीबाई जोशी यांनी एक आदर्श मानदंड घालून दिला. एकीकडे स्त्री शिक्षणासाठी फुले दाम्पत्य झटत असतांनाच आनंदी – गोपाळराव जोशी हे जोडपे स्वतः च्या ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करत होते. जिद्दीला प्रयत्नाची साथ असेल तर या जगात कोणतेही काम अशक्य नसते, हे या जोडप्याने सिद्ध करून दाखवले.
एका विशिष्ट समाजात राहून काम करायचे तर अडथळे येणारच, त्या वेळच्या रूढी परंपरा झुगारून, प्रवाहाच्या विरुद्ध जायचे म्हणजे त्रास तर सहन करावाच लागतो. नुकताच आनंदी गोपाळ ह्यांच्या जीवनावर मराठी चित्रपट प्रदर्शित झाला, त्यानंतर त्या जोडप्याला आपल्या घराघरात आणि मनात जागा मिळाली, पण त्यांचा प्रवास अतिशय खडतर होता, त्याच आनंदीबाई जोशींची ३१ मार्चला असलेल्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्या “स्त्री-जन्माची कहाणी”.
भारतातील सर्वप्रथम महिला डॉक्टर असलेल्या आनंदी गोपाळ जोशी, ह्या भारतातील पहिल्या अमेरिकेत जाऊन शिकलेल्या महिला डॉक्टर होत्या. आनंदी गोपाळराव जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी महाराष्ट्र राज्यात ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे झाला. त्यांच्या जन्माच्या वेळी महाराष्ट्राला बॉम्बे प्रेसीडेंसी असे नाव होते. आनंदी जोशी यांचे नाव ‘यमुना’ असे होते, लग्नानंतर ते नाव बदलून, पती गोपाळराव जोशी यांनी तिला ‘आनंदी’ असे नाव दिले.
ब्रिटीश राज्यामध्ये बर्याच वर्षांपासून यमुनेच्या माहेरचे कुटुंब जहागिरदार, जमीनदार होते, परंतु ब्रिटीशांनी जास्त कर घेऊन, बर्याच वर्षांपासून झालेल्या नुकसानीमुळे, त्यांच्या कुटुंबाला त्रासदायक आर्थिक परिस्थितीला सामोरं जावं लागतं होतं. यनुमा तेव्हा खूपच लहान होत्या. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात यमुना यांच्यावर नऊ वर्षाच्या कोवळ्या वयात लग्न करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यावेळी गोपाळराव जोशी हे विधुर आणि एका मुलाचे वडील होते, विवाह झाला त्यावेळी त्यांचे वय सुमारे ३० वर्ष होते, म्हणजे यमुनापेक्षा तिप्पट वय. गोपाळराव त्याच गावात एका पोस्ट ऑफिसमध्ये क्लर्क होते जिथे यमुना राहत होत्या.
आनंदीबाईंनी डॉक्टर होण्याचे का ठरवले ?
गोपाळराव स्त्री शिक्षणाचे समर्थक होते. त्या काळासाठी हा असामान्य गुण समजला जात असल्यामुळे त्यांना एक प्रगतिशील किंवा क्रांतिकारक विचार करणारे मानले जात होते. आनंदी बाई फक्त चौदा वर्षांच्या होत्या जेव्हा त्या पहिल्यांदा बाळंत झाल्या, पण वैद्यकीय सेवा आणि सुविधांच्या कमतरतेमुळे त्यांचा मुलगा दहा दिवसांत वारला. पुरुष डॉक्टरांना महिला खुलेपणाने त्रास सांगू शकत नव्हत्या, ही गोष्ट आनंदीबाई जाणून होत्या, त्यात लहान वयात बाळ गेल्याचे इतके प्रचंड दुःख आणि हे दुःख सहन करतानाच त्यांनी भारतात उच्च आरोग्यसेवा मिळवून देण्याचा निर्धार केला. त्यांनी आपल्या पतीस आपला निर्णय सांगितला, त्यांनी सुद्धा त्यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला.
कश्या गेल्या आनंदीबाई अमेरिकेत ?
गोपाळरावांनी रॉयल विल्डर नावाच्या एका अमेरिकन मिशनरीस पत्र लिहिलं की, अमेरिकेमध्ये आनंदीबाईंना वैद्यकीय अभ्यास करायचा आहे. ते पत्र वाचून न्यू जर्सीचे थियोडिसिया कारपेंटर जे स्वतः दंतवैद्य होते, त्यांनी अशा प्रेरणादायी जोडप्याला त्यांचे निवासस्थान राहण्यासाठी देऊ केले. परंतु, गोपाळराव यांना आधी स्वत:साठी योग्य नोकरीची तिकडे मागणी केली गेली.
नोकरी मिळाली तरच ते तिच्यासोबत परदेशी जाऊ शकले असते, परंतु गोपाळराव जोशी यांची पश्चिम बंगाल (त्यावेळी बंगाल प्रांत) सेरामपूर इथे बदली झाली, त्यामुळे त्यांनी अनंदीबाईना अमेरिकेत जाऊन एकटीने शिक्षण घेऊ द्यायचे ठरविले. आनंदीबाई जोशी यांनी महिला मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हेनिया येथे अर्ज केला आणि प्रवेश मिळवला. त्यांनी कलकत्ता (सध्याचा कोलकाता) पासून न्यूयॉर्कपर्यंत एकटीने बोटीने प्रवास केला.
मिळवली सगळ्यांकडून शाब्बासकी
१९ व्या वर्षी त्यांचे वैद्यकीय शिक्षण सुरू झाले. अमेरिकेत असताना, त्यांचे आरोग्य अतिशय थंड हवामान आणि अपरिचित आहार यामुळे खराब झाले. त्यांना क्षयरोग म्हणजेच टीबीचा त्रास सुरू झाला. ह्या सर्व त्रासातून, त्यांनी मेडिसिन विषयात पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. मार्च ११, १८८६ रोजी “आर्यन हिंदु लोकांमधील प्रसूतिशास्त्र” नावाचा थीसिस सादर केल्यानंतर एमडी पदवी प्राप्त झाली. त्यांचा प्रवास इतका प्रेरणादायी होता की त्यांना भारतीय प्रेसमध्ये खूप प्रसिद्धी मिळायला लागली आणि पदवीनंतर इंग्लंडच्या तत्कालीन राणी, क्वीन व्हिक्टोरियाने आनंदीबाईंना अभिनंदन संदेश पाठवला. १८८६ मध्ये जेव्हा त्या भारतात परत आल्या तेव्हा त्यांना मोठा मान सन्मान मिळाला.
तब्येतीने नाही दिली साथ
कोल्हापूर मधील अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल मध्ये डॉक्टर म्हणून त्या रुजू झाल्या, पण एक वर्ष पूर्ण झाले नाही तोच २६ फेब्रुवारी १८८७ रोजी म्हणजे, त्यांच्या २२ व्या वाढदिवसाच्या एक महिन्या आधीच आनंदी गोपाळ जोशी ह्यांचे क्षयरोगाच्या दुर्धर विकाराने निधन झाले. बोटीचा लांबचा प्रवास आणि अतिथंडी त्यांच्या जीवावर बेतली.
महिलांसाठी स्वत:चे वैद्यकीय महाविद्यालय उघडण्याचे त्यांचे स्वप्न अपूर्णच राहून गेले. त्यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण भारतातील ठळक बातम्यांमध्ये त्यांचीच बातमी होती. कृतज्ञता म्हणून, त्यांच्या अस्थी न्यूयॉर्कच्या पॉकीस्की (Poughkeepsie) येथील दफनभूमीमध्ये ठेवण्यात आल्या व तिथेच त्यांचे स्मारक आहे. त्यांच्या सन्मानार्थ, लखनऊ येथील एनजीओ, सामाजिक विज्ञान आयआरडीएस या संस्थेत रिसर्च अँड डॉक्यूमेंटेशन यासाठी संस्था आजही, ‘आनंदी बाई जोशी पुरस्कार’ देऊन विद्यार्थ्यांना सन्मानित करते. महाराष्ट्र सरकार कडूनही आनंदी गोपाळ जोशी यांच्या नावावर एक फेलोशिप दिली जाते.
Surekh lekh!! Aani atishay uttam mahit….
आपल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार.
आपली “लई भारी” वेबसाईट तुमच्या मित्र मैत्रिणी सोबत शेअर करायला विसरू नका.