“भारतीय जनता पार्टी या राजकीय पक्षाचं नाव आज भारतामध्ये सर्वदूर पसरलेल आहे. पण एक काळ होता ज्यावेळी या पक्षाचे केवळ दोनच खासदार संसदेमध्ये होते.”
तसं पाहायला गेलं तर भारतामध्ये अनेक राजकीय पक्षांचा उदय झाला होता, पण भाजपा एकमेव असा पक्ष आहे जो दिवसेंदिवस शक्तिशाली होत गेला. या पक्षाने अनेक चढ – उतारही बघितले आहेत. आज आपण जाणून घेऊयात भाजपच्या संघर्षाची कथा. कशाप्रकारे आणि कुठल्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली, या सर्व घटनांची माहिती या लेखामध्ये आपण घेणार आहोत.
राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन 21 ऑक्टोबर 1951 रोजी जनसंघ स्थापन झाला. त्याच्या स्थापनेमागे सर्वात मोठा हात डॉक्टर शामाप्रसाद मुखर्जी यांचा होता. त्यांनी जवाहरलाल नेहरू यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आणि राष्ट्रीय विचारांनी प्रेरित होऊन एक पक्ष स्थापन करण्याची त्यांची इच्छा तत्कालीन सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्याकडे बोलुन दाखवली. गोळवलकर गुरूजी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यात झालेल्या चर्चेदरम्यान असे निष्पन्न झाले की संघाने राष्ट्रीय विचारांनी प्रेरित झालेल्या काही तरुणांना शामाप्रसाद मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली तयार होणाऱ्या संघटनेमध्ये सहभागी करावे आणि भविष्यातील राजकारण राष्ट्रहितासाठी व्हावे. यासाठी संघानेही या त्यांच्या प्रस्तावाला मान्यता दर्शवली आणि त्यानंतर जनसंघाची स्थापना झाली.
जनसंघाच्या स्थापनेपासूनच पंडित दीनदयाळ उपाध्याय, अटल बिहारी वाजपेयी, नानाजी देशमुख यांच्यासारखी दिग्गज मंडळी जनसंघासोबत जोडली गेली होती. जनसंघाचा हा डोलारा संपूर्ण भारतामध्ये पोहोचवण्यासाठी अनेक प्रकारची आंदोलनं करण्यात आली. पुढे काही वर्षांनी जनसंघाने जनता दलाशी हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली. जनसंघाने या काळामध्ये अनेक प्रकारच्या राजकीय घडामोडी पाहिल्या. नानाजी देशमुख जे जनसंघाचे त्या काळातील सर्वात मोठे नेते म्हणून बघितले जात होते, त्यांनी काही काळ इंदिरा गांधी यांनाही मदत केली, पण पुढे इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केली आणि जनसंघाने इंदिरा गांधी यांच्या विरोधात देशभरामध्ये निदर्शन केली.
या काळामध्ये जनसंघाचेच नव्हे तर इतरही अनेक पक्षांचे नेते बळजबरी जेरबंद करण्यात आले. या काळामध्ये पत्रकारांनाही सरकार विरोधी लिहिण्यासाठी परवानगी नव्हती. या आणीबाणीच्या काळामध्ये जनसंघाचे अनेक नेते भूमिगत काम करू लागले. सरकारविरोधी आंदोलन केल्याबद्दल अनेक नेत्यांना जेरबंद करण्यात आले. पुढे जेपी (जयप्रकाश नारायण) आंदोलन देशभरामध्ये गाजू लागले, आणि याच काळामध्ये स्थापना झाली भारतीय जनता पक्षाची.
जनसंघापासून फारकत घेऊन नवीन पक्ष बांधणी करणे तसे अवघड काम होते, पण भाजपाकडे जनता दलातील सरकारच्या कार्यकाळाचा अनुभव होता, आणि जनसंघातील निष्ठावान कार्यकर्त्यांची तगडी फौज होती. 6 एप्रिल 1980 रोजी भारतीय जनता पार्टीची स्थापना करण्यात आली. या राजकीय पक्षाचे पहिले राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव घोषित करण्यात आले. याच पहिल्या अधिवेशनामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेली भविष्यवाणी खूपच प्रसिद्ध आहे, ती अशी होती की,
“अंधेरा छटेगा, सुरज निकलेगा, कमल खिलेगा”
पुढे अटलजीनी केलेली ही भविष्यवाणी सत्य ठरलेली आपणास दिसुन येईल. गेल्या पाच वर्षांमध्ये आपण बीजेपीचा पसारा पूर्ण भारतामध्ये वाढलेला बघतो आहोत, तो स्थापनेच्या काळी होता असे नाही. एक काळ होता ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचे 2 खासदार लोकसभेत पक्षाचे नेतृत्व करत होते, पण आज हाच पक्ष प्रचंड बहुमत घेऊन केंद्रामध्ये एकहाती सत्ता राबवतो आहे. भारतीय जनता पार्टीची स्थापनेनंतरची वाटचाल खडतर राहिली.
स्थापनेनंतर भाजपाने हिंदुत्वाची कास न धरता, समाजवाद आणि गांधीवाद या दोन तत्वांना सोबत घेऊन राजकारण करण्याचे ठरवले होते. त्यादृष्टीने अटल बिहारी वाजपेयी यांचा चेहराही पुढे करण्यात आला. स्थापनेनंतर लढल्या गेलेल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीमध्ये म्हणजे 1984 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपाने 2 खासदार निवडून आणले. या निवडणुकीमध्ये खुद्द अटल बिहारी वाजपेयी यांचाही पराभव झाला होता. त्यानंतर पक्षामध्ये चिंतन बैठक बसली आणि पुढे लाल कृष्ण आडवाणी यांना पक्षाचे अध्यक्षपद भूषवण्याची संधी मिळाली, कारण पक्षामध्ये बऱ्याच जणांचा असा समज होता की अटल बिहारी वाजपेयी यांनी पक्षामध्ये चालू केलेली नवीन वैचारिक धारा पक्षासाठी फायद्याची ठरत नाही.
त्यानंतर मात्र लालकृष्ण अडवाणी यांनी पूर्णपणे हिंदुत्वाचा स्वीकार करत भारतीय जनता पक्षाला नवीन जीवनदान दिले. लालकृष्ण अडवाणी यांनी हिंदुत्वविरोधी प्रत्येक शक्तीला pseudo-secular अशा काही शब्दांनी नाव ठेवत, पक्षाच्या वैचारिक विचारधारेचा विकास केला आणि या सर्व गोष्टींचा अपेक्षित परिणाम त्यांना छोट्या – मोठ्या निवडणुकांमधून दिसतच होता. हिंदुत्वाचा भारतीय जनता पक्षाच्या विस्तारासाठी फायदा होतोय ही गोष्ट लक्षात आल्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी “विश्व हिंदू परिषद” या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेला पाठिंबा दर्शविला.
या काळामध्ये विश्व हिंदू परिषद, रामजन्मभूमीच्या आंदोलनासाठी आग्रही होती. लालकृष्ण अडवाणी यांनी या आंदोलनालाही पाठिंबा दर्शविला. संपूर्ण देशभरामध्ये रामजन्मभूमीसाठी सामान्य जनतेच्या मनामध्ये भावनिक आस्था आहे हे लालकृष्ण अडवाणी यांना माहिती होते, त्यामुळेच त्यांनी गुजरातपासून अयोध्येपर्यंत एका रथयात्रेचं आयोजन केलं. या रथयात्रेला देशभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. आयोध्येत कार सेवा करण्यासाठी लाखो कार्यकर्ते जमा होऊ लागले. याच काळात झालेल्या 1989 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने 85 लोकसभा जागा जिंकल्या आणि भाजपच्या लक्षात आलं, की राम जन्मभूमीचे आंदोलन हि देशाच्या मनातील गोष्ट आहे.
या आंदोलनाला भाजपने पाठिंबा चालू ठेवला, आणि 1991 मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये याचा फायदाही पक्षाला झाला. भाजपने या वेळेस 120 जागांवर बहुमत प्राप्त केलं होत. 1996 च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या जागा 161 पर्यंत पोहोचल्या होत्या. या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने सरकार बनवण्यासाठी प्रयत्न केला, कारण या काळामध्ये भारतीय जनता पक्ष लोकसभेमधील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. याच काळामध्ये भारतीय जनता पक्षाने उदारमतवादी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली सरकारची स्थापना केली.
हे सरकार जेमतेम तेरा दिवसच तग धरू शकले. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांना राजीनामा द्यावा लागला. पुढील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भाजपाने 182 जागा जिंकल्या आणि इतर काही पक्षांसोबत युती करून एक सरकार स्थापले, मात्र हे सरकारही तेरा महिन्यांच्या वर टिकू शकले नाही. एका मतामुळे भाजपचे हे सरकार देखील कोसळले. 1999 मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली एनडीएची स्थापना करण्यात आली. यावेळी मात्र एनडीएला 270 जागा जिंकण्यात यश मिळाले.
भाजपाने या निवडणुकांमध्ये 182 जागा जिंकल्या होत्या. यावेळी अटल बिहारी वाजपेयी पुन्हा पंतप्रधान झाले ते सरकार मात्र पूर्ण पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करण्यास सक्षम होते. पुढे 2004 नंतर काय घडले या गोष्टीची कल्पना आपल्यापैकी प्रत्येकालाच आहे. अशा खडतर रस्त्यावरून वाटचाल करत भारतीय जनता पक्ष आज पाशवी बहुमताच्या उंबरठ्यावर उभा आहे. असा एक अंदाज आहे की 2014 मध्ये जेवढं बहुमत भारतीय जनता पार्टीने मिळवले, आज त्याहून जास्त बहुमत भारतीय जनता पार्टी 2019 मध्ये मिळवेल. पण या सगळ्या बहुमताच्या मागे अनेक त्यागी कार्यकर्त्यांचा व नेत्यांचा असामान्य त्याग आहे हे विसरू नये एवढीच अपेक्षा.