मोहनदास करमचंद गांधी आपल्याच काही देशबांधवांसाठी शत्रू का झाले आणि त्यांच्यावर बॉम्ब हल्ला का घडवून आणला गेला ?
साल १९३४, भारतीय स्वातंत्र्याचा लढा पुर्ण ताकदीने सर्व बाजुने लढला जात होता. ब्रिटिशांनी १८४७ च्या उठावात भारतीय जनतेचे धार्मिक ऐक्य पाहीले आणि त्यांचा आक्रोश आणि बंड देखील पाहीला होता. ब्रिटिशांनी कसे बसे ते बंड थोपवून काढले होते आणि त्यानंतर असे बंड पुन्हा उठू नये म्हणून कंपनी सरकारच्या कारभारात इग्लंड पंतप्रधानांनी लक्ष घालायला सुरुवात केली.
भारतीय जनतेचा असंतोष उठावाच्या ऐवजी एका संघटनेमार्फत टेबलावर व्यक्त केला जावा ह्यासाठी ॲलन ह्युम ह्यांनी १८८४ साली कॉंग्रेस हा पक्ष खास भारतीय असंतोष दुर करण्यासाठी उभारला आणि त्यांना माहीत नव्हते की लोकमान्य टिळक नावाचा झंजावात आणि गांधी नावाचे वादळ ह्या पक्षामार्फतच स्वातंत्र्यलढा अधिक टोकदार करतील. इथे विषय आहे मोहनदास करमचंद गांधी ह्यांचा आणि आपल्याच काही देशबांधवांसाठी ते शत्रू का झाले आणि त्यांच्यावर झालेल्या बॉम्ब हल्ल्याचा.
सन १९३४ पर्यंत गांधीनी स्वातंत्र्य लढ्याची सर्व सुत्रे आपल्या हाती घेतली होती. १९२० पुर्वी गांधी टिळकांना भेटले तेव्हा टिळकांची जहाल भूमिका पाहुन गांधी म्हणाले “इंग्रज हे काही वाईट नाहीत, आपण चर्चेने त्यावर मार्ग काढु शकतो.” ह्यावर टिळक म्हणाले “जेव्हा तुम्हाला इंग्रजांची नियत समजेल तेव्हा त्यांना विरोध करण्यात तुम्ही माझ्याही पुढे असाल”, झालेही तसेच. एकीकडे अस्पृश्यता निवारणाचे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर करत होते आणि गांधीना नुकताच पुणे करारात त्यांच्या कडव्या आणि स्पष्ट मतांचा अनुभव आला होता.
अस्पृश्य स्वातंत्र्यलढ्यापासुन दुर जाउ नये म्हणून अस्पृश्यता निवारणाचे कार्य जोमाने हाती घेऊन गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यासाठी हरीजनांचा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करत होते. त्यात मुस्लिमांच्या खिलाफत चळवळीत भाग घेऊन गांधीजींनी हिंदू कट्टरपंथीयाचा रोष ओढवुन घेतला होता. हिंदूच्या व मुस्लिमांच्या अस्वस्थतेचे आणखी एक कारण म्हणजे येणारे स्वातंत्र्य नेमके कोणाचे असेल. मुस्लिमांना आपल्या पुर्वजांनी ज्या हिंदुस्थानावर हुकुमत इतकी शतके केली त्या हिंदुस्तानात जर स्वातंत्र्यानंतर हिंदुंच्या अधिपत्याखाली राहणे मान्य नव्हते, हिंदुंना हा देश आपला आहे, आपण बहुसंख्य आहोत म्हणून मुस्लिम राज्यकर्ते नको होते आणि ह्यात सामाजिक सुधारणा न करता त्याआधी स्वातंत्र्य मिळाले तर धर्माने लादलेली बंधने कायद्याने लादली जाण्याची भीती दलिततांमध्ये होती.
ह्या सर्व असंतोषांना दुर करुन स्वातंत्र्यलढा पुढे नेणे हे अवघड काम गांधीजींना करायचे होते. हिंदु महासभा, मुस्लिम लिग ह्या धार्मिक पक्षांनी हा असंतोष वाढत राहील ह्याची काळजी घेतली असे दिसते. हिंदू महासभेला गांधीजींचे हे सर्व प्रयत्न हिंदुना दुखावणारे आहे असे वाटु लागले आणि हा आपला शत्रू आहे असे आपल्या सभासदांमध्ये ठसवण्यात ते यशस्वी झाले होते. इथुन सुरु झाली महात्मांच्या खुनाच्या कटाची मालिका.
ही घटना “हत्याकांड – दी स्टोरी ऑफ गांधीज मर्डर” ह्या पुस्तकाच्या संदर्भातुन घेतली आहे. १९३४ ला महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी हरीजन यात्रेसाठी पुण्यात आले होते. पुणे नगरपालिकेच्या सभा दालनात गांधीजी आपले भाषण देणार होते. ह्या कार्यक्रमासाठी गांधीजी मोटारीने पुण्यात आले. सोबत हुबेहूब तशीच दुसरी मोटार होती. गांधीजींची मोटार अजुन रेल्वे क्रॉसिंग जवळ होती आणि दुसरी मोटार पुणे नगरपालिका सभागृहाजवळ पोहोचली आणि स्वागत सदस्यांना वाटले की ही गांधीजीच मोटार असावी म्हणून ते स्वागतासाठी पुढे आले आणि तोच एक बॉंम्ब मोटारीवर फेकण्यात आला ज्याने नगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याला, दोन पोलिसांना व सात इतर लोकांना जखमी केले.
गांधीजींचे सचिव प्यारेलाल लिहीतात की “हा एक खुप नियोजनबद्ध कट होता, ह्या आधीचे कट चुकीच्या नियोजनामुळे व अपुऱ्या सहकार्यामुळे फसले.” ह्याचाच अर्थ गांधीजींच्या खुनाचा कट हा गोडसेंच्याही आधीपासुन रचला जात होता. एवढं असुनही गांधींजींनी आपल्या भूमिका आणि मत घाबरून बदलली नाहीत.
ह्या कार्यक्रमाला संबोधित करतांना ते म्हणाले “हे दुर्भाग्य आहे कि मी हरीजनांच्या उद्धारासाठी कार्य करत असतांना अश्या प्रकारे जीवघेणा हल्ला माझ्यावर व्हावा. मला सध्या शहीद व्हायची बिलकुल इच्छा नाही पण तसे होणार असेल तर मी त्यासाठी तयार आहे. पण मला मारण्याच्या प्रयत्नात ते इतरांना का इजा पोहचवताय ? माझी पत्नी आणि त्या तिन मुली ज्या मला माझ्या मुली सारख्या आहेत त्यांनी तुम्हाला क्रोध यावा असे काय केले ?”
हा हल्ला करणारे पळ काढण्यात यशस्वी झाले आणि कुणाच्याही अटकेचा पुरावा इथे दिसत नाही. कागदोपत्री नोंद झालेला हा महात्माजींवरचा पहीलाच हल्ला. त्यानंतर २० जानेवारीला पुन्हा गोडसे आणि सहकाऱ्यांनी बॉंम्ब टाकुन हत्येचा कट रचला पण तोही फसला. अखेर ३० जानेवारीला गांधीहत्या तडीस नेण्यास ते यशस्वी झाले.
“राष्ट्रपीता” म्हणवल्या जाणाऱ्या ह्या माणसाला समजुन घेणे सोपे नाही. आत्ता ह्या क्षणाला मनाला जे पटतं तेच सत्य, दुसऱ्या क्षणाचे सत्य हे वेगळे असु शकते आणि त्या क्षणाला स्वतःला बदलण्याची ताकद ह्या माणसात होती. खिलाफत चळवळीत एक हिंदु मुस्लिमांची मदत करतोय ह्या भावनेने हिंदु मुस्लिम एक्य निर्माण होईल अशी त्यांची धारणा होती. ह्यात ते मुस्लिमधार्जिणे कसे होतात ? अल्पसंख्यांकांना दिलासा वाटेल असेच वर्तन बहुसंख्यांकडुन झाले पाहीजे, अशाने अस्वस्थता कमी होउन सलोखा वाढतो असे त्यांचे मत होते. त्यात चुकीचे काय होते ?
स्वातंत्र्यदिवस गांधींनी साजरा केला नाही कारण असे तुकडा पडलेले स्वातंत्र्य त्यांना नकोच होते. ह्यात त्यांचा हट्ट चुकीचा असु शकतो पण हत्या करुन माणुस संपवुन त्याला वध म्हणणे नक्कीच देशहिताचे नाही. ह्या सर्वांकडे तटस्थपणे पाहणे आजच्या पीढीने शिकले पाहीजे. शेवटी देशापेक्षा कुठलाही महात्मा मोठा नाही, ना कुठलाही धर्म.