आजचा विषय प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणारा आहे, कारण हा विषय जोडला गेलाय भारताच्या फाळणीविषयी. फाळणी म्हटलं की प्रत्येक जुन्या जाणत्या भारतीयाच्या अंगावर काटा उभा राहतो. फाळणीचा काळ हा भारतासाठी व पाकिस्तानसाठी एक भयानक स्वप्न होतं, जे स्वप्न परत कधीच पडू नये यासाठी दोन्ही देशांनी एक पाऊल उचललं. काय होत ते पाऊल ? कोणी उचललं ? त्याचा काही परिणाम झाला का दोन्ही देशांवर ? तेच आपण आजच्या या लेखात जाणून घेणार आहोत.
काळ होता 1947 चा, ब्रिटिश राजवटीतील भारताचा शेवटचा गव्हर्नर माऊंटबॅटन याने भारत सोडण्याचा व भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय घेतला. खरंतर हा निर्णय होता इंग्लंडच्या संसंदेचा आणि इंग्लंडच्या राणीचा, कारण दूसर्या महायुध्दाच्या आगीत पुर्ण जग होरपळून निघालं होतं. हा विनाश “न भुतो न भविष्यती” असा होता. महायुध्द संपलं, त्यात युरोपिय संघाचा विजय झाला, पण इंग्लडची दशा, जिंकूनसुध्दा पराभूताप्रमाणे झाली होती, कारण या महायुध्दामध्ये इंग्लंडची एक पिढी नेस्तनाबूत झाली होती आणि उरल्या होत्या फक्त महिला, मुले व वृध्द. त्यांच्या पालनपोषनासाठी इंग्लडकडे पुरेशी संपत्ती नव्हती व इंग्लंडच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर ताण पडत होता.
त्यामुळे स्वतःच्या राष्ट्राला सांभाळण्यासाठी वसाहत राष्ट्रांवरील खर्च थांबवावा व त्यांना स्वातंत्र्य द्यावे असा निर्णय इंग्लडमध्ये संमत झाला. अर्थात, यामागे भारतात स्वातंत्र्य सैनिकांचे वाढते उठाव व त्यातुन निर्माण झालेला दबाव हे सुध्दा एक मोठे कारण होते. पण सुधरतील ते इंग्रज कसले, जाता जाता त्यांनी भारताच्या ऐक्यात मिठाचा खडा टाकलाच. जिनांना फुस लावून पाकिस्तान हे राष्ट्र भारतापासुन तोडून स्वतंत्र करण्यात आले. पण याचा मोठा प्रभाव भारतीय समाजावर पडला. मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर होऊ लागले.
पुर्व बंगाल हा भाग पाकिस्तानकडे गेला व तेथील बहुसंख्य मुस्लिम लोकांनी अल्पसंख्यक हिंदू व शिख यांना स्थलांतरासाठी प्रवृत्त केले. पुर्व बंगाल, तसेच भारताच्या इतर भागात हिंदू – मुस्लिम दंग्याची सुरूवात झाली. पाहता पाहता हा वणवा भारतभर पसरला. पाकिस्तानातील बहुसंख्य समाज हा अल्पसंख्यांक समाजाला दाबण्याचा प्रयत्न करत होता, तर भारतातील काही अतिरेकी संघटना जातीय दंग्यांना फुस लावत होत्या. भारताला पडलेलं हे भयानक स्वप्नच होतं जणू ! पाकिस्तानात जाणाऱ्या गाड्या या मृत्युवाहिनी बनल्या होत्या. सर्वत्र असंतोष व अविश्वासाचे वातावरण पसरले.
कधीकाळी एका अंगणात खेळणारे मित्र एकमेकांच्या जीवावर उठले. कुणाचीच गय केली गेली नाही. मुले, स्त्रीया, तरूण हे सर्व, दंगलखोरांच्या तलवारीच्या पात्याखाली येत होते. या परिस्थितीमुळे दोन्ही देशातील राजकीय मुत्सद्दी अस्वस्थ होते. दोन्ही देशातील सामाजिक परिस्थिती गढूळ झाली होती. यावर उपाय म्हणुन त्याकाळचे भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व पाकिस्तानी पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या पुढाकाराने 8 एप्रिल 1950 ला दिल्ली येथे एक करार झाला. या लियाकत “नेहरू – लियाकत करार” म्हणुन प्रसिध्दी मिळाली.
काय होता करार ?
या करारानुसार दोन्ही देशांनी आपापल्या सरहद्दीतील अल्पसंख्यक लोकांचे हक्क व मूल्य यांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. या करारा नुसार दोन्ही देशांनी आपल्या देशातील अल्पसंख्यकांचे स्वातंत्र्य, समानता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व मानवी मूल्य यांचे संरक्षण करण्याची ग्वाही दिली. अल्पसंख्यकांसाठी व त्यांचे न्याय, हक्क राखण्यासाठी दोन्ही देशांनी अल्पसंख्यक आयोगाची स्थापना करावी. त्याप्रमाणे दोन्ही देशांनी आयोगाची स्थापना केली. याच करारानुसार दोन्ही देशात परत युध्दजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करणे व या कराराचे उल्लंघन जर होत असेल तर त्या राष्ट्राने विलंब न करता त्यावर कारवाई व उपाय योजना करणे आणि या कराराचे काटेकोरपणे पालन करण्याचे आश्वासन दोन्ही देशांकडून देण्यात आले.
कराराचा परिणाम
या कराराचा परिणाम म्हणुन दोन्ही देशात धुमसणारी अशांती हळूहळू कमी होत गेली, पण दोन्ही देशातील संबंध हे कटूतेकडे झुकत गेले. फाळणी हा दोन्ही देशातील लोकांच्या मनावर बसलेला एक घाव होता, त्यामुळे ह्या घटना विसरणे जनतेसाठी अशक्य होतं. या करारामुळे दोन्ही देशात अल्पसंख्यक आयोग स्थापन होऊन अल्पसंख्यकांना संरक्षण मिळाले. या आयोगामार्फत अल्पसंख्यकांच्या हिताचे अनेक निर्णय भारताने भविष्यात घेतले.
या करारामुळे दोन समाजांमध्ये वातावरण सामान्य होण्यास मदत झाली, पण युद्धजन्य परिस्थिती तयार होऊ नये ह्यासाठी प्रयत्न करण्याची पाकिस्तानची घोषणा मात्र वाऱ्यावर विरून गेली. यानंतर भारत व पाकिस्तान यांच्यात तीन युध्द झाली आणि अजूनही युध्दजन्य परिस्थिती कायम आहे. या कराराला भारताचे तत्कालीन केंद्रीय मंत्री श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा विरोध होता, पण हा करार थोड्या काळासाठी का होईना पण दोन्ही देशांना शांततेकडे नेणारा होता असचं आपण म्हणु शकतो.