दादा, महाराजा, बेंगाल टायगर अश्या अनेक नावांनी आपण सौरव गांगुलीला ओळखतो. जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या सौरवने जेव्हा भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची धुरा आपल्या हाती घेतली होती तेव्हा टीम मरगळलेल्या अवस्थेत होती. त्यावेळी सौरवने भारतीय संघाची बांधणी केली. भारतीय संघाला जिंकण्याची सवय लावली. “अरे ला का रे” ने उत्तर देण्यास शिकवले.
युवराज, हरभजन, सेहवाग ह्या भारतीय क्रिकेट विश्वातील प्रतिभावान खेळाडूंची कारकीर्द फुलवण्यात सौरवचा फार मोठा वाटा होता व हे दिग्गज खेळाडू हि गोष्ट अतिशय नम्रपणे कबूलही करतात. भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या सौरव गांगुलीची कारकीर्द जितकी यशस्वी तितकीच वादग्रस्तही होती हे त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत घडलेल्या अनेक घटनांवरून दिसून येते. आज आपण पाहुयात सौरव गांगुलीच्या दादागिरीचे असेच ११ किस्से…
१) ११९१-९२ साली सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले ते ऑस्ट्रेलियाविरुद्ध. ह्या पदार्पणापासूनच गांगुली आणि वाद असे जणू समीकरणच बनून गेले. राखीव असलेले खेळाडू मैदानातील खेळाडूंसाठी पाणी अथवा ड्रिंक्स घेऊन जातात हे आपण अनेकदा पाहतो. पण, सौरव गांगुलीने आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच मैदानातील खेळाडूंसाठी पाणी घेऊन जाण्यास नकार दिल्याची बातमी माध्यमात त्यावेळी झळकली.
त्याच्या अश्या स्वभावामुळे त्याला पुढील चार वर्षे भारतीय संघात स्थान मिळू शकले नव्हते असे म्हटले जाते. ह्या विवादाविषयी बोलताना गांगुली म्हणाला कि हा वाद निरर्थक असून ह्या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. पण ह्या बातमीमध्ये तथ्य नक्कीच असू शकते असे सौरवच्या कारकिर्दीतील इतर अनेक प्रसंग पाहून वाटते.
२) सन २००० साली गांगुलीने लँकशायर संघाकडून काऊंटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. परंतु वादविवादांनी त्याचा पिच्छा इथेही सोडला नाही. काऊंटी संघातील अनेक खेळाडूंनी त्याच्यावर असा आरोप लावला कि सौरवची वागणूक एखाद्या नवाबासारखी आहे व तो संघातील इतर सहकार्यांना एखाद्या नोकरांप्रमाणे वागवतो. अनेक संघसहकार्यांचे असेही म्हणणे होते कि सौरव त्यांना त्याची क्रिकेट बॅग आणण्यास सांगत असे.
इंग्लंडचा क्रिकेटपटू माईक आथरटनने सौरवच्या दादागिरीचा एक किस्सा सांगताना म्हटले कि एके दिवशी सौरव गांगुलीने त्याला आपले स्वेटर काढून दिले व ते स्वेटर मैदानाबाहेर घेऊन जाण्यास सांगितले. इंग्लंडचा माजी ऑलराऊंडर खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफने आपल्या आत्मचरित्रात असे लिहिले आहे कि सौरव गांगुली स्वतःला प्रिन्स चार्ल्स समजतो.
3) त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील वादविवादाबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक वादग्रस्त किस्से प्रसिद्ध आहेत. २००१ साली त्याचे नाव फिल्म अभिनेत्री नगमा बरोबर जोडले गेले होते. सौरव गांगुली विवाहित असूनही नगमा बरोबर त्याने प्रेमसंबंध ठेवल्याचे तत्कालीन मीडियाने म्हटले होते. त्यावेळी सौरवचा बचाव करायला खुद्द त्याची पत्नी मीडियासमोर आली व तिने ह्या बातमीमध्ये काहीही तथ्य नसल्याचे मीडियाला सांगितले. त्यानंतर कुठे हे नगमा प्रकरण थंडावले.
४) २००१ साली अजून एका नवीन वादाला सौरवने आमंत्रण दिले. २००१ च्या भारत-ऑस्ट्रेलिया सिरीज दरम्यान सौरव नाणेफेक अर्थात टॉसच्या वेळी कधीही वेळेत हजर नसायचा असा आरोप त्यावेळी त्याच्यावर लावला गेला. ऑस्ट्रेलियाचा कप्तान स्टीव्ह वॉ ला त्याने नाणेफेकीसाठी मैदानात कितीतरी वेळ ताटकळत ठेवले, ज्यामुळे स्टीव्ह वॉने गांगुलीला घमंडी म्हटल्याचे ऐकण्यात येते.
५) २००१ साली भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी मालिकेदरम्यान मॅच रेफरीने ६ भारतीय खेळाडूंवर बंदी घातली व सोबतच सौरव गांगुलीला सुद्धा सस्पेंड केले होते. जास्त वेळा अपील करून अम्पायरला दबावात आणण्याचा प्रयत्न भारतीय खेळाडूंनी केल्याचा आरोप ठेवून हरभजन, दीपदास गुप्तासहित इतर अनेक खेळाडूंना निलंबित करण्यात आले व सौरवला आपल्या खेळाडूंना नियंत्रणात न ठेवल्याच्या आरोपावरून एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आले.
६) १९९८ साली बंगळुरू इथे खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात अम्पायरने गांगुलीला बाद घोषित केले. सौरवला पंचाचा हा निर्णय मान्य नव्हता त्यामुळे बाद दिल्यावरसुद्धा त्याने मैदान सोडण्यास नकार दिला, ज्यामुळे मॅच रेफ्रीने गांगुलीवर एका वन डे सामन्यासाठी बंदी घातली.
७) २००१ हे साल गांगुलीच्या कारकिर्दीतील सर्वाधिक वादग्रस्त साल होते. कारण ह्याच साली श्रीलंकेविरुद्धच्या एका सामन्यात पंचाने त्याला बाद घोषित केले, ज्यामुळे त्याने रागाने अम्पायरला बॅट दाखवली. त्याच सामन्यात भारतीय संघ गोलंदाजी करत असतांना सौरवने अम्पायरच्या एका निर्णयावर तीव्र नापसंती दाखवली व अम्पायरशी वाद घातला. ज्याची शिक्षा म्हणून त्याला पुन्हा एका मॅचसाठी निलंबित करण्यात आले.
८) सन २००२ साली भारत नेटवेस्ट सिरीज खेळण्यासाठी इंग्लड दौऱ्यावर गेला होता. इंग्लड भारत दौऱ्यावर आला असतांना एका सामन्यात इंग्लडच्या अँड्र्यू फ्लिंटॉपने स्वतःच्या अंगातील शर्ट काढून विजयाचा जल्लोष केला होता, ज्याचे प्रत्युत्तर गांगुलीने देण्याचे ठरवले असे नंतर घडलेल्या घटनेवरून दिसून येते. मालिकेतील शेवटचा व निर्णायक सामना होता. त्या अतिशय अटीतटीच्या सामन्यात भारताने इंग्लंडवर विजय मिळवल्यानंतर सौरवने आपल्या अंगातील जर्सी काढून विजयाचा जल्लोष केला व फ्लिंटॉपला जशास तसे उत्तर दिले, ज्यामुळे गांगुलीवर बरीच टीका देखील झाली होती.
९) २००४ साली गांगुलीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका कसोटी सामन्यात खेळण्यास नकार दिल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात येतो. खेळपट्टीवर जास्त गवत असल्यामुळे गांगुलीने खेळण्यास नकार दिल्याचे व स्वतःला संघातून मुद्दाम वगळण्याचे निवड समितीला सांगितले असल्याचे म्हणण्यात येते.
१०) २००५ साली झालेला वाद मात्र गांगुलीच्या क्रिकेट करियरला ग्रहण लावणारा ठरला. ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू व तत्कालीन भारतीय संघाचे कोच ग्रेग चॅपलशी गांगुलीचा वाद झाला. हा वाद एवढा पेटला कि बीसीसीआयने गांगुलीला कर्णधारपदावरून काढले. एवढेच नव्हे तर त्याची वनडे संघातूनही हकालपट्टी केली.
११) २००८ च्या आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ह्या सामन्यादरम्यान गांगुली व शेन वार्न दरम्यान चांगलाच वाद झाला. शेण वार्नने गांगुलीवर आरोप केला कि तो ह्या सामन्यात उशिरा मैदानात आला ज्यामुळे राजस्थान रॉयल्स संघातील खेळाडूंना मैदानावर ताटकळत राहावे लागले.
गांगुलीचे वादग्रस्त किस्से तर आपण पाहिले परंतु भारतीय क्रिकेटसाठी त्याने दिलेले योगदान कुणीही नाकारू शकत नाही. मुजोर ऑस्ट्रेलिया व इंग्लडला त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला गांगुलीनेच भारतीय संघाला शिकवले. मरगळलेल्या संघाची बांधणी करून व अनेक प्रतिभावान खेळाडूंमधली प्रतिभा ओळखून त्यांना संधी दिली ती सौरवनेच. कित्येक वर्षानंतर २००३ मध्ये भारतीय संघाला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारता आली, ज्यात सिहांचा वाटा एक कप्तान म्हणून कुणाचा असेल तर तो गांगुलीचा.