आधी फडणवीसांना कच्चा खिलाडी म्हणणारे राजकीय विश्लेषक आता मात्र त्यांना “लंबी रेस का घोडा” म्हणत आहेत.
राजकारण हा प्रांत तसा महाकठीण. राजकारणात टिकून राहणे व त्यात आपले वेगळे स्थान निर्माण करणे अतिशय मुश्कील. त्यासाठीच म्हणतात कि, “राजकारणातील डावपेच हे कुणालाही खेळता येत नसतात त्यासाठी राजकारण हे रक्तातच असावे लागते” आणि लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी फक्त राजकारण करून चालत नाही तर त्यासोबतच समाजकारणही करता आले पाहिजे.
असाच एक प्रतिभावान नेता, कुशल संघटक आणि खंबीर लीडर महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला मिळाला. वयाची पन्नाशीही त्यांनी पार केलेली नसली तरीही महाराष्ट्राच्या राजकारणातील अनेक जेष्ठ व धुरंधर विरोधकांना त्यांनी सळो कि पळो करून सोडले आहे. वयाच्या एकविसाव्या वर्षी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर आज ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आहेत.
अनेकांना ह्या लेखाच्या सुरुवातीच्या काही ओळी वाचल्यानंतरच लक्षात आले असेल कि आम्ही कुणाबद्दल बोलत आहोत. होय! आम्ही बोलत आहोत महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ह्यांच्याबद्दल.
२०१४ साली भाजपने लोकसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळवले. त्यानंतर लगेचच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. भाजप शिवसेना युतीचे सरकार सत्तेत येणार हे निश्चित झाले होते. पण, मुख्यमंत्री कोण होणार हा सर्वात कठीण प्रश्न सगळ्यांना पडला होता. कारण, महाराष्ट्र हे राजकीयदृष्ट्या अतिशय कठीण असे राज्य आहे. इथे सत्ता मिळवणे व त्याहीपेक्षा ती टिकवणे म्हणजे तारेवरची कसरत असते हे सर्व राजकीय विश्लेषक आणि जाणकार जाणून आहेत.
मुख्यमंत्रीपदासाठी अनेक नावे चर्चेत होती. पण नरेंद्र मोदी व भाजपने अश्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसवले ज्याची चर्चा कुणी कधीच केली नव्हती. अनेक चर्चा व बैठकांनंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होतील हे निश्चित झाले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. अनेक राजकीय विश्लेषक तर असे म्हणू लागले कि फडणवीस ह्यांना मुख्यमंत्री करणे म्हणजे भाजपचा राजकीय मूर्खपणा आहे. मोदी व भाजपचा हा निर्णय खरंच चुकला कि काय असे अनेकांना सुरुवातीला वाटत होते. पण देवेंद्र फडणवीस ह्या व्यक्तीने सर्व राजकीय विश्लेषक व जाणकारांचे अंदाज धुळीस मिळवले. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद नुसते भूषवलेच नाही तर सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा नवीन विक्रम प्रस्थापित केला.
केवळ सर्वाधिक काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविण्याचा विक्रम फडणवीस ह्यांच्या नावावर नाही तर अजून एक विक्रम त्यांनी आपल्या नावावर केलाय तो म्हणजे नागपूर महानगरपालिकेतील सर्वात कमी वयाचा नगरसेवक म्हणून निवडून येण्याचा.
वयाच्या २१ व्या वर्षी प्रथमच नगरसेवक बनल्यानंतर वयाच्या केवळ २६ व्या वर्षी नागपूर शहराचा महापौर बनणे हे राजकीय कारकिर्दीतील फार मोठे यश मानले जाते. देवेंद्र फडणवीस ह्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आलेख त्यानंतर चढताच राहिला. कारण त्यांना मिळालेली ही महापौरपदाची खुर्ची म्हणजे केवळ योगायोग किंवा नशिबाचा भाग नव्हता तर त्यामागे होती देवेंद्र फडणवीस ह्यांची राजकीय समज आणि हे त्यांनी दुसऱ्यांदा महापौर बनून सिद्ध केले. वयाच्या २६-२७ व्या वर्षी महापौर बनून त्यांनी अजून एक विक्रम आपल्या नावावर केला. ते देशातील दुसरे सर्वात कमी वयाचे महापौर बनले होते.
असे मिळाले राजकारणाचे धडे
२२ जुलै १९७० ला नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस ह्यांचा जन्म झाला. राजकारणाचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच गंगाधरपंत फडणवीस ह्यांच्याकडूनच मिळाले. देवेंद्र फडणवीस ह्यांचे वडील व भाजपचे दिवंगत नेते गंगाधरपंत फडणवीस हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून कार्यरत होते. नंतर त्यांनी जनसंघात प्रवेश करून राजकारणाचा श्रीगणेशा केला. जनसंघ व जनता पार्टीने त्यांना विधानपरिषदेचे सदस्यत्व देऊ केले.
गंगाधरपंतांचे कनिष्ठ चिरंजीव देवेंद्र त्याच दरम्यानच्या काळात राजनीतीचे धडे गिरवत होते. आपल्या सक्रिय राजकारणाचा प्रारंभ त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेद्वारे केला. बीजेपीचे युवा नेता म्हणून काम करतांना त्यांचे नेतृत्वगुण बहरत होते. विरोधकांबरोबरच शिवसेनेसारख्या मित्रपक्षालासुद्धा आपले नेतृत्व मान्य करायला भाग पाडणाऱ्या देवेंद्र फडणवीस ह्यांनी आज राजकारणात जे यश मिळवले ते स्वतःच्या राजकीय प्रतिभेच्या आणि नेतृत्वगुणाच्या बळावरच.
असे होते बालपण व शिक्षण
वयाच्या सहाव्या वर्षी इंदिरा कॉन्व्हेंट स्कुलमध्ये देवेंद्र यांनी प्रवेश घेतला खरा पण त्यांनी ह्या शाळेमध्ये शिक्षण घेण्यास नकार दिला. कारण होते त्या शाळेचे नाव. देवेंद्र फडणवीस ह्यांचे वडील गंगाधरराव फडणवीस जनसंघ पक्षाचे नेते होते. आणीबाणीच्या काळात अनेकवेळा त्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते.
आपल्या वडिलांना इंदिरा गांधीने तुरुंगात टाकले हि भावना देवेंद्रांच्या मनात पक्की घर करू लागली. त्यांना इंदिरा गांधींबद्दल इतका रोष होता कि ज्या शाळेचे नाव इंदिरा होते त्या शाळेत शिक्षण घेण्यास सुद्धा त्यांनी नकार दिला.
सर्वांनी खूप समजावण्याचा प्रयत्न केला पण देवेंद्रांनी त्यांचा हट्ट सोडला नाही. अखेर त्यांच्या आईंनी इंदिरा कोन्वेंटमधून त्यांचे नाव काढून सरस्वती शाळेमध्ये प्रवेश निश्चित केला.
शालेय शिक्षण पूर्ण करून देवेंद्र धरमपेठेतील ज्युनिअर कॉलेजमध्ये आपल्या पुढील शिक्षणासाठी दाखल झाले. बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून १९९२ साली गव्हर्नमेंट लॉ कॉलेज नागपूर येथून आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे त्यांनी बिजनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले. नंतर बर्लिन येथून प्रॉडक्ट मॅनेजमेंट टेक्निक्स विषयात डिप्लोमा कोर्स पूर्ण केला. विविध क्षेत्रातील व विविध विषयांचे शिक्षण घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस ह्यांचे ध्येय मात्र राजकारण हेच होते.
आमदार ते मुख्यमंत्री
२ वेळा नागपूरचे महापौरपद भूषविणाऱ्या देवेंद्र फडणवीस ह्यांनी १९९९ साली पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला. नागपूरमधील आपल्या मतदारसंघाचे १९९९ पासून प्रतिनिधित्व करणाऱ्या देवेंद्र फडणवीस ह्यांनी २००४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते रणजित देशमुख ह्यांना पराभूत केले. आपल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असतांना फडणवीस ह्यांनी भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुराही यशस्वीपणे सांभाळली. २०१३ साली ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले.
आपल्या दमदार भाषणांच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन सत्ताधारी आघाडी सरकारला चांगलाच घाम फोडला होता. आघाडी सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करून त्याविरोधात सबंध राज्यात त्यांनी रान उठवले होते, ज्याचा फायदा भाजपाला लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये झाला.
२०१४ साली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून फडणवीसांच्या मागे अनेक विरोधक व पक्षांतर्गत विरोधक हात धुवून लागले होते. खरंतर देवेंद्र फडणवीस ह्यांचा जन्म अश्या जातीमध्ये झाला जिचे उपद्रवमूल्य महाराष्ट्राच्या राजकारणात फारसे नाही. विरोधकांनी अनेकवेळा फडणवीस ह्यांना त्यांच्या जातीवरून लक्ष्य केले. पण ना फडणवीसांनी कधी जातीपातीचे राजकारण केले ना त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या मतदारांनी त्यांची जात बघून कधी त्यांना मत दिले.
जातीपातीच्या राजकारणापेक्षा विकासाच्या राजकारणावर आपला विश्वास आहे हे फडणवीसांनी अनेकवेळा बोलून दाखवले आहे आणि हेच त्यांच्या कार्यातूनसुद्धा दिसून येते. आधी फडणवीसांना कच्चा खिलाडी म्हणणारे राजकीय विश्लेषक आता मात्र त्यांना “लंबी रेस का घोडा” म्हणत आहेत. जनतेचा आशीर्वाद आपल्यालाच मिळेल ह्याची खात्री त्यांना कदाचित असावी म्हणूनच “मी पुन्हा येईन नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी” अशी आरोळी त्यांनी विधानसभेतील आपल्या भाषणात ठोकली.