१०६ लोक हुतात्मा झाल्यानंतर लोक सरकारचा वचपा काढण्यासाठी फक्त संधीच्या शोधात होते आणि हि संधी १९५७ च्या सार्वजनिक निवडणुच्या रूपाने मिळाली.
संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी माणसानं अक्षरशः रान उठवले होते. महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी अनेक आंदोलने चालू होती, सरकारने यावर उपाय म्हणून नुसती कमिशन काढून लोकांना शांत करण्याचा पर्याय काढला. यामध्ये दार कमिशन १९४८, अकोला करार, जे व्ही पी समिती १९४८, नागपूर करार १९५३, आणि राज्य पुर्रचना आयोग म्हणजेच फजल अली कमिशन यांच्या समावेश होता.
आता एवढा खटाटोप करून, संयुक्त महाराष्ट्राची गरज पटवून देऊन सुद्धा तत्कालीन काँग्रेस सरकारने मराठी माणसाच्या गळ्यात त्रिराज्याचा प्रस्ताव घातला, काय होता हा त्रिराज्याचा प्रस्ताव ?
१. संपूर्ण गुजराती भाषिकांचे एक राज्य
२. मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्य
३. मुंबई शहर व उपनगरे यांचे १६० चौकिमी विस्ताराचे स्वतंत्र राज्य
काँग्रेस वर्किंग कमिटीने पास केलेला हा ठराव महाराष्ट्राच्या जनतेने साफ नाकारला आणि आता प्रत्यक्ष लढ्याला सुरवात केली. या ठरावाच्या विरोधात मराठी लोकांनी १४ नोव्हेंबरला एका कृती समितीची स्थापना केली आणि वातावरण निर्मिती सुरु केली. कॉम्रेड डांगे यांनी कामगार मैदानावर ५० हजार लोकांच्या उपस्तित सभा घेतली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा हा लढा अधिक प्रखर करण्यासाठी २१ नोव्हेंबर १९५५ ला एक दिवसाच्या लाक्षणिक संपाची घोषणा केली.
ठरल्याप्रमाणे दि २१ नोव्हेंबर १९५५ ला लोक एक दिवसाच्या लाक्षणिक संपासाठी चहू बाजूनी ओव्हल मैदानाच्या दिशेने कूच करू लागले. काँग्रेस सरकारने जमावबंदीचा आदेश देऊन अतीशय कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. तरीही तब्बल पाच लाख लोक मैदानावर जमले आणि सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली जमाव बंदीचा आदेश मोडला. झालेल्या गोंधळात पोलिसांनी गोळीबार केला आणि १५ आंदोलक हुतात्मा झाले तर ३०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. यामुळे आंदोलन अधिकच प्रखार होऊन राज्यभर पसरले.
यानंतर परिस्थिती सावरण्याचा पर्यटन म्हणून पंतप्रधान नेहरूंनी राज्यपुनर्रचनेसंबंधी नवीन निर्णय घोषित केला पण यात सुद्धा मुंबईला केंद्र शासित करू मराठी लोकांना पुन्हा ठेंगा देण्याचा प्रयत्न झाला यामुळे महाराष्ट्र अक्षरशः पेटून उठला पण काँग्रेस सरकारच्या कठोर भूमिकेमुळे तब्बल ९१ लोक शाहिद झाले. लालाजी पेंडसे यांनी याचे वर्णन “नरमेधयज्ञ” करून सरकारवर वार केला.
राज्यभर दुःख आणि असंतोष धुमसत होता. सर्वानी एकमताने संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करून याचा वचपा काढण्याची गाठ मनाशी बांधली. लोक हा वचपा काढण्यासाठी फक्त संधीच्या शोधात होते आणि हि संधी १९५७ च्या सार्वजनिक निवडणुच्या रूपाने मिळाली.
१९५७ ची सार्वजनिक निवडणूक आणि मराठी माणसाचा दणका
१९५७ साली लोकसभा, विधानसभा आणि मुंबई महानगरपालिका निवडणूक झाल्या आणि वचपा काढण्याची संधी ओळखून मराठी लोकांनी संयुक्त महाराष्ट्र समितीला भरभरून मते दिली. समितीला या निवडणुकीत मोठे यश मिळाले तर काँग्रेसला मराठी माणसाचा दणका पहिल्यांदाच पाहायला मिळला. विशेषतः प. महाराष्ट्राने काँग्रेसला धप्पा केला आणि यात यशवंतराव अल्पमतात निवडून आले. काँग्रेसने राज्यातील सत्ता टिकवली पण मिळालेला धक्का मात्र त्यांनी ओळखला आणि त्यांच्या लक्षात आले कि मराठी लोक संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहेत.
शिव छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण आणि प्रचंड मोठा मोर्चा
१९५७ ची सार्वजनिक निवडणूकमध्ये मिळालेल्या मराठी माणसाचा दणक्यामधून यशवंतराव चव्हाण यांनी धडा घेऊन महाराष्ट्रातील परिस्तिथी आणि लोकभावना पंतप्रधान नेहरूंच्या निदर्शनास यावी या हेतूने शिव छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते ठेवले. याचा फायदा घेऊन संयुक्त समितीतीने पंतप्रधान नेहरूंसमोर जोरदार निदर्शने केली, शिव छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण होण्याच्या ठिकाणी म्हणजेच प्रतापगडावर प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला. प्रथम १९५७ च्या निवडणुकीतील निकाल आणि आता हि तीव्र निदर्शने पाहून नेहरूंना मराठी मनाच्या परिस्थितीची जाणीव झाली.
१९६० महाराष्ट्र निर्मितीच्या हालचाली
यशवंतराव चव्हाण यांनी आपल्या “ऋणबंध” या पुस्तकातील संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे पूर्वक्षण या लेखामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रतापगडावर ते नेहरूंसोबत होते, समितीमुळे त्यांना मराठी लोकांच्या भावना पोचल्या होत्या आणि महाराष्ट्राच्या निर्मितीबाबत त्यांच्यात चर्चा झाली होती. नंतर इंदिरा गांधी अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्र निर्मितीचे आश्वासन दिल्याचेही यशवंतराव सांगतात.
याचाच भाग म्हणून चंदिगढ अधिवेशनामध्ये गोविंद पंत, यशवंतराव चव्हाण, जीवराज मेहता आणि स का पाटील यांची समिती नेमण्यात आली, समितीने संयुक्त महाराष्ट्राला अनुकूलता दर्शवली. नंतर समितीच्या आग्रहामुळे मुंबई ऐवजी राज्याचे नाव “महाराष्ट्र” असे मान्य झाले आणि एप्रिल १९६० मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजुर केला आणि १ मे १९६० रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली.