आजच्या आपल्या लेखात आपण अशा एका महान व्यक्तीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यामुळे भारताला कृषीप्रधान देश असं अभिमानाने म्हटलं जातं. हा नेता फक्त एका कामासाठी प्रसिध्द नव्हता, तर हा नेता एक बहूआयामी नेतृत्व करणारा होता. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीबरोबरच हा नेता देशाच्या सामाजिक स्वातंत्र्याच्या यज्ञात सुध्दा अग्रभागी असणारा होता, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हा माणूस महाराष्ट्राचा भुमीपुत्र व मराठी बाण्याचा होता. एवढं बहूआयामी व्यक्तित्व आणि नेतृत्व असणारा असा हा नेता होता तरी कोण ? तेच आपण या आपल्या आजच्या लेखात जाणून घेणार आहोत.
स्वातंत्र्यपुर्व काळात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काम केल्यानंतर भारताचे पहिले कृषीमंत्री झाले ते म्हणजे श्री. पंजाबराव देशमुख. कृषीक्षेत्राची सर्वांगीन भरभराट त्यांच्या काळात झाली. पंजाबराव तसे विदर्भातले. विदर्भातले एक मुत्सद्दी राजकारणी म्हणुन त्यांची ओळख. ग्रामीण भागात जन्म होऊन सुध्दा जागतिक दर्जाचे शिक्षण घेतलेले असे अत्यंत बुध्दीमान व्यक्तिमत्व.
पंजाबराव देशमुख यांचा जन्म 27 डीसेंबर 1898 रोजी विदर्भातील एका लहानशा गावी शेतकरी कुटुंबात झाला. शेतकरी कुटूबांतील जन्म, त्यामुळे पंजाबरावांना शेतीमधील खडानखडा माहीती होती. त्याचाच फायदा त्यांना त्यांच्या कृषीमंत्री पदाच्या कार्यकाळात झाला. त्यांचे मुळ आडनाव “कदम” असे होते परंतु गावातील देशमुखीमुळे त्यांना देशमुख या नावानेच प्रसिध्दी मिळाली.
त्यांचे प्राथमिक शिक्षण अमरावती मधील “पापल” या लहानशा गावी झाले. त्यानंतर त्यांचे उच्यमाध्यमिक शिक्षण अमरावती मध्ये झाले. त्यांना पदवी मिळण्याआधीच परदेशात शिकण्याची संधी मिळाली. ही संधी त्यांनी सार्थकी लावत केंब्रिजमधुन आपली एम.ए. ची पदवी पुर्ण केली. नंतर त्यांनी संस्कृत व वैदिक वाङ्मय या विषयामध्ये पीएचडी संपादन केली. त्यांनी भारतात परतल्यानंतर सक्रीय राजकारण व समाजकारणात पदार्पण केले.
त्यांनी श्री कृष्ण समाजाची स्थापना केली. ते सामाजिक विषमतेचे कडवे निंदक होते. त्यामुळे त्यांनी विदर्भामध्ये दलितांच्या मंदिर प्रवेशासाठी सत्याग्रह केला. मंदीर प्रवेशासाठी सत्याग्रह करणारे ते विदर्भातील पहिले नेते होते. दलितांसाठी त्यांनी विहिरी खुल्या केल्या.
हिंदू देवस्थान संपत्ती विधेयक
पंजाबरावांनी घटना समितीमध्ये असताना एका कायद्याची संकल्पना मांडली. त्या कायद्याप्रमाणे देशातील सर्व देवस्थानं केंद्राच्या व सरकारच्या अखत्यारीत घ्यावीत व देवस्थानातुन मिळणारा पैसा, दान म्हणून मिळालेली संपत्ती हि देशातील गरजू लोकांच्या हितासाठी वापरण्यात यावी. पंजाबरावांचा विचार आजच्या घडीला जरी सत्यात उतरावा अस वाटत असेल तरी आजच्या घडीला असा विचार करणे देखील पाप आहे की काय, अशी परिस्थिती देवस्थानांच्या बाबतीत निर्माण झाली आहे. तेंव्हाचा काळ तर अत्यंत कर्मठ होता. त्याकाळात सुध्दा हि संकल्पना मांडणं ही एक मोठी जोखीमच होती असं आपण म्हणु शकतो, पण ते वेड धाडस त्यांनी केलं देशातील जनतेच्या हितासाठी.
डॉ.पंजाबराव देशमुख व बाबासाहेब
डॉ.पंजाबराव देशमुख हे महात्मा जोतिबा फुलेंच्या चळवळीमधुन प्रेरित झाले होते, त्यामुळे सामाजिक विषमता मिटवणे हा सुध्दा त्यांचा उद्देश होता, आणि त्याकाळी दलित मुक्तीची मोहीम बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली देशभर गाजत होती. पंजाबरावांना बाबासाहेबांच्या व्यक्तीमत्वाने भुरळ घातली. नंतरच्या काळात डॉ. पंजाबराव देशमुख हे बाबासाहेबांच्या चळवळीचे खंदे प्रचारक बनले होते. बाबासाहेबांनी काढलेल्या “इंडियन लेबर पार्टी”चे ते विदर्भ सचिव होते.
कृषि विषयक कारकिर्द
पं. नेहरूंच्या मंत्री मंडळात ते कृषीमंत्री होते, त्यामुळे देशाचे पहिले कृषीमंत्री होण्याचा मान सुध्दा त्यांनाच मिळाला. आपल्या काळात त्यांनी शेतीला पुरक अशी भरपुर कामे केली, त्यामध्ये त्यांनी “किसान डिबिटी विधेयक” आणले. त्यांनी भारतात जपानी पद्धतीच्या भात रोपण तंत्रज्ञानाचे यशस्वी प्रयोग केले. आपल्या कार्यकाळात त्यांनी भारतात शेतकर्यांना उपयोगी अशा जगभरातील वस्तु तयार करणाऱ्या कंपन्यांना भारतात बोलवून “वर्ल्ड फार्मिंग एक्झिबिशन” भरवलं.
या प्रकल्पाचे उद्घाटक होते त्या काळचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयसेनहॉवर, त्याच बरोबर या सोहळ्याला जगभरातील मोठ्या असामी उपस्थित होत्या, यामध्ये निकीता क्रुश्चेव्ह, लेडी माऊंटबॅटन व जगभरातील इतर देशांचे प्रमुख अतिथी उपस्थित होते. डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतीय कृषीक्रांतीचे जनक असे देखील म्हटले जाते, त्यामुळे शेतकरी कुटुंबात वाढलेला हा मुलगा भविष्यात शेतकर्यांचे प्रश्न सोडवू लागला.
डॉ. पंजाबराव देशमुखांनी फक्त शेतकर्यांसाठीच काम केल असं नाही. त्यांनी समाजातील प्रत्येक घटकांसाठी काम केलं. त्यांनी गरीब विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी “शिवाजी एज्युकेशन सोसायटी” ची स्थापना केली. 1955 मध्ये त्यांनी भारतीय कृषक समाजाची स्थापना केली. त्याच बरोबर शेतकऱ्यांच्या व कष्टकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेऊन पुढील ध्येय धोरणे सुचित केली.
आरक्षणाची तरतुद आणि पंजाबराव देशमुख
संविधान निर्मिती प्रकिया चालु असतानाच शेतकर्यांचे नेते डॉ. पंजाबराव देशमुख एका कारणामुळे चिंतीत होते. एक दिवस ते तातडीने उठून मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घरी गेले. त्यांनी बाबासाहेबांसमोर आपलं गाऱ्हाणं मांडलं की महाराष्ट्रातील बहुसंख्य शेतकरी कुणबी समाज आहे व मागासलेला आहे. त्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी घटनेमध्ये काही तरतुदी कराव्यात अशी सुचना त्यांनी बाबासाहेबांना केली, पण बाबासाहेबांनी महाराष्ट्रातील कुणबी समाजाला अधीच घटनेमध्ये आरक्षणाची तरतुद करून ठेवली होती.
त्याच बरोबर त्यांनी त्याकाळातील कुपोषण निवारण्यासाठी, आपल्या कृषी मंत्री असण्याच्या काळात “लाखोंसाठी अन्न” हि मोहीम सुरू केली व देशाच्या शेती उत्पन्नात वाढ केली. पंजाबरावांनी शिक्षकांच्या हक्कासाठी सुध्दा शिक्षकांची संघटना सुरू केली, जी त्यांच्या हक्कसाठी लढू शकेल.
पंजाबरावांचा अंतरजातीय विवाह
पंजाबराव हे सत्यशोधकी व समतावादी विचाराचे नेते होते, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात जात या शब्दाला देखील थारा नव्हता. पण त्या काळचा समाज हा आजच्या पेक्षा कितीतरी पटीने कर्मठ व धर्मभोळा आणि कथाकथित अब्रुला चिकटून असलेला होता. त्याकाळी अस्पृश्यता व अघोरी कर्मकांड याचे स्तोम माजले असताना कुणी अंतरजातीय विवाह करणे त्या समाजाला पटणारे नव्हते.
पण पंजाबराव हे व्यक्तिमत्व काही और होतं. त्यांनी त्याकाळच्या सर्व रूढी परंपरांना तिलांजली दिली व स्वतः सोनार समाजातील एका मुलीशी लग्न करून त्याकाळच्या तरूण पिढीला समतेचा व जाती निर्मुलनाचा संदेश दिला. दूर्दैवाने आज सुध्दा भारतात अंतरजातीय विवाह केल्यामुळे अनेक कोवळ्या तरूण जोडप्यांचे गळे दाबले जातात. पण आजच्या समाजासाठी पंजाबरावांची विचार पध्दती ही खरचं विचार करायला लावणारी आहे.
तसा हा नेता वागायला व वावरायला अगदी साधा होता, पण आपल्या विचार पध्दतीने कुणाला ही प्रभावित करेल असा होता. त्यांच्या येण्याने भारताच्या कृषि क्षेत्राला सोन्याचे दिवस आले व भारताचा सामाजिक लढा सुध्दा एका सुवर्ण काळातुन गेला असंच म्हणावं लागेल. अशा या महान नेत्याचे निधन 10 एप्रिल 1965 मध्ये दिल्ली येथे झाले. शेतकर्याच्या काळ्यामातीला न्याय मिळवून देणारा नेता त्या दिवशी मातीमध्ये विरून गेला.