“करियर ऐन भरात असतांना दिव्या भारतीने ह्या जगाचा निरोप घेतला, पण तिचा मृत्यू खरंच एक अपघात होता का ?”
बॉलिवूडमध्ये दिव्या भारती सारखी नटी क्वचितच कुठली झाली असेल. दिव्या भारतीने करिअरच्या पहिल्याच वर्षी 12 चित्रपट केले होते. तिचे बाराही चित्रपट जबरदस्त हिट झाले होते, पण त्याच्या दुसर्याच वर्षी तिचा गुढ मृत्यू झाला. काही चित्रपट असे आहेत ज्या चित्रपटांची साधी नाव जरी घेतली तरी दिव्या भारतीची आठवण आल्याशिवाय राहत नाही. तिच्या चित्रपटातील अनेक गाणीसुद्धा चांगलीच गाजली, त्यातील काही नावे म्हणजे ऐसी दिवानगी, सात समंदर आणि इतर अनेक चित्रपटांतील गाणी.
25 फेब्रुवारी 1974 ला दिव्या भारतीचा जन्म झाला होता. जर ती आज जिवंत असती तर 44 वर्षांची असली असती, पण एकोणिसाव्या वर्षीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. दिव्या भारतीने 1992 मध्ये विश्वात्मा ह्या चित्रपटामधून बॉलिवूड सिनेसृष्टीमध्ये पहिले पाऊल ठेवले होते. तसं बघायला गेलं तर, काही तेलुगू चित्रपट तिने याच्या आधी केले होते. विश्वात्मामध्ये तीला तीच्या करिअरचं पहिलं हिट गाणं मिळालं होतं. या गाण्यामुळे दिव्या भारतीचे करिअर पुढच्या वर्षभरामध्ये खूपच फुललं. नंतर विश्वात्मा सोबतच दिव्या भारतीने अजून दहा चित्रपट त्याच वर्षी लगातार केले, ज्यामध्ये शोला और शबनम, दिल का क्या कसूर, जान से प्यारा, दिवाना दिल आशना है या चित्रपटांचीही समावेश आहे.
दिव्याला दिवाना या गाण्यासाठी लक्स तर्फे “न्यू फेस ऑफ द इयर” हा अवॉर्डही मिळाला होता. एकाच वर्षांमध्ये दिव्याने चांगली ओळख प्राप्त केली होती. 1993 मध्ये दिव्याचे फक्त तीनच चित्रपट प्रदर्शित होऊ शकले, त्यामध्ये क्षत्रिय, रंग आणि शतरंज या चित्रपटांचा समावेश आहे, कारण याच वर्षी दिव्याचा मृत्यू झाला होता. 5 एप्रिल 1993 ह्या दिवशी तिने तिच्या आयुष्याचा शेवटचा श्वास घेतला. या सर्व घटनेच्या एक वर्ष आधीच तिचे लग्न झाले होते.
जेव्हा गोविंदा, दिव्या सोबत “शोला और शबनम” या चित्रपटाची शूटिंग करत होता, तेव्हा गोविंदाने तिला साजिद नाडियादवाला या चित्रपट निर्मात्यासोबत भेटवले होते. या दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले होते, त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर दिव्याने इस्लाम कबूल केला, आणि दहा मे 1992 ला त्यांचे लग्न झाले. काही जणांचे असेही मत होते की दिव्याच्या मृत्यूमागे साजिद यांचाच हात आहे.
5 एप्रिल ला काय झाले होते जाणून घेऊयात
दिव्याच्या अचानक झालेल्या मृत्यूमागे काहीतरी गूढ रहस्य आहे असे मानले जाते. खूप जणांनी त्याला आत्महत्या म्हटले आहे, काहीजण या घटनेला एक्सीडेंट म्हणतात, तर काही जणांनी यासाठी साजिद वर संशय घेतला आहे. यामागे एक कारण असे आहे की, साजिद यांचे अंडरवर्ल्ड सोबत चांगले संबंध होते, त्यामुळे दिव्या त्रस्त असे. त्यांच्या आई सोबतही दिव्याचं पटत नसे. या नात्यांमधून तिच्यामध्ये वैफल्य आले होते, म्हणून तिने आत्महत्या केली असे सांगण्यात येते. अनेक वर्ष या मृत्यूची चौकशी केल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही, त्यामुळे शेवटी 1998 मध्ये ही केस बंद करण्यात आली.
आपल्या मुत्युच्या दिवशीच दिव्याने तिच्यासाठी मुंबईमध्ये 4 बीएचके घर खरेदी केले होते. दिव्याने ही आनंदाची बातमी तिच्या भावाला फोन करुन सांगितली होती. दिव्या त्याच दिवशी शूटिंग संपवून चेन्नईहून परत मुंबईमध्ये आली होती, तिच्या पायाला त्यावेळी जखम होती. रात्री जवळपास दहा वाजता मुंबईच्या पश्चिम अंधेरी भागात असणाऱ्या तुलसी अपार्टमेंटमधील पाचव्या मजल्यावर त्यांच्या घरी त्यांची एक मैत्रीण, जी डिझायनर होती, नीता लुल्ला आपल्या पतीसोबत भेटायला आली होती. तिघेही लिविंग रूममध्ये बसून मद्यपान करत होते. त्यांच्यासोबत दिव्याची असिस्टंट अमृताही बसलेली होती.
कोणाला माहिती होतं, त्याच्या काही क्षणांनंतर काय दुर्घटना होणार आहे. रात्रीचे जवळपास अकरा वाजत होते, अमृता किचनमधील काही काम करण्यासाठी गेली होती. नीता आपल्या पतीसोबत टीव्ही बघण्यात व्यस्त होती. दिव्या आपल्या रूमच्या खिडकीकडे गेली आणि ती तेथून आपल्या असिस्टंटला मोठ्याने बोलत होती. दिव्याच्या त्या लिविंग रूममध्ये कुठलीच बालकणी नव्हती, पण एकमेव खिडकी अशी होती जिला कुठलीही ग्रील बसवलेली नव्हती. या खिडकीच्या खाली पार्किंग होती, जिथे गाड्या उभ्या करण्यात येत असत.
त्या दिवशी मात्र तीथे कुठलीही गाडी उभी केली गेली नव्हती. खिडकीवर उभ्या दिव्याने मागे वळून नीट उभे राहण्याचा प्रयत्न केला पण तिचा पाय घसरला आणि ती पार्किंगमध्ये पडली. तिला लगेच कूपर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दिव्याने शेवटचा श्वास घेतला. या घटनेची पाच वर्ष पोलिसांनी चौकशी केली, पण त्यांच्या हाताला कुठलेही ठोस पुरावे लागले नाहीत. त्यामुळे पोलिसांना रिपोर्टमध्ये दिव्या मद्यधुंद अवस्थेत खाली पडल्याची नोंद करावी लागली. दिव्या यांच्या मृत्यूचं गुढ आजही उकलले गेले नाही, ते गुढ आता तरी उकलले जावे एवढीच अपेक्षा.