“टिपू सुलतान यांना पराभूत करण्यासाठी इंग्रजांकडे पुरेशी ताकद होती परंतु त्यांच्या फौजेला एकच भीती होती आणि ती म्हणजे टिपू सुलतान यांच्या सेनेत असलेल्या रॉकेटची”
आपल्या भारताचा इतिहास हा अनेक शूरवीरांच्या कथांनी समृद्ध आहे. अनेक लढवय्ये या मातीत होऊन गेले आणि इतिहासात अजरामर झाले. युद्धात, रणांगणात अनेक युद्धे, राजे लढतात, जखमी होतात, अनेक मारतात परंतु फार कमी अशी माणसं असतात ज्यांचं मरण पिढ्यानपिढया काळाच्या पडद्यामागून डोकावतं आणि त्या मृत्युमुखी पडलेल्या वीरांची आठवण करून देतं. आज अशाच एका शौर्यापुरुषाला स्मरण्याचा दिवस आहे. आज आपण पाहणार आहोत टिपू सुलतान यांच्या मृत्यूची कहाणी आणि पाहूया त्यांच्या आयुष्यातील रंजक छटा.
४ मे १७९९ रोजी टिपू सुलतान यांचा मृत्यू झाला. पू सुलतान यांचा मृत्यू होऊन २२० वर्षे उलटली तरीही त्यांचे शौर्य ताजे आहे, त्यांच्या याच शौर्यकहाणीला आज त्यांच्या २२० व्या पुण्यतिथीनिमित्त आपण उजाळा देऊया.
कोण होते टिपू सुलतान
म्हैसूरचे सुलतान हैदर अली व त्यांची पत्नी फातिमा फखर-ऊन-निसा यांच्या पोटी जन्मलेले टिपू सुलतान यांचे पूर्ण नाव बादशाह नासीबुद्दुलः सुलतान मीर फतेह अली बहादूर साहब असे होते, शक्यतो त्यांना टिपू सुलतान याच नावानी मुख्यत्वे ओळखले जाते. टिपू सुलतान हे भारताचे पहिले स्वतंत्र सेनानी होते असे देखील म्हटले जाते. आपल्या वडिलांच्या पश्चात म्हैसूरचे सुलतान झालेले टिपू हे टायगर ऑफ म्हैसूर म्हणून सुद्धा ओळखले जाऊ लागले. टिपू सुलतान एक उत्तम शासक होते. त्यांना धार्मिक ज्ञान देखील उत्तम होते.
आपल्या अनेक योजनांनी त्यांनी म्हैसूर राज्याला तेव्हाच्या काळातील एक आर्थिक महासत्ता अशी ओळख मिळवून दिली होती. टिपू सुलतानांच्या राजकाळात नवीन नाणी, सैन्यामध्ये रॉकेट हे शस्त्र, जमीन महसूल बाबत काही कायदे, म्हैसूर सिल्क इंडस्ट्री अशी अनेक कामे जनतेने अनुभवली आणि राजा म्हणून टिपू सुलतान लोकांमध्ये लोकप्रिय झाले. जगात नावाजला जाणारा नेपोलियन बोनापार्ट देखील टिपू सुलतान यांच्याशी संधी करण्याची वाट पाहत होता. त्याने हि संधी करून त्यांनी लढायांमध्ये एकमेकांचे साहाय्य करण्याचे नक्की कबुल केले.
सध्याच्या बंगलोर शहरात देवनहल्ली येथे २० नोव्हेंबर १७५० रोजी टिपू सुलतान यांचा जन्म झाला. लहानपणापासूनच वडिलांच्या मार्गदर्शनाखाली टिपू सुलतानांनी लष्करी व राजकीय शिक्षण उत्तमरीत्या आत्मसात केले होते. थोड्या कळत्या वयात आल्यावर हैदर अलींनी अनेक लष्करी व राजकीय जबाबदाऱ्या टिपू सुलतानावर सोपविल्या. टिपू सुलतानांनी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आणि स्वतःला सिद्ध केले.
टिपू सुलतान यांची कारकीर्द
इंग्रज हे टिपू सुलतान यांचे सर्वात मोठे शत्रू होते, यासोबतच मराठे व निझाम देखील टिपू सुलतान यांचे शत्रू होते. अनेक छोट्या मोठ्या चकमकी, लढाया व युद्धातून एकमेकांना हे शत्रू सामोरे गेले होते. टिपू सुलतानांच्या वडिलांच्या दरबारात अनेक फ्रेंच अधिकारी होते आणि या अधिकाऱ्यांकडून टिपू सुलतान यांना लष्करी मोहिमांचे व रणनीतीचे शिक्षण मिळत होते व त्यांच्या हाताखाली टिपू सुलतान अतिशय उमेदीने तयार झाले होते.
सुमारे १७६६ साली टिपू सुलतान यांनी आपल्या वडिलांना पहिल्या म्हैसूरच्या लढाईत ब्रिटिशांविरुद्ध साथ दिली होती. इतकेच नव्हे तर इंग्रंजांसोबत व मराठ्यांसोबत अनेक लढायांत टिपू यांनी वडिलांना साथ दिली होती. मराठ्यांसोबत देखील अशाच एका पेचात टिपू अडकले होते. पेशवा माधवराव (पहिले) यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी तब्बल दोन वेळा टिपू सुलतान यांचे वडील हैदर अली यांना पराभूत केले होते. मराठ्यांचे अधिपत्य हैदर अली यांनी मान्य केले पाहिजे यासाठी मराठ्यांनी सरळ म्हैसूर मधील श्रीरंगपट्टणम मध्ये शिरकाव केला. शेवटी हैदर अली यांनी मराठ्यांचे अधिपत्य मान्य केले आणि माधवरावांनी त्यांना म्हैसूरचे नवाब अशी पदवी दिली.
मराठ्यांचे हे अधिपत्य टिपू सुलतान यांना मात्र मान्य नव्हते म्हणून त्यांनी अनेकवेळा मराठ्यांचे काही दक्षिणेतील किल्ले जिंकण्याचे प्रयत्न केले आणि मराठ्यांना हैदर अली यांनी शब्द दिल्याप्रमाणे देण्यात येणारी काही ठराविक रक्कम देखील टिपू सुलतान यांनी थांबविली. यामुळे टिपू सुलतान व मराठे यांच्या अनेक चकमकी घडल्या.
टिपू सुलतान यांच्या मृत्यूची कहाणी
टिपू सुलतान यांचा सर्वात मोठा शत्रू म्हणजे इंग्रजच होते. टिपू सुलतान हे नेपोलियन सोबत इंग्रजांना धडा शिकविण्यासाठी अनेक सल्ला मसलती करत असत आणि हीच गोष्ट इंग्रजांना असह्य होत होती. टिपू सुलतान आपल्याविरुद्ध काही पाऊले उचलेल त्याआधीच आपण पाऊले उचलावीत असे इंग्रजांनी ठरविले. शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या नियमानुसार इंग्रजांनी निझाम व मराठ्यांना टिपू सुलतान यांच्याविरुद्ध आपल्या बाजूने एकत्र केले.
आता इंग्रज, मराठे आणि निझाम अशी सर्व मिळून एकूण ५०,००० ची फौज घेऊन हे एकत्रित सैन्य श्रीरंगपट्टणमला वेढा देऊन लढाईला सज्ज झाले. या सैन्यात इंग्रजांचे सैन्य तसे कमीच होते म्हणजे साधारण ४,००० सैन्य फक्त इंग्रजांचे होते आणि बाकी सगळे सैन्य मराठा व निझाम यांच्या एकत्रित फौजेचे होते. हे सगळे सैन्य मिळून हि एकत्रित सेना साधारण ५०,००० इतक्या मोठ्या संख्येने होते. याउलट टिपू सुलतान यांचे सैन्य जवळपास ३०,००० इतकेच होते.
ब्रिटिशांच्या या सैन्याचे नेतृत्व आर्थर वेल्लेसेली, जनरल जॉर्ज हॅरिस, डेविड पेअर अशी मातब्बर मंडळी करीत होती. या सैन्याची एकत्रित शक्ती टिपू सुलतान यांना पराभूत करण्यासाठी पुरेशी होती परंतु या सगळ्या फौजेला एकच भीती होती आणि ती म्हणजे टिपू सुलतान यांच्या सेनेत असलेले रॉकेट. असे म्हटले जाते कि टिपू सुलतानच्या सैन्याची हि रॉकेट्स साधारण २ किलोमीटर पर्यंत असलेले लक्ष्य सहज भेदू शकेल इतकी सक्षम होती.
ब्रिटिशांच्या फौजांच्या अनेक तुकड्या होत्या, यातील एका तुकडीने सिदासीर येथील लढाईत (मार्च १७९९) टिपूच्या सैन्याचा पराभव करून श्रीरंगपट्टणम गाठले, पुढे मद्रासचे सैन्य पूर्वेकडून श्रीरंगपट्टणम येथे आगेकूच करीत होते. साधारण २७ मार्च १७९९ मध्ये मल्लावेली येथील लढाई व ७/८ एप्रिलच्या आसपास सुल्तानापेठच्या लढाईत ब्रिटिश फौजांनी टिपू सुलतानच्या सैन्याचा पराभव करून श्रीरंगपट्टणम येथे पोहोचले. असे करता करता ब्रिटिशांचे संपूर्ण सैन्य श्रीरंगपट्टणम येथे पोहोचले.
ब्रिटिशांनी मग टिपू सुलतान यांच्याशी पत्रव्यवहार सुरु केला आणि युद्धाची सुनावणी केली. टिपू सुलतान यांनी थोडा विचार करून लढाईसाठी थोडा अवधी मागितला. काही इतिहासकारांच्या मते टिपू सुलतान यांचा प्रधान मीर सादक हा फितूर झाला होता आणि टिपू सुलतान यांच्या रणनीतीची खडानखडा माहिती त्याने इंग्रजांपर्यंत पोहोचविली. त्यामुळे इंग्रजांनी टिपू व त्यांच्या सैन्याला तयारीसाठी वेळही दिला नाही आणि युद्धाला सुरुवात केली.
इंग्रजांचे सैन्य किल्ल्याची भिंत तोडून झुंडीने आत शिरले आणि एकाएकी टिपूच्या सैन्यावर आक्रमण केले. अशा आणीबाणीच्या वेळी टिपू सुलतान यांनी चोर भुयारी मार्गाने पळून आपले प्राण वाचवावे असा सल्ला मंत्रिमंडळाकडून टिपू यांना देण्यात आला, परंतु शेळ्या-मेंढ्या बनून हजार दिवस जगण्यापेक्षा वाघ बनून एक दिवस जगलेले उत्तम आहे असे म्हणून टिपू सुलतान लढाईला सज्ज झाले.
शेवटी टिपू सुलतान स्वतः लढाईत उतरले आणि पूर्ण शक्तीने शत्रूवर तुटून पडले. बराच वेळ हे युद्ध चालू होते. टिपू सुलतान यांच्या संपूर्ण अंगावर अनेक वार व जखमा झाल्या होत्या तरीही कसलीही पर्वा न करता एका खऱ्या वाघासारखे टिपू सुलतान शत्रूची दाणादाण एकटेच उडवीत होते. इतक्या मोठ्या ब्रिटिश वादळासमोर टिपू सुलतान तरी किती वेळ तग धरून उभे राहावेत. सरतेशेवटी ४ मे १७९९ रोजी टिपू सुलतान इंग्रजांशी लढता लढता रणांगणात धारातीर्थी पडले.
टिपू सुलतान यांच्या मृत्यू नंतर इंग्रजांनी त्यांचा सारा खजिना लुटून नेला व सोबतच यांचे रॉकेट व अनेक तोफादेखील ते सोबत घेऊन गेले. टिपू सुलतान यांनी आपल्या आई वडिलांची कब्र श्रीरंगपट्टणम येथे एक घुमट बनवून जतन केली होती. टिपू सुलतान यांच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनादेखील आपल्या त्यांच्या वडिलांच्या थडग्याजवळ अंत्यसंस्कार प्राप्त झाले. टिपू सुलतान तर गेले परंतु शेवटच्या श्वासापर्यंत कसे शत्रूशी लढून शत्रूची दाणादाण उडविता येते याचा आदर्श जगापुढे ठेऊन गेले. असे म्हणतात कि टिपू सुलतान मेल्यानंतरही त्यांच्या मुठीतील तलवार सहजासहजी काढता येत नव्हती इतक्या आवेशात ते लढत देत होते. अशा योद्ध्याला एक सलाम तर बनतोच.
Tipu ha Islamic aatank wadi hota…. Tyacha baddal aadar asel tar sunnat karun ghya.