ब्रिटिश सरकारच्या कानाखाली सनसनीत चपराक लावणारी ही घटना होती. आपल्या क्रांतीकरकांनी त्या दिवशी केलेल्या धमाक्याने ब्रिटीशांच्या कानठळ्या बसल्या.
७३ वा स्वातंत्र्यदिवस आपण लवकरच साजरा करु. काय ए ना, सगळेच आपल्या व्हॉटस ॲप स्टेटस आणि फेसबुक स्टेटस वर तिरंगा ठेवतील. शुभेच्छा देतील. स्वातंत्र्य भारतात श्वास घेतोय ह्या बद्दल स्वातंत्र्य लढ्यातील शहीदांचे आभार मानतील, श्रध्दांजली वाहतील.
हा १५ ऑगस्ट सर्वांनाच ठाऊक राहील. पण, ९ ऑगस्टचं काय ? त्याचं महत्व किती जणांना माहीती आहे ? नाही असं अपराधी वाटुन घेउ नका. कारण १५० वर्षात ह्या लढयात अनेक घडामोडी झाल्या, हर एक घडामोडीचा हर एक दिवस तुम्हाला ह्या काळात लक्षात कसं राहणार ? पण ही घटना इतकी ही सामान्य नव्हती. ब्रिटिश सरकारच्या कानाखाली सनसनीत चपराक लावणारी ही घटना होती. जास्त मोठा आवाज आवडतो, त्यांना धमाका एकवायचीच गरज असते. तो धमाका आपल्या क्रांतीकारकांनी ह्या दिवशी केला आणि ब्रिटीशांना कानठळ्या बसल्या.
झालं असं होतं की ह्या घटनेआधी १९२२ साली गांधीजींच्या नेतृत्वात असहकार चळवळ जोमात चालु होती. ह्या चळवळीने देशभरात देशासाठी नागरीकांनी आपलं योगदान दिलं होतं. पण चौरीचौरा येथे आंदोलना दरम्यान जमावाने हिंसक होत एक पोलिस चौकी पेटवली आणि त्यात २२ पोलिस मृत्युमुखी पडले. गांधीजींना ह्या घटनेने अतीव दु:ख झाले, चळवळीला हिंसेचं गालबोट लागल्याची भावणा त्यांच्या मनात आली आणि त्यांनी चळवळ मागे घेतली.
ह्या निर्णयाने चळवळीत सहभागी झालेले तरुण निराश झाले. ह्या चळवळीने यश मिळणार असं दिसत असतांना ती मागे घेण त्यांना पटलं नाही. एकीकडे सशस्त्र क्रांतीवर विश्वास ठेवणारा एक गटही भारतात तयार होत होता. १८९७ ला चाफेकर बंधुंनी जिल्हाधिकारी वॉल्टर रॅन्ड आणि त्याचा सहाय्यक आयस्टर ह्यांची हत्या करुन त्या क्रांतीला सुरुवात केली होती. हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन १९२३ (एच आर ए)ची स्थापना शचिंद्रनाथ सन्याल ह्यांनी केली. सशस्त्र क्रांती करण्यासाठी ह्या संघटनेतील लोकांना धनाची आवश्यकता होती. त्यासाठी ते धनाड्य लोकांकडे दरोडे टाकत. पण ह्यातुन त्यांना पुरेसे धन मिळत नव्हते.
तरुणांमधल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी एका मोठ्या कटाची गरज होती आणि त्यासाठी तितक्याच पैशांची. मग सरकारी खजान्यावर दरोड्याच्या योजना बनवल्या गेल्या. त्यातली सर्वात मोठी योजना होती ती सरकारी खजाना घेऊन जाणारी आगगाडी काकोरीला थांबवुन लुटायची.
ह्या कटात रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहीरी, अशफाक उल्ला खां, रोशन सिंह, शचिंद्रनाथ सन्याल, मन्मनाथ गुप्त, मुकुंदीलाल जी, योगेशचंद्र चॅटर्जी, गोविंद चरणकर, राजकुमार सिंग, विष्णुशरण दुल्बिश, रामकृष्ण खत्री, सुरेशचंद्र भट्टाचार्य, रामदुलारे त्रिवेदी, भूपेंद्रनाथ सामील झाले. ९ ऑगस्ट, १९२५ ला काकोरी येथे सरकारी खजाना घेऊन जाणारी ट्रेन लुटली गेली. ह्यातुन ४६०१ रुपये लुटले गेले. पण दुर्दैवाने ह्या नंतर चिडलेल्या ब्रिटिश सरकारने ४० च्या वर लोकांना ताब्यात घेतलं. ह्यात सर्व क्रांतिकारी पकडले गेले.
अटक झाल्यानंतर जेलमध्ये सर्वांना भेटायला मोठे मोठे नेते येउ लागले. जवाहरलाल नेहरु, गणेश शंकर विद्यार्थी हे नेते क्रांतीकारकांना भेटले. खटला सुरु झाला. १० महीने ह्याची सुनावणी चालली. सर्वांनाच त्यांच्या कटातील सहभागाच्या प्रमाणात शिक्षा सुनाण्यात आल्या. रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहीरी, रोशन सिंह, अशफाक उल्ला खां, ह्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. शचिंद्रनाथ सन्याल ह्यांना काळ्यापाण्याची शिक्षा झाली, मन्मनाथ गुप्त यांना १४ वर्षाची शिक्षा झाली. योगेशचंद्र चटर्जी, मुकंदीलाल जी, गोविन्द चरणकर, राजकुमार सिंह, रामकृष्ण खत्री यांना १० वर्षांची शिक्षा झाली. विष्णुशरण दुब्लिश और सुरेशचंद्र भट्टाचार्य ह्यांना सात तर भूपेंद्रनाथ, रामदुलारे त्रिवेदी ह्यांना पाच वर्षांची शिक्षा झाली.
ह्या सुनावणी नंतर देशात बऱ्याच ठिकाणी आंदोलने झाली. पण ती दडपण्यात आली. १७ डिसेंबर १९२७ ला राजेंद्रनाथ लाहीरी यांना सर्वात आधी फाशी झाली. त्याआधी त्यांनी एक पत्र आपल्या मित्रांना लिहीले, त्यात ते लिहीतात की
“असं दिसतय की देशाच्या बळीदेवतेला आपल्या रक्ताची गरज आहे. मृत्यू काय आहे?, जिवणाची दुसरी अवस्था, बाकी काही नाही. आपले बलिदान व्यर्थ जाणार नाही हा विश्वास आहे मला, सर्वांना शेवटचा नमस्कार.”
दोन दिवसांनी १९ डिसेंबर १९२७ रोजी रामप्रसाद बिस्मिल यांना फाशी देण्यात आली. “ब्रिटिश साम्राज्याचा विनाश ही माझी इच्छा आहे” हे त्यांचे शेवटचे शब्द होते. रोशन सिंह, अशफाक उल्ला खां यांनाही फाशी देण्यात आली. अशफाक उल्ला खां ह्यांच पार्थिव शाहजहांपुर येथे घेउन जात असतांना लखनऊला गाडी थांबवण्यात आली. सुटात बुटात आलेल्या एका साहेबांनी अशफाक ह्यांच पार्थिव बघण्याची विनंती केली. त्यांना ते पाहु देण्यात आले. हे होते चंद्रशेखर आझाद.
वेश बदलुन आलेले आझाद कोणालाच नाही ओळखता आले. इंग्रज त्यांच्या मागावर होते. त्यांचा ठाव ठिकाणा मिळण्यासाठी ब्रिटिश आधिकाऱ्यांनी सर्व कैद्यांचा खुप छ्ळ केला, पण शेवटच्या श्वासापर्यंत एकानेही ब्रिटीशांना कसलाच पत्ता लागु दिला नाही. विशेष म्हणजे हा १० महीन्यांचा खटला आझादांनी कोर्टात जाउन पाहीला. पण कोणी पाहिलंच नाही. म्हणतात ना “दुश्मन हर जगह ढुंढेगा, पर अपने घर में नहीं”.
ते शेवटपर्यंत ब्रिटिशांना जिवंत सापडले नाहीत, ना ब्रिटीशांच्या गोळीने त्यांच्या शरीराला कधी स्पर्श केला. त्यांनी स्वतःच्याच गोळीने शहीद होणं पसंत केलं. ह्या कटात भारतीय एक्य आपल्याला हादरवु शकतं ह्याची प्रचिती ब्रिटीशांना आली. ह्या बलिदानाने देशभर अनेक क्रांतीकारकांनी स्वतःला देशासाठी वाहुन घेण्याची शप्पत घेतली. जालियनवाला बाग आणि ही घटना ह्याचा मोठा परीणाम क्रांतिकारकांवर झाला. भगतसिंग, सुखदेव, राजगुरू ह्यांनी ह्यातुन प्रेरणा घेउन ह्या बलिदान दिलेल्यांचं स्वप्न आपलं जिवनध्येय बनवलं. बलिदान व्यर्थ कधीच गेले नाही, जाणारही नाही.