“१९८४ साली राकेश शर्मा हे सोव्हिएत संघाबरोबर इस्रोने मिळून केलेल्या त्यांच्या इंटर – कॉसमॉस प्रकल्पाद्वारे अंतराळात प्रवास करणारे पहिले भारतीय तरुण होते”
जर तुमचा जन्म ९० च्या दशकाच्या सुरुवातीला किंवा त्या आधी झाला असेल, तर राकेश शर्मा तेव्हा किती लोकप्रिय व्यक्तीमत्व होते, हे तुम्हाला सांगायची गरजच नाही. त्या काळातील पालकांना स्वतःचे मूल हे राकेश शर्मासारखे व्हावे असेच वाटत होते. टीव्ही कार्यक्रमांमधून सगळीकडे त्यांचे कार्यक्रम असायचे, लोक त्यांना भेटायला, हात मिळवून घ्यायला, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायला अतिशय उत्सुक असायचे. जगभरात पसरलेल्या सगळ्या भारतीयांना त्यांचा अभिमान वाटत होता, त्याचे कारण सुद्धा तसेच होते. १९८४ साली राकेश शर्मा हे सोव्हिएत संघाबरोबर इस्रोने मिळून केलेल्या त्यांच्या इंटर – कॉसमॉस प्रकल्पाद्वारे अंतराळात प्रवास करणारे पहिले भारतीय तरुण प्रवासी बनले.
त्यांच्या आयुष्याबद्दल आणि त्या ऐतिहासिक प्रवासाबद्दल माहिती करून घेऊ या.
इस्रो आणि सोव्हिएत इंटर – कोसमॉस स्पेस प्रोग्रामच्या कार्यक्रमाचा भाग म्हणून, सप्टेंबर १९८२ साली माजी इंडियन एअर फोर्स पायलट असलेल्या राकेश यांची निवड करण्यात आली. ते कझाक सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिकमधील, बायकॉनूर कॉस्मोड्रोममधून, सोव्हिएत रॉकेट सोयझ टी – ११ मधून अंतराळात पोहोचलेले पाहिले भारतीय झाले. सोयझ टी – ११ मधून तीन सदस्यांची सोव्हिएत – भारतीय टीम, आंतरराष्ट्रीय सॅल्यूट (Salyut) 7 ह्या ऑर्बिटल स्टेशनवर पोहोचली. शर्मा यांनी ७ दिवस २१ तास आणि ४० मिनिटांचा कालावधी salyut7 ह्या स्टेशनवर अंतराळात घालवला.
ज्या दरम्यान त्यांच्या ३ जणांच्या टीमने मिळून वैज्ञानिक आणि तांत्रिक अभ्यास केला, ज्यामध्ये त्यांनी ४३ वेगवेगळे प्रयोग केले होते. मॉस्कोमधील अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त टेलिव्हिजन न्यूज कॉन्फरन्स दरम्यान जेव्हा इंदिरा गांधींनी राकेश शर्मा यांना विचारले की, भारत अंतराळातून कसा दिसतो ? तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “सारे जहां से अच्छा.” हे ऐकणे आणि बघणे म्हणजे लाखो भारतीय टीव्ही प्रेक्षकांसाठी एक अभिमानाचा क्षण होता, बघणाऱ्यांच्या अंगावर काटे आणि डोळ्यात अश्रू आले होते.
राकेश ह्यांच्या अयुष्याबद्दल अजून काही खास बाबी आज आपण जाणून घेऊया
१३ जानेवारी १९४९ या दिवशी पंजाबच्या पटियाळा येथे राकेश यांचा जन्म झाला. लवकरच राकेश त्याचे कुटुंब हैदराबादला राहायला गेले. राकेश शहरातील जुन्या शाळांपैकी एक असलेल्या सेंट जॉर्जेस ग्रॅमर स्कूलमध्ये शिकले आणि निजाम कॉलेजमधून पदवी अभ्यास पूर्ण केला. ५ वर्षांपेक्षाही कमी वय असल्यापासूनच जेव्हा त्यांना कोणी विचारले कि मोठा झाल्यावर काय होणार तेव्हा “मी मोठा होऊन लढावू विमान उडवणार” असे उत्तर राकेश देत असत, आणि ते खरे करून दाखवत नंतर १९६६ साली १८ वर्षांच्या वयातच त्यांनी भारतीय वायुसेनेमध्ये कॅडेट म्हणून प्रवेश मिळवला. १९७९ मध्ये ते टेस्ट पायलट बनले आणि १९७१ साली ते मिग फाइटर जेट्सवर पायलट होते. ते पाकिस्तान विरूद्ध लढाईत सहभागी होते. १९८४ मध्ये त्यांना स्क्वाड्रन लीडर म्हणून बढती मिळाली.
अशी झाली अंतराळवीर म्हणून तयारी
वायुसेनेत पायलट असताना, भारतीय स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो) आणि सोव्हिएत इंटरकोसमॉस यांनी आयोजित केलेल्या स्पेस मिशनसाठी त्यांची निवड झाली. या मोहिमेसाठी प्रशिक्षण घेण्यासाठी राकेश आणि त्यांची पत्नी मधु रशियात राहायला गेले आणि त्यांनी रशियन भाषा सुध्दा शिकली. संस्कृतींची देवाण – घेवाण करण्यासाठी, राकेश त्यांच्या टीममधील लोकांसाठी भारतीय जेवण बनवत.
युरी मालिशेव आणि गॅनेडी स्ट्रेकालोव यांना स्पेस स्टेशनवर त्यांनी भारतीय भोजन बनवून दिले. राकेश ह्यांना रशियन चीझ केक खूप आवडत असे. ३ एप्रिल १९८४ रोजी कझाकिस्तानच्या बायकोनूर कॉस्मोड्रोममध्ये ही अंतराळ मोहीम सुरू झाली. मोहिमेहुन परत आल्यावर त्यांच्यावर अभिनंदन, शुभेच्छा आणि मेडल्सचा वर्षाव झाला. सोशल फेडरेशनने त्यांना ‘हिरो’ हा सन्मान दिला. हा यूएसएसआरचा सर्वोच्च सन्मान आहे, तसेच अशोक चक्र देऊन भारत सरकारनेही त्यांचा गौरव केला.