काही दिवसांपूर्वी पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पूराने अक्षरशः थैमान घातले होते. पावसाचे वाढलेले प्रमाण त्यातच अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडण्यात झालेली दिरंगाई यामुळे ही पूरस्थिती अधिकच भीषण झाली. कित्येकांचे संसार उध्वस्त झाले, जनावरे वाहून गेली, अनेकांचा तर जीवही गेला. काही दिवसांच्या मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने अक्षरशः होत्याचं नव्हतं करून टाकलं.
मात्र हे सर्व सुरु असताना काहींनी २००५ साली आलेल्या पूराच्या आठवणी जागवल्या, जेव्हा कर्नाटक सरकारने अलमट्टीचे दरवाजे उघडण्यास नकार दिला होता. तेव्हा महाराष्ट्रातील एका शांत आणि संयमी स्वभावाच्या नेत्याने कर्नाटक सरकारला उघडउघड धमकीच दिली की
“कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाचे दरवाजे उघडून कृष्णेच्या पाण्याला पुढे जाण्यासाठी जर वाट करून दिली नाही तर आम्ही आमच्या राज्यातील धरणाचे सर्व दरवाजे उघडून सर्व पाणी कर्नाटकात घुसवू”.
ही धमकी मिळताच घाबरलेल्या कर्नाटक सरकारने ताबडतोब अलमट्टी धरणाचे सर्व दरवाजे उघडत कृष्णेच्या पाण्याला वाट करून दिली आणि पूरग्रस्त भागातील पाणी ओसरून जनजीवन सुरळीत झाले. आपल्या धमकीने कर्नाटक सरकारला वठणीवर आणणारा हा शांत आणि संयमी स्वभावाचा नेता दुसरा तिसरा कोणी नसून महाराष्ट्राचे लाडके स्वर्गीय रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर.आर.पाटील होते.
महाराष्ट्रात असा कोणी शोधून सापडायचा नाही ज्याला आर.आर.पाटील कोण हे माहित नसेल. साधी राहणी उच्च विचारसरणी, शांत आणि संयमी स्वभाव, कार्यक्षम आणि प्रामाणिक कर्तृत्व या सर्व गुणांचा सुरेख संगम म्हणजे आर.आर.पाटील होते. त्यांच्या याच आदर्श व्यक्तिमत्वामुळे सर्व त्यांना प्रेमाने आबा म्हणायचे.
आबांचे बालपण अतिशय कष्टात व गरिबीत गेले. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी रोजगार हमी योजनेवर काम करत करत आपले शिक्षण पूर्ण केले. दहावीला ७१ % गुण मिळवत आबा सांगली केंद्रात प्रथम आले होते तेव्हा इतरांप्रमाणे डॉक्टर किंवा इंजिनियर व्हावे अशी आबांची देखील इच्छा होती पण रोजगार हमी योजनेत रोज चार साडेचार तास काम केल्यावर सायन्सचे प्रॅक्टिकल्स कसे पूर्ण करणार ? कारण काम सोडून शिक्षण घेण्याइतपत आबांच्या घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. हा सर्व सारासार विचार करून आबांनी डॉक्टर, इंजिनियर बनण्याचा नाद सोडून दिला.
रोजगार हमीवर काम करत असताना आबांना पावणेदोन रुपये मिळायचे. तेव्हा हा मेहनताना वाढावा यासाठी आबा व त्यांच्या सहकार्यांनी आंदोलन केले. त्या आंदोलनात भाषण करताना आबांच्या प्राचार्यांनी त्यांना पाहिले. प्राचार्यांना आबांचे भाषण आवडल्यामुळे त्यांनी आबांना वक्तृत्व स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले. मात्र स्पर्धेला गेलो तर रोजगार बुडायचा. या कारणामुळे आबांनी कॉलेजला अट घातली की स्पर्धा जिंकली तर मिळणारे रोख बक्षिस स्वतः घेणार. कॉलेजने हे मान्य करताच आबांनी अगदी तयारीनिशी वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला व ती जिंकली सुद्धा. पुढे आबांची ही वक्तृत्व शैली आणखीनच उभारत गेली ज्याचा उपयोग त्यांना त्यांच्या राजकीय जीवनात झाला.
घरात संपत्तीवरून झालेले तंटे
घरात संपत्तीवरून झालेले तंटे, त्यातून झालेल्या वाटण्या, वाटण्यातून मिळालेली ३ एकर जमीन, त्यासोबतच आलेली गरिबी, वडिलांना लागलेले दारूचे व्यसन यांमुळे आबांचे बालपण फारच बिकट परिस्थितीतून गेले. मात्र असे असतानाही आबांनी हार न मानता परिस्थितीशी संघर्ष सुरूच ठेवला. यामुळेच आबांचा ग्रामीण पातळीवरून सुरु झालेला राजकीय प्रवास थेट राज्याच्या मंत्रिपदापर्यंत पोहचू शकला. कारण परिस्थिती समोर हात न टेकता तिच्याशी दोन हात करण्याची धमक त्यांच्यात होती. आबांनी भूषविलेल्या प्रत्येक पदावर आपल्या कार्यकर्तृत्वाची मोहोर उमटवली. आजही त्यांच्या या कर्तृत्वाचे दाद अगदी त्यांचे विरोधकही देतात.
एकदा पुण्याच्या पोलीस सांस्कृतिक केंद्राचं उदघाटन करायला जात असताना आबांनी सहजच एक बातमी वाचली की मुलाने डान्सबारमध्ये पैसे उडवण्यासाठी स्वतःच्या आईचा खून केला. ही बातमी मनाला सुन्न करणारी होती. सांस्कृतिक केंद्राच्या उदघाटन भाषणामध्ये “कला, करमणूक याला जीवनामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे पण आज डान्सबारसारखी संस्कृती जर मुलाला आईचा खून करण्यापर्यंत नेत असेल तर अशा गोष्टी महाराष्ट्रामध्ये ठेवायच्या का?” असा सवालच आबांनी उपस्थित केला.
आबांनी ग्रामीण जीवन फार जवळून पाहिले होते किंबहुना ते त्यांनी जगले होते. व्यसनामुळे कुटुंबाचे होणारे हाल त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले होते. त्यामुळे मंत्री असताना डान्सबार बंदीचा अतिशय धाडसी निर्णय आबांनी घेतला. या निर्णयानंतर अनेक डान्सबार चालक आक्रमक झाले. मात्र तरीही आबा आपल्या निर्णयावर ठाम राहिले. असाच एक निर्णय आबांनी गावठी दारूच्या बाबतीत देखील घेतला. गावठी दारू पिऊन कित्येक लोक आपले प्राण गमावत होते. त्यांच्या अशा अचानक होणाऱ्या मृत्यूमुळे त्यांची कुटुंब सुद्धा उध्वस्त होत होती. यावर लगाम घालण्यासाठी आबांनी गावठी दारूवरतीच बंदी आणली.
या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की घरगुती हिंसा आणि गावठी दारू पिऊन मरणाऱ्या लोकांच्या प्रमाणात घट झाली. परिस्थिती अडचणीची जरी असली तरी सत्याच्या आणि जनतेच्या हिताच्या बाजूने उभे राहणारे आबा होते, कुटुंबासारख्या समाजातील शेवटच्या घटकाचा देखील आपुलकीने विचार करणारे आबा होते. ते सर्वांची अगदी वडिलांप्रमाणे काळजी घ्यायचे म्हणून आबा हे नाव त्यांना सार्थ ठरायचे.
आबांनी त्यांच्या आईचे कष्ट पाहिले होते. तिची तिच्या मुलांसाठीची तडफड देखील पाहिली होती. त्यामुळे महिलेचे समाजासाठी असलेले योगदाना आबा चांगलेच जाणून असल्याने ते महिलांचा अतिशय आदर करायचे. एकदा मंत्री असताना आबांना एका महिलेचे पत्र आले की आम्हाला सरपंच केलं जातंय पण १ मे, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला ध्वजारोहण मात्र आमच्या हस्ते होत नाही. कधी पॅनलचा प्रमुख तर कधी नवराच येऊन ध्वजारोहण करतो. जेव्हा आबांनी विचारलं महिलांना झेंडावंदन का करू दिलं जात नाहीये ? तेव्हा लोकांनी असं म्हणायला सुरवात केली की ‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उध्दारी’, अशी एक दोरी त्यांच्या हाती पहिलीच दिली आहे तर आता झेंड्याची दोरी तरी पुरुषांच्या हाती असुदे.
लोकांचे हे म्हणणे पुरोगामी विचारांच्या आबांना कदापी पटणारे नव्हते. यावर त्वरीत कारवाई करत आबांनी परिपत्रकाचा काढले की ज्या गावमध्ये सरपंच महिला आहेत त्या गावामधल्या पुरुषाने जर ध्वजारोहण केले तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्याला तुरुंगात टाकले जाईल. महिलांचा प्रत्येक ठिकाणी योग्य तो सन्मान झालाच पाहिजे असे आबांचे ठाम मत होते आणि फक्त मतचं नव्हते तर त्यांच्या कृतीतून ते साफ झळकतही होते.
स्वछता अभियान
आज आपण स्वच्छ भारत योजना आणि त्या योजनेच्या नावावर सुरु असणारी लोकप्रतिनिधींची चमकूगिरी पाहतो. पण ही योजना प्रत्यक्षात किती यशस्वी ठरली हे ही सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र स्वच्छतेशी संबंधित एक योजना आघाडी सरकारच्या काळात आबांनी सुरु केली, जी कमालीची यशस्वी ठरली आणि तिचा परिणाम देखील समाजावर खोलवर झाला. प्रचंड संघर्ष आणि इर्षा महाराष्ट्रीयन लोकांच्या रक्तातच आहे. तेव्हा ही गोष्ट बरोबर पकडत या संघर्ष आणि ईर्षेला स्पर्धेची जोड देण्याचे काम करत आबांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाच्या रूपाने दिले.
आपल्या गावाला संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार मिळावा यासाठी प्रचंड लोकांनी यात सहभाग घेतला व याला लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. एवढंच नाही तर कोट्यवधी रुपयांची विकासकामे ही ह्याच लोकसहभागातून पार पडली. गावातील विद्यार्थी असो की अंगणवाडी सेविका-मदतनीस, सरपंच असो की महिला भगिनी सर्वांनीच या योजनेत भरीव योगदान देत गावाच्या सामाजिक तसेच आर्थिक विकासाला गती दिली. या अभियानाचे यश एवढे प्रचंड होते की युनिसेफ, युनो सारख्या जागतिक संघटनांना सुद्धा त्याची दखल घेणे भाग पडले.
आबांनी एखादं काम हाती घ्यावं आणि ते तडीस न जावं असं कधी झालचं नाही. कारण आबा प्रत्येक काम अगदी जीव ओतून करायचे आणि त्यांच्या याच गुणामुळे अनेक योजना यशस्वी ठरल्या.
आबांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक मोठमोठाली पदे भूषवली. परंतु स्वतःच्या यशाला अहंकाराचा स्पर्श त्यांनी कधीही होऊ दिला नाही. पक्षासाठी आणि समाजासाठी त्यांनी अगदी प्राणपणाने काम केले. त्यांचे इतर नेत्यांसारखे पोटात एक आणि ओठात एक असे वर्तन कधीही नसायचे. जे त्यांच्या मनात असायचे तेच ते बोलून दाखवायचे. महाराष्ट्र घडावा, ग्रामीण भागाचा पुरेपूर विकास व्हावा यासाठी शर्थीचे प्रयत्न आबांनी केले. कर्गरोग झाला असतानाही त्याचा पक्षाच्या कामगिरी परिणाम व्हायला नको म्हणून त्रास अंगावर काढत त्यांनी काम केले. स्वहित बाजूला सारून इतरांच्या चांगल्यासाठी काम करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी आबा एक होते. त्यांचे अचानक आपल्यातून निघून जाणे हे संपूर्ण महाराष्ट्राच्या जीवाला चटका लावून जाणारे होते.