शिवसेना हा एक मराठी माणसासाठी, त्यांच्या हक्कांसाठी लढणारा पक्ष म्हणून प्रसिद्ध आहे. शिवसेनेने अनेक चढ-उतार बघितले, अनेक निष्ठावान हिंदुत्ववादी कार्यकर्ते घडवले आणि समाजाला दिले. शिवसेना एका तत्त्वाने चालते ते म्हणजे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण. पण या शिवसेनेचा जन्म कसा झाला ? कोणाच्या प्रेरणेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या पक्षाची स्थापना केली जाणून घेऊयात ?
राजकारणात उतरण्यापुर्वी बाळासाहेब एक व्यंगचित्रकार म्हणून काही मासिकांसाठी काम करत असत. पुढे काही वर्षांनी त्यांनी स्वतःचं मार्मिक नावाचं एक मासिक चालू केले. त्या मार्मिकमधून ते मराठी माणसांच्या प्रश्नांना वाचा फोडू लागले. मार्मिकमधून मुंबईतील आस्थापनातील नोकर वर्गाच्या याद्या छापून येत होत्या. या याद्यांमध्ये प्रत्येक नाव परप्रांतीयांच असे. मराठी माणसांना त्यात स्थान नसे. मराठी माणसांची कुवत असूनही त्यांना त्या नोकरीपासून वंचित ठेवण्यात येत होते.
मुंबईतील सरकारी, निमसरकारी व खासगी कंपन्यांमध्ये दाक्षिणात्य तरुणांचा भरणा जास्त प्रमाणात होत होता. अशा ठिकाणीही मराठी तरुण औषधालाही शोधून सापडत नसे. मार्मिक मधील बाळासाहेबांच्या लेखनाने मुंबईतील मराठी लोकांचे स्फुल्लींग चेतवले होते. अनेक मराठी माणसं मार्मिकच्या कार्यालयामध्ये येऊन त्यांची व्यथा व्यक्त करत असत. पुढे हळूहळू या लोकांची संख्या वाढू लागली, मार्मिकच्या कार्यालयापुढे गर्दी होऊ लागली आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी बाळासाहेब पुढाकार घेत असत.
या सगळ्या खटाटोपातून एक चळवळ उभी राहिली आणि मग प्रबोधनकार ठाकरे यांनी बाळासाहेबांना सल्ला दिला,
“बाळ या जमलेल्या लोकांना काहीतरी नाव देऊन एकत्र ठेव. या चळवळीला संघटनेचा आकार द्या, तरच त्यातून काहीतरी निर्माण होईल नाहीतर ही जागृती फुकट जाईल.”
पण समोर अनेक प्रश्न होते, संघटना तयार करायची तर नाव काय असेल ? केव्हा निर्माण करायची संघटना ? संघटनात्मक बांधणी कोणी करायची ? इत्यादी प्रचंड प्रश्न मनात असताना फक्त प्रबोधनकारांनी सांगितले आहे म्हणून बाळासाहेबांनी संघटना तयार करण्यास होकार भरला. प्रबोधनकारांनी परत विचारले, बाळासाहेब केव्हा चालू करायची संघटना ? “आत्ता” बाळासाहेबांचे हे उत्तर ऐकून सहदेव नाईकने छत्रपतींच्या पुतळ्यासमोर नारळ फोडला आणि एका संघटनेची स्थापना झाली. हा दिवस होता 19 जून 1966 आणि या संघटनेचे नाव “शिवसेना”.
शिवसेना आजतागायत मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी निकराने लढा देताना दिसून येईल. दोन दिवसातच या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेचे 10,000 सक्रिय सदस्य तयार झाले, त्यांची नोंदणीही पूर्ण झाली. 26 जून 1966 मार्मिकमध्ये शिवसेनेचे बोधचिन्ह म्हणून डरकाळ्या फोडणारा वाघ छापण्यात आला. सोबत छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा छापण्यात आली, त्याच्या पार्श्वभूमीवर अखंड महाराष्ट्राचे चित्र आणि त्याच्यावर, “मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा.” हे वचन लिहिलेले होते आणि मोठ्या अक्षरांमध्ये या संघटनेचे नाव छापण्यात आले होते “शिवसेना”.
शिवसेनेने स्वीकारलेले बोधचिन्ह अनेक गोष्टींचे प्रतीक होते. खरं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे शिवसेनेचे आराध्य दैवत आहे. शिवाजी महाराज तुळजाभवानी या देवीचे मोठे भक्त होते आणि वाघ हे भवानीमातेचे वाहन आहे. म्हणूनच बाळासाहेबांनी शिवसेनेचे बोधचिन्ह म्हणून वाघाची निवड केली. वाघ म्हणजे रुबाबदार आणि आक्रमकपणा यांचे प्रतीक आहे. हे बोधचिन्ह स्वतः बाळासाहेब यांनी रेखाटले आहे.
शिवसेनेने स्थापनेनंतर सर्वात मोठा जाहीर कार्यक्रम घेतला तो म्हणजे दसरा मेळावा. शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आला होता. मार्मिक वगळता इतर कुठल्याही वर्तमानपत्रात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची बातमी किंवा जाहिरात नव्हती, तरीही महाराष्ट्राच्या भिन्न भिन्न भागातून लोक मेळाव्याला आले. शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कात लाखो मराठी लोकांचा जनसागर उसळलेला. शाहीर साबळे यांनी आपल्या पोवाड्याने मेळाव्याची दिमाखदार सुरुवात केली. या मेळाव्याला महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.
या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करताना प्रबोधनकार ठाकरे म्हणाले की, “आज हा माझा बाळ मी महाराष्ट्राला अर्पण करत आहे”, आणि तेथून सुरुवात झाली शिवसेनेच्या संघर्षशील झंझावाताला.