“हिंदुस्तान जोपर्यंत जातीय बंधनात अडकलेला आहे तोपर्यंत हा देश स्वराज्यातून मिळणारे फायदे उचलू शकणार नाही”, असे शाहू महाराजांचे म्हणणे होते.
छत्रपती शाहू महाराजांनी अस्पृश्यता निवारणासाठी आपले अवघे आयुष्य खर्ची घातले. या कार्यासाठी त्यांनी कुठलीही तमा बाळगली नाही. त्यांनी आवश्यक वाटते तिथे कायद्याचा आधार घेत अस्पृश्यता निवारण्यासाठी कार्य केले आणि जिथे कायद्याचा आधार घेता येत नव्हतं तिथेही शाहू महाराजांनी नेटाने अस्पृश्यता निवारणाचे काम चालू ठेवले. त्यांनी त्यांचे हे कार्य त्यांच्या संस्थांन पुरतेच मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्रातील, प्रत्येक समाजामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्य पोहोचावे यासाठी प्रयत्न केलेले आहेत.
शाहू महाराजांनी फक्त अस्पृश्यता निर्मूलनाचे काम केले नाही तर अस्पृश्यांना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या भविष्याची चिंता करत त्यांना शिक्षणाचे महत्त्व ही समजावून सांगितले. त्यांच्यामध्ये फक्त प्रबोधन करून शाहू महाराज थांबले नाहीत तर त्यांनी कोल्हापूर संस्थान मध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले होते. प्रत्येक विद्यार्थ्याला समान न्याय आणि संधी देण्याचं काम सर्वात पहिल्यांदा शाहू महाराजांनी महाराष्ट्र मध्ये आरंभिले होते.
शाहू महाराजांचा असा आग्रह होता की उन्नतीचे सर्व मार्ग आणि पर्याय सर्व समाजासाठी खुले असायला हवेत. शाहू महाराजांनी मागास वर्गाच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न करण्यास सुरुवात केली होती आणि याचं कारण म्हणजे उच्चवर्णीय समाज या मागासलेल्या समाजाला कधीच उन्नतीसाठी पर्याय उपलब्ध करून देत नसे. 1894 मध्ये शाहू महाराज कोल्हापूरच्या गादीवर बसले त्यावेळी बहुजन समाजाची स्थिती सर्वच बाबतीत मागास होती.
शाहू महाराजांनी घेतलेल्या सक्तीच्या शिक्षणाच्या निर्णयालाही तत्कालीन पांढरपेशा वर्गाने तार्किक युक्तिवादाच्या नावाने विरोध दर्शविला होता. या पांढरपेशा वर्गाचे म्हणणे असे होते की सर्व खर्च हा उच्च शिक्षणावरती व्हायला हवा, शाहू महाराजांनी अस्पृश्य समाजात समता आणण्याच्या दृष्टीने कोल्हापूर संस्थान मध्ये सरकारी नोकरीत बहुजन समाजाला 50 टक्के जागा आरक्षित केल्या होत्या. महाराजांच्या या निर्णयाने सुद्धा तत्कालीन उच्चवर्णीय समाज पुरता हादरून गेला होता.
“हिंदुस्तान जोपर्यंत जातीय बंधनात अडकलेला आहे तोपर्यंत हा देश स्वराज्यातून मिळणारे फायदे उचलू शकणार नाही”, असे महाराजांचे मत होते. बहुजन समाज जर मागास अवस्थेत असतानाच स्वराज्य मिळाले तर फक्त तथाकथित उच्चवर्णीयांना या स्वराज्याचा लाभ मिळेल असा त्यामागील विचार असावा. शाहू महाराजांची मागास समाजासाठी असणारी ही तळमळ कुठल्याही द्वेषातून आली नव्हती, तर मागास समाजावरती असणाऱ्या प्रेमामधून ही तळमळ आली होती.
समाजातील केवळ पाच टक्के लोक सर्व प्रकारचे फायदे घेतात हे ते पाहत आले होते. महाराजांच्या दृष्टीने ही विषमता दूर करणे अत्यंत गरजेचे होते. उच्चवर्णीयांच्या वर्चस्वाविरुद्ध प्रबोधन करण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांच्यानंतर जर कोणी केले असेल तर ते फक्त छत्रपती शाहू महाराजांनी केलेले आहे. त्यांना जाती व्यवस्था मुळातच मान्य नव्हती, माणसाला माणसाचे हक्क मिळावेत यासाठी त्यांनी नेहमी संघर्ष केला आणि आपल्या कृतीतून आदर्श घालून दिला.
जातीअंतासाठी महाराजांनी अनेक पावले उचलली. 1913 मध्ये सत्यशोधक समाजाच्या अंतर्गत पुरोहित वेधशाळा सुरू करण्यात आली. महाराजांनी सामाजिक भान राखत या वेधशाळेत अनुदान प्राप्त करून दिले. यासोबतच 1918 मध्ये राजश्री शाहू महाराजांनी अंतरजातीय विवाह कायदा मंजूर केला. महाराजांनी सामाजिक विषमता संपवण्यासाठी प्रत्येक समाजातील व्यक्तींना प्रबोधन करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर प्रबोधित समाज बांधवांच्या मदतीने त्यांनी विविध शैक्षणिक सुविधा विद्यार्थ्यांना देण्यास सुरुवात केली.
कोल्हापूर मध्ये अनेक विद्यार्थी वस्तीगृह बांधण्यात आली, या वस्तीगृहांना अनुदान मान्य करण्याचे काम महाराजांनी केले. म्हणूनच आजही कोल्हापूरला “वस्तीगृहांची माता” असे म्हटले जाते. त्यांच्या या प्रयत्नांना काही काळाने फळ आले. त्यांच्या कारकीर्दीच्या अखेरीस संस्थानात शिक्षण विषयक अनेक बदल बघण्यात आले. बहुजन तरुण कितीतरी पटीने शिक्षण घेताना दिसून येत होता.
बहुजन समाजाने साक्षर होणे गरजेचे आहे हे महाराज ओळखून होते. कारण, बहुजन समाजाच्या शिक्षणावर देशाची प्रगती अवलंबून आहे याची जाणीव शाहू महाराजांना झाली होती. महाराजांनी उद्योगात मागे असलेल्या महाराष्ट्रालाही उद्योगाच्या बाबतीत राजाश्रय देऊ केला. त्यांनी 1906 मध्ये सुरू झालेल्या “श्री शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विव्हिंग मिल” या प्रकल्पाला जागा दिली. भांडवलाचीही मदत केली. उद्योगधंद्यांची वाढ व्हावी यासाठी महाराजांनी “शाहूपुरी” ही नवीन नगरी वसवली आणि तिथे सर्व प्रकारच्या सोयीसुविधा व्यापाऱ्यांना देऊ केल्या. महाराजांच्या या प्रयत्नामुळे कोल्हापूरला व्यापारी जगात पत प्राप्त होण्यास मदत झाली.
महाराज त्यांचे विचार फक्त बोलून दाखवत नसत तर त्यांनी त्यांचे विचार अमलात आणून दाखवले. महाराजांनी असा अध्यादेश काढला की सरकारी इमारती मध्ये अस्पृश्यांवर कोणीही अन्याय करणार नाही, अस्पृश्यांना सरकारी इमारतींमध्ये कुठलीही वेगळी वागणूक देण्यात येणार नाही आणि जर असे कुठे आढळून आले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. अस्पृश्यता निर्मूलनासाठी महाराजांनी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे ठरले. महाराजांनी शाळेमधील अस्पृश्यता निवारणासाठीही विशेष प्रयत्न केले. त्यांनी अनेक अस्पृश्यांना सन्मानाच्या अनेक संधी उपलब्ध करून दिल्या, त्यांना उन्नतीचे अनेक मार्ग उघडे करून दिले. अस्पृश्यांना आणि मागासलेल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये राजर्षी शाहू महाराज यांचा मोलाचा वाटा आहे.