आजही एखादा नवोदित लेखक इंडस्ट्रीत आला की त्याला विचारलं जातं, “क्यों सलीम-जावेद बनना चाहते हो ?”
“कितने आदमी थे” हा गब्बरचा संवाद असो किंवा दिवार मधला “मै आज भी फेके हुए पैसे नहीं उठाता” असे खटकेबाज संवाद आले की चित्रपटगृहात शिट्ट्या आणि टाळ्यांचा पाऊस पडायचा आणि ह्या संवादांचे जनक होते सलीम – जावेद. खरतर चित्रपट लेखकांना फार प्रसिद्धी मिळत नाही, पण सलीम जावेद (Salim – Javed)ना नुसती प्रसिद्धीच मिळाली नाही तर ग्लॅमरसुद्धा मिळालं.
आजही एखादा नवोदित लेखक इंडस्ट्रीत आला की त्याला विचारलं जातं, “क्यों सलीम-जावेद बनना चाहते हो ?” बाँलिवुडमध्ये अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमीर खान हे सुपर स्टार असतील तर सलीम जावेद हे सुपर रायटर होते. त्यांनी लिहिलेल्या चित्रपटांकडे ओझरती नजर टाकली तरी हे लक्षात येईल. जंजीर, दिवार, त्रिशूल, डॉन, काला पथ्थर, मजबूर, यादों की बारात, हाथी मेरे साथी, सीता और गीता असे त्यांनी एकूण चोवीस चित्रपट लिहिले आणि त्यातील वीस सुपरहिट झाले.
अमिताभ ह्या चित्रपट सृष्टीत स्थिरावला किंवा खरंतर त्याला अँग्री मॅनची ओळख मिळाली ती ह्या दोघांमुळेच. मग असा प्रश्न पडतो की एवढ्या चित्रपटांचे यशस्वी लेखक वेगळे का झाले ? खरंतर वेगळं होण्याला काही विशेष कारण नव्हतं. नंतर ह्या गोष्टीची चर्चाही ह्या दोघांनी केली नाही. त्यांच्यात काही वादही झाले नाहीत. सलीम खाननी सांगितल्याप्रमाणे जावेद अख्तरनीच एकदा काम करत असताना त्यांच्याकडे हा विषय काढला की आपण वेगळे होऊया. मला आता काहीतरी स्वतंत्र करावंसं वाटतंय. सलीम खान काही बोलले नाहीत. ते उठून आपल्या घरी गेले आणि ही युती संपुष्टात आली.
असा अंदाज आहे की जावेदना गीत लेखन करायचं होत. सलीमना त्यांनी तसं सांगूनही पाहिलं की ह्यात मी तुमचंही नाव देईंन, पण गीतलेखन हा माझा प्रांत नाही आणि नुसतं नाव येण्यात मला रस नाही. असं स्पष्ट सांगून सलीम खाननी जावेद अख्तर ह्यांचा प्रस्ताव नाकारला. दोघे वेगळे झाल्यावर जमाना आणि मि. इंडिया ह्या चित्रपटात दोघांची एकत्र नावं झळकली पण ते चित्रपट त्यांची युती तुटण्यापूर्वी लिहिले गेले होते. असं म्हटलं जात की जावेद अख्तर ह्यांनी डेझी इराणी ह्यांच्याशी घटस्फोट घेऊन शबाना आझमी ह्यांच्याशी लग्न केल्यावर त्यांनी स्वतंत्रपणे काहीतरी करण्याची जाणीव करून दिली असावी.
वेगळे झाल्यानंतर जावेद अख्तर गीतलेखनाकडे वळले. सलीम खाननी नंतर चित्रपटांसाठी पटकथा लिहिल्या पण नाम वगळता फार यश मिळालं नाही. जावेद अख्तर यांनी प्रतिकार नावाचा चित्रपट लिहिला आणि नंतर त्यांच्या मुलासाठी म्हणजेच फरहानसाठी डॉनची पटकथा लिहिली. हे अपवाद वगळता ते फारसे पटकथा लेखनाकडे वळले नाहीत. कदाचित दोघे वेगळे झाल्यानंतर त्यांच्या लिखाणातला आत्मा हरवून गेला असावा. विचार करा ! आजही ते एकत्र असते तर कदाचित पुन्हा एकदा खटकेबाज संवादांची उधळण झाली असती आणि पुन्हा एकदा चित्रपटगृहात शिट्ट्या आणि टाळ्यांचा तसाच पाऊस पडला असता, पण स्वप्न ही संपण्यासाठीच असतात ना !